परभणी जिल्ह्यात २ लाख ६२ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

कर्जमाफी प्रक्रिया
कर्जमाफी प्रक्रिया

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील ६२ हजार ७५१ शेतकऱ्यांच्या नोंदणीचे काम शिल्लक आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ८) परभणी जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार २४९ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. एकूण १ लाख २४ हजार शेतकरी कुटुंबांनी कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी ३ लाख २५ हजार शेतकरी विविध बॅंकांचे कर्जदार आहेत. यामध्ये १ लाख ५० हजार रुपये कर्ज असलेले १ लाख ९७ हजार शेतकरी, पुनर्गठन केलेले ८५ हजार शेतकरी आणि चालू बाकीदार ४३ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सामुदायिक सेवा केंद्र अशा एकूण ७३८ केंद्रांवर शेतकऱ्यांचा कर्जमाफी अर्ज आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अनेक शेतकरी वैयक्तिकरीत्या आॅनलाइन अर्ज भरत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक दिवशी १० ते ११ हजार शेतकरी नोंदणी करीत आहेत. गेल्या दिवसांत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, शेवटच्या चार दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील जनसुविधा केंद्रांवर भारनियमन, नेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, सर्व्हर डाउन आदी कारणांमुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्‍यांना दिवस-दिवस ताटकळत बसावे लागत आहे. अनेक ठिकाणी रात्रभर थांबूनही अर्ज भरता येत नाहीत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना भल्या पहाटे कुटुंबासह जनसुविधा केंद्र गाठावे लागत आहेत. कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी जनसुविधा केंद्रचालकांना प्रति अर्ज १० रुपये याप्रमाणे शुल्क देण्यात येत आहे. परंतु अनेक ठिकाणचे जनसुविधा केंद्रचालक ५० ते ३०० रुपये प्रतिअर्ज याप्रमाणे शेतकऱ्यांकडून पैसे उकळत आहेत. आॅनलाइन नोंदणीची पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर पाथरी तालुक्यातील दोन जनसुविधा केंद्रांवर कारवाई करण्यात आली.

आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (ता. १५) पर्यंतची मुदत आहे. शेवटच्या पाच दिवसांत जनसुविधा केंद्रावरील गर्दी वाढणार आहे. या कालावधीत उर्वरित ६२ हजार २४९ शेतकऱ्यांची नोंदणी करून अर्ज भरण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे .अन्यथा तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरू न शकलेले शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com