जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीसाठी साडेतीन लाख अर्ज

कर्जमाफी अर्ज प्रक्रिया
कर्जमाफी अर्ज प्रक्रिया

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शनिवारपर्यंत (ता. ९) तीन लाख ४६ हजार ऑनलाइन अर्ज दाखल होऊ शकले आहेत. आतापर्यंत जवळपास ४० हजार शेतकरी या योजनेसंबंधीचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात सुमारे पाच लाख १४ हजार ९७ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी चार लाख ९२ हजार शेतकरी हे विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे सभासद आहेत. यातील तीन लाख ८६ हजार शेतकरी कर्जदार असून, ते कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जवळपास ४२ हजार कर्जदार शेतकरी या योजनेसाठी पात्र असून, यातील कमाल शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या योजनेतून कर्जमाफी व सवलतीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे गरजेचे आहे; परंतु अद्याप जवळपास ४० हजार शेतकरी हे अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे येत नाहीत, काही शेतकरी नोकरी, व्यवसाय, सेवेनिमित्त राज्य किंवा जिल्ह्याबाहेर आहेत, त्यांच्या आधार कार्डसंबंधीच्या अडचणी कायम आहेत. कारण, महाराष्ट्राबाहेरील आधार कार्डमधील क्रमांक हा अर्ज भरताना नमूद होत नाही, वृद्ध शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे येतच नाहीत.

संबंधित शेतकरी जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सोसायट्यांमध्ये सतत चकरा मारीत आहेत. खासगी सायबरचालकांकडेही बोटांचे नवे ठसे देऊन अर्ज मुदतीत भरला जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत; पण शुक्रवारपर्यंत (ता. १५) हे अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या मुदतीत हे अर्ज भरले जातील काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. आधार कार्ड नव्याने तयार करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. बोटांचे नवे ठसे, त्यावरील जन्मतारीख व इतर माहिती बदलून त्याच्या अद्ययावतीकरणासाठी किमान २० ते २२ दिवस लागतात. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या सुरवातीला ही प्रक्रिया करून घेतली; पण अनेक शेतकऱ्यांचे ‘आधार’ अद्ययावतीकरण १५ सप्टेंबरनंतरच होईल. त्यामुळे ते हे अर्ज भरण्यापासून वंचित राहतील, असे चित्र तूर्त तरी दिसत आहे. गटसचिवांनी आपला बेमुदत संप मागे घेतला; पण त्यांनी अद्यापही कर्जमाफीचे ऑफलाइन अर्ज स्वीकारायला सुरवात केलेली नाही. प्रथम ऑनलाइन अर्ज भरा, नंतर हे अर्ज आम्ही स्वीकारू, असे गटसचिव शेतकऱ्यांना सांगत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनातर्फे १७७ महाऑनलाइनचे केंद्र , ७०० कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), ८६९ आपले सरकार केंद्रे कार्यरत आहेत. यातील अनेक केंद्रे ही सुरूच नाहीत. ती नावालाच आहेत. चार ते पाच हजार लोकसंख्येच्या गावात हे केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन खासगी सायबर केंद्रात पैसे देऊन अर्ज भरून घ्यावे लागले आहेत; पण जिल्हा ऑनलाइन अर्ज दाखल करण्याबाबत राज्यात आघाडीवर असल्याचा दावा सहायक जिल्हा उपनिबंधक अशोक बागल यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com