खतांचा संतुलित वापर - चांगला पर्याय

वाढलेले खतांचे दर प्रतिबॅग कमी वाटत असले, तरी राज्यातील या खतांचा एकूण वापर पाहता येत्या खरीप हंगामात कोट्यवधी रुपयांचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे.
संपादकीय
संपादकीय

निविष्ठांच्या किमती भरमसाट वाढलेल्या आहेत. त्यातच एेन खरिपाच्या तोंडावर आता संयुक्त खतांच्या किमती प्रति ५० किलो बॅग ६३ ते १३४ रुपयांनी वाढविल्या आहेत. वाढलेले खतांचे दर प्रतिबॅग कमी वाटत असले तरी राज्यातील या खतांचा एकूण वापर पाहता येत्या खरीप हंगामात कोट्यवधी रुपयांचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. खतनिर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांचे दर वाढले आहेत. बहुतांश रासायनिक खते आपल्याला आयात करावी लागतात. त्यावर आयातकरही आहे. त्यातच वाढीव जीएसटीमुळे खतांचे दर वाढलेले आहेत, असे कंपन्या सांगतात.

निविष्ठांवरील वाढता खर्च पाहता त्यांचे दर कमी ठेवणे गरजेचे असताना ते सातत्याने वाढत आहेत. याचा विचार करून कर कमी करून शासन रासायनिक खतांचे दर नियंत्रित ठेवू शकते. रासायनिक खतांचा संतुलित वापर व्हायला हवा, असेही शासनाचे धोरण पाहिजे. खतांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे त्यांचा असंतुलित वापर होतो. अशावेळी ही तफावत कमी होणे अपेक्षित असताना ती कशी वाढेल असेच धोरण राबविले जात आहे. नत्र:स्फुरद:पालाश यांच्या आदर्श वापराचे प्रमाण ४:२:१:१ असे असताना युरिया स्वस्त मिळतो म्हणून हे प्रमाण ८:३:१:० असे झाले आहे. आता संयुक्त खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांकडून युरियाचाच वापर अधिक होऊ शकतो. असे करण्याएेवजी शेतकऱ्यांनी सरळ खतांचे मिश्रण करून संयुक्त खतांच्या प्रमाणात पिकांना अन्नद्रव्ये दिली तर या वाढीव खर्चावर मात करता येऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केल्यास संयुक्त खतांची द्यावयाची मात्रा कमी करता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांसोबत किमान १ : २ या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या खतांमधून अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी आणि जमिनीतील अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात मिळण्यासाठी जैविक खतांचा वापर करणेही आवश्यक आहे. सर्वच प्रकारच्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी सूक्ष्म अन्नद्रव्ये विरघळविणारे जीवाणू यांचा वापर पीक लागवडीपासून बीजप्रक्रियेच्या स्वरूपात तसेच पिकांच्या वाढीव अवस्थेत ठिबक सिंचनाद्वारे किंवा आळवणी पद्धतीने शेतकऱ्यांनी करायला हवा. आज बाजारात विद्राव्ये खतेदेखील भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर विशेषतः पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत केल्यास जमिनीद्वारे द्यावयाची रासायनिक खतांची मात्रा कमी होऊ शकते. याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल. तसेच वाढलेल्या खतांच्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर होणार नाही. रासायनिक सरळ खतांसोबत विविध प्रकारच्या पेंडीचा व शेतातील तयार कंपोस्टचा वापर केल्यास रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. एकंदरीत एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन हा एक चांगला पर्याय उपलब्ध अाहे. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी संबंधित शासकीय-अशासकीय संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. येणाऱ्या हंगामात वाढीव किमतीचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होऊ नये म्हणून सर्व स्तरावर प्रयत्न होणेही आवश्यक आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com