कोल्हापुरात गाजर, हिरवी मिरची तेजीत
- (प्रतिनिधी)
Friday, July 06, 2012 AT 02:00 AM (IST)
कोल्हापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 4) गाजर आणि हिरवी (ओली) मिरचीचे दर तेजीत होते. गाजरास 330 ते 400 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. गाजराची अठरा पोती आवक झाली. टोमॅटोची सर्वाधिक दीड हजार पेट्यांची आवक झाली. टोमॅटो 60 ते 160 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.
बाजार समितीत ढोबळी मिरची, कारल्याचे दर तेजीत होते. हिरव्या मिरचीस 150 ते 400 रुपये, ढोबळी मिरचीस 90 ते 270 रुपये तर कारल्यास 140 ते 270 रुपये
प्रति दहा किलो असा दर मिळाला. वांग्याची सातशे करंड्या आवक होती. वांग्यास 50 ते 200 रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यांसह कर्नाटकातील काही भागात पाऊस सुरू असला तरी पावसाचा जोर फारसा नसल्याने भाजीपाल्याच्या आवकेवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
बाजार समितीत कोथिंबिरीच्या आवकेत बुधवारी चांगलीच वाढ झाली. कोथिंबिरीची सुमारे 33 हजार पेंढ्यांची आवक राज्याच्या विविध भागांतून झाली. कोथिंबिरीस शेकडा 350 ते 700 रुपये दर होता. मेथीची तेरा हजार पेंढ्यांची आवक होती. मेथीस शेकडा 200 ते 700 रुपये दर होता. मेथी, पालक, पोकळा, शेपूस शेकडा 200 ते 400 रुपये दर मिळाला.
बाजारात कांद्याची पाच हजार पोती आवक होती. कांद्यास 40 ते 90 रुपये प्रति दहा किलो असा दर होता. बटाट्यास 110 ते 150 रुपये प्रति दहा किलो असा दर होता. लसणास 80 ते 200 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.
फळबाजारात डाळिंबाची तीन हजार डझन आवक होती. डाळिंबास डझनास 10 ते 175 रुपये दर होता. सीताफळाची अठरा ढिगांची आवक होती. पन्नास सीताफळांच्या ढिगास 120 ते 1150 रुपये दर होता. दशहरी आंब्याची चौतीस पेट्यांची आवक होती. चार डझनाच्या पेटीस 300 ते 375 रुपये दर मिळाला. नीलम आंब्यास प्रति टन 15000 ते 16000 रुपये इतका दर होता.