उमरीत ओंजळीच्या पाण्याने पिके वाचवायची धडपड
-
Wednesday, June 27, 2012 AT 01:15 AM (IST)
नरेंद्र येरावार
उमरी, जि. नांदेड - गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उमरी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मृग नक्षत्रात काही ठिकाणी थोडाफार पाऊस झाल्याने जवळपास तालुक्यात 50 टक्के कापसाची लागवड झाली. पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या झाल्याच नाहीत. मात्र कापसाची लागवड करून 15 दिवसांनंतरही पाऊस न झाल्याने कोवळी रोपटे धोक्यात आली आहेत. त्या रोपट्यांना वाचविण्यासाठी हिरडगाव (ता. उमरी) येथील शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणी घेऊन धोक्यात आलेल्या कापसाच्या रोपट्यांना ओंजळीने पाणी टाकून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मृग नक्षत्रात झालेल्या थोड्याफार पावसाने हिरडगाव येथील शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली; मात्र पावसाने उघडीप दिल्याने गावातील रमेश ढगे, गोविंद गंडरस, अनिल ढगे, रमेश भुजबळे या तरुणांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांनी धोक्यात आलेल्या कापसाच्या रोपट्यांना जीवदान दिले. काही शेतकऱ्यांनी दूरवरून घागरभर पाणी नेऊन रोपट्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अजून काही दिवस पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही, हेच खरे!