(बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असलेल्या महसूल विभागाचे गावातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. जमीन महसुलासंदर्भातील सेवा- सुविधा, योजनांमधून ग्रामपंचायतींना गावबांधणी करणे शक्य आहे. जोडीला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि जलसंधारणाची जोड आवश्यक आहे. "ऍग्रोवन'च्या महासरपंच परिषदेच्या निमित्ताने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ग्रामविकासाचे सूत्र मांडणारे विचार व्यक्त केले. शासन पातळीवर ग्रामविकास आणि महसूल हे पूरक विषय आहेत. आजच्या घडीला गाव हे एक कुटुंब म्हणून मानायला पाहिजे. नव्या पिढीला संघटित करताना विकासाच्या वाटा लोकसहभागातून पुढे गेल्या पाहिजेत. देशाची, राज्याची शासन व्यवस्था पंचायतीच्या रूपाने गावापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामविकास विभागाचा ग्रामसेवक, महसूल विभागाचा तलाठी किंवा गृह विभागाचा पोलिस पाटील यांच्या समन्वयातून सरपंचांनी गाव विकासाला गती दिली पाहिजे. पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, वीज अशा मूलभूत गरजांबरोबरच अत्याधुनिक सुविधा गावात उपलब्ध करण्यावर भर दिला पाहिजे.
Sunday, March 24, 2013 AT 12:30 AM (IST)