मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात सुधारणा

धरणांमधील पाणीसाठा स्थिती
धरणांमधील पाणीसाठा स्थिती
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील पाणीसाठ्यात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित सुधारणा झाली. हा पाणीसाठा आता ४२ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.
२५ ऑगस्टअखेर या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा ३० टक्के इतका होता. दोन आठवड्यात पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात जवळपास १२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ११ मध्यम प्रकल्पांची तहान मात्र कायम आहे. बीड जिल्ह्यातील बेलपारा व नांदेड जिल्ह्यातील महालिंगी या मध्यम प्रकल्पात अजूनही उपयुक्‍त पाणीसाठा झालेला नाही. 
१९ ऑगस्टनंतर जवळपास आठवडाभर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा मध्यम, दमदार ते तुरळक स्वरूपात बरसला. त्यामुळे पाणीसाठ्यांच्या स्थितीत मागील आठवड्यात जवळपास दहा टक्‍क्‍यांनी सुधारणा होत उपयुक्‍त पाणीसाठा ४० टक्‍क्‍यांवर आला होता. त्यानंतर पुन्हा बरसलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यांमध्ये किंचित सुधारणा होऊन तो ४२ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.
२५ ऑगस्टअखेरच्या पाणीसाठा आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध नव्हता. १३ प्रकल्पांपैकी गडदगड मध्यम प्रकल्पात ३६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला तो सध्या कायम आहे. त्यानंतर अंबाडी प्रकल्पात २ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. 
औरंगाबाद जिल्ह्यातील ११ मध्यम प्रकल्पांत अजूनही उपयुक्‍त पाणीसाठा झालेला झाला नाही. १ सप्टेंबरअखेर बीड जिल्ह्यातील बेलपारा व उस्मानाबाद जिल्ह्यातील चांदणी मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नव्हता. त्यामध्ये चांदणी प्रकल्पात ७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला तर बेलपारा प्रकल्पात अजूनही उपयुक्‍त पाणीसाठा झालेला नाही.
१ सप्टेंबरअखेर हिंगोली जिल्ह्यातील सिध्देश्‍वर प्रकल्पातील पाणीसाठा ४० टक्‍क्‍यांवर पोचला आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना - कोळेगाव या मोठ्या प्रकल्पातील १ सप्टेबरअखेर १८ टक्‍क्‍यांवर असलेला पाणीसाठा आता २४ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. २५ ऑगस्टअखेर उपयुक्‍त पाणीसाठा नसलेल्या बीड जिल्ह्यातील सरस्वती प्रकल्पात १ सप्टेंबरअखेर ४६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ८ सप्टेंबर अखेर या प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ८९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. 
उपयुक्‍त पाणीसाठा नसलेले मध्यम प्रकल्प :-  औरंगाबाद जिल्हा ः सुखना, लाहुकी, गिरजा, वाकोद, खेळणा, पूर्णा नेवपूर, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, नारंगी, बोरदहेगाव. बीड जिल्हा ः बेलपारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com