फरदड कापूस घेण्याचेही काही फायदे असले तरी तोट्यांचे प्रमाण अधिक आहेत. विशेषतः या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून, पुढील हंगामामध्ये तो कमी राहावा, यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचे टाळावे. महाराष्ट्र राज्यामध्ये कापूस पिकाचे क्षेत्र २८ लाख हेक्टर वरून ४२ लाख हेक्टरपर्यंत वाढले असून, त्याली बहुतांश (सुमारे ८५ ते ९० टक्के) क्षेत्र कोरडवाहू लागवडीखाली असते. उर्वरीत बागायती क्षेत्रामध्ये कापूस पिकाची फरदड घेण्यात येते. यात एखादे सिंचन देण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश असतो. फरदड व त्याचे फायदे :
फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी (सिंचन) देऊन पुन्हा कापूस पीक घेतले जाते. फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये मार्च महिन्यानंतरही राहते. कपाशी वेचणीनंतर रब्बीपश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा बाबींवरील खर्च वाढतो. हा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. प्रति एकर कापूस उत्पादकता वाढते. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पद्धत शेतकऱ्यांना फायद्याची वाटते. मात्र, या पद्धतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. फरदडमुळे ही परिस्थिती निर्माण होते...
कपाशीच्या दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणांची लागवड होते. या संकरित वाणांवर गुलाबी बोंडअळीच्या जास्त पिढ्या पूर्ण होतात. परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. वेगवेगळ्या कपाशीच्या संकरित वाणांची लागवड झाल्याने त्यांचा फुले येण्याचा व बोंडे लागण्याचा काळ वेगवेगळा राहतो. गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत असल्याने व जीवनक्रम एकमेकात मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते. प्रदीर्घ काळापर्यंत कच्च्या कपाशीची जिनिंगमध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केली जाते. यामुळे गुलाबी बोंडअळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. हंगामपूर्व लागवड केलेल्या (एप्रिल - मे) कपाशीमध्ये फुले येण्याचा काळ जून - जुलै महिन्यात येत असल्याने लवकर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. तसेच मागील हंगामातील कपाशीवरील बोंडअळीचा जीवनक्रम हा एकाचवेळी सोबत येतो. पर्यायाने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमताही वाढत आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा मुख्यतः हिवाळ्यात ऑक्टोबर शेवटी ते नोव्हेंबरमध्ये होते. ही अळी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा वाळलेल्या खुरकुट्यामध्ये कोष अवस्थेत जाते. नोव्हेंबरनंतरही शेतात पाणी देऊन पीक ठेवल्याने शेंदरी बोंड अळीच्या वाढीला आणखी चालना मिळते. बोंड अळीमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकार क्षमता तयार होऊ नये, यासाठी बी. टी. जनुकविरहीत कपाशीच्या (नॉन बीटी) आश्रीत ओळी (रेफ्युजी) लावण्याची शिफारस केली जाते. मात्र, अनेक शेतकरी रेफ्युजी लागवड करत नाहीत. हे चुकीचे आहे. कपाशी पिकावर येणाऱ्या प्रमुख बोंड अळ्यांपैकी हिरवी बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी, शेंदरी बोंड अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी (spodotera) यापैकी फक्त शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम कापूस पिकावरच पूर्ण होतो. यामुळे त्यांच्यामध्ये मागच्या ३-४ वर्षात क्राय प्रथिनाविरुद्ध प्रतिकार क्षमता निर्माण झालेली दिसून येत आहे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश संकरित वाणांवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी - जास्त प्रमाणात दिसून येत आहे. सुरवातीच्या काळात रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस, फिप्रोनिल किंवा ॲसिफेट यासाख्या कीटकनाशकांचा वापर अधिक प्रमाणात झाला. या किटकनाशकाचा ३ ते ४ वेळा वापर केल्यास झाडांची कायिक वाढ झाल्याने फांद्यांची अधिक वाढ होते. फुले व बोंडांचे प्रमाण कमी होते. या रासायनिक कीटकनाशकांचा एकत्रित वापर झाल्याने फुले लपेटून अळीचा प्रादुर्भाव हिरव्या व फुटलेल्या बोंडामध्येही आढळून येतो. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृत्रिम व वनस्पतीजन्य कीटकनाशकांची ऑक्टोबर - नोव्हेबरमध्ये फवारणी केली. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापरही मर्यादीत केला अशा ठिकाणी बोंडे एकाच वेळी फुटून आली. परिणामी शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाला. चालू हंगामामध्ये कापूस पिकावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळे फरदड घेणे टाळावे. कापसाची फरदड घेण्याचे तोटे
बी. टी. कापूस पिकाची फरदड घेतल्यास बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. सध्या बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण योग्य न झाल्यामुळे धाग्याची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबुती आणि रुईचा उतारा घटतो. कापसाची प्रत घटते. त्यामुळे या कापसाला बाजारभाव कमी मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. फरदड कापूस पिकावर येणाऱ्या अळ्यांना हंगामानंतर आयतेच खाद्य उपलब्ध होते. शेंदरी आणि हिरवी बोंडअळी यांच्या पुढील पिढ्या वाढतात व त्यांचा पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कापूस पिकाचा वाढत्या कालावधीबरोबरच त्यातील बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होत जाते. बोंड अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक किमान पातळीपेक्षा प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम कमी होतो. फरदड कापसासाठी सिंचनाची आवश्यकता असते. खरीप हंगामातील पिकावर मावा किडीच्या नियंत्रणासाठीही निओनिकोटिनॉईड वर्गातील किटकनाशकांचा पुनःपुन्हा वापर केला जातो. परीणामी या वर्गातील कीटकनाशकांची परिणामकारकता कमी होत आहे. खरिपामध्ये कपाशीवर पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनामध्ये घट होते. पांढरी माशी या किडीच्या प्रादुर्भाव कापूस हंगामाच्या शेवटी (ऑक्टोबर महिन्यात) होतो. या परिस्थितीमध्ये कापसाची फरदड घेतल्यास पांढरी माशी किडीचे प्रमाण वाढते. तसेच पुढील हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता असते. फरदड कापूस घेतल्यामुळे त्या जमिनीमध्ये फ्युजरियम मर, व्हर्टीसिलीयम, मूळ सडणे इ. मृदाजन्य रोगकारक बुरशींचा प्रसार आणि फैलाव होऊ शकतो. फरदड कापूस पीक शेताबाहेर काढण्याच्या वेळी माती कडक झालेली असते. त्यामुळे झाडे उपटून काढण्यासाठी अधिक प्रमाणात मजूर, वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो. डॉ. खिजर बेग, ७३०४१२७८१० (कापूस संशोधन केंद्र, नांदेड)