एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे वेळेचा काटेकोर वापर, शेतीच्या नोंदी, आर्थिक ताळेबंद या साऱ्या बाबी कटाक्षाने पाळत आपली शेती म्हणजे एक उद्योग आहे, अशा भावनेने काम करणारे लातूर जिल्ह्यातील कर्नाटक हद्दीवरच्या औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील प्रगतिशील शेतकरी सुभाषराव आनंदराव मुळे यांचे अर्थ नियोजन.
सुभाषराव अन् थोरले बंधू गोविंदराव यांचे शिक्षण रात्रशाळेत तेही जेमतेम दुसरीपर्यंत झालेले. मात्र, आकडेमोड अन् पैशांच्या हिशेबात ते अगदी पक्के. त्या काळी वडील आनंदरावांकडे स्वतःची दहा एकर जिरायती शेती. ते दुसऱ्याकडे सालगडी होते. घरखर्च न भागल्याने मुलांनाही रोजंदारीवर कामे करावी लागत.यातूनच शेतीत जीवतोड मेहनत, नवनवीन पिकांचा बारकाव्यासह अभ्यास करण्याची गोडी, अन् वेड लागत गेले. वर्ष १९७७. बशीर पटेल नावाच्या मित्राकडून चार म्हशी अन् दोन बैल उधारीवर घेतले. नदीवरून दोन किलोमीटर पाइपलाइन करण्यासाठी म्हशी विकाव्या लागल्या. त्यात ऊस घेतला. असेच दोन्ही भावांनी आपल्या बायकांसह दिवसरात्र राबत हळूहळू एकर दोन एकर शेती विकत घेत गेले. जमलेल्या भांडवलातून विहीर पाडली. पाहुण्यांकडे भाजीपाल्याची शेती पाहिल्यावर वांगी, मिरची, दोडके लावून डोक्यावर माळवे विकली. पुढे सूर्यफूल, ज्वारीबरोबरच द्राक्ष लावली. १९९३ ला झालेल्या भूकंपामुळे गावातील धाब्याचे घर पडल्यावर शेतात पत्र्याचे शेडमध्ये आठ वर्षे काढली. २००१ साली सध्याचे दोन मजली टोलेजंग घर बांधताना प्रत्येक कुटुंबाचा विचार करून सर्व सोयीसुविधा केल्या. दरम्यान गावात कृष्णा कस्पटे नावाचे बार्शीकडील शिक्षक बदलून आले. त्यांच्या शेतीतून बोध घेत टोमॅटो, पपई, केळी, द्राक्ष अशा पिकांचे नियोजन करत गेलो. शेतीतील पैशांतूनच एक-दोन एकर अशी शेती विकत घेत ७० एकरपर्यंत पोचली आहे.
सुभाषरावांचे काटेकोर नियोजन
प्रत्येकाकडे आहे वेगळी जबाबदारी
शेतीमधील सुविधा
अधिक उत्पादकतेसाठी...
शेतीत पुढे जायचे असेल, तर जीव ओतून नियोजनबद्ध करावे लागते. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी झाली तरच उपयोगी ठरते. त्यासाठी वेळ वाया जाणार नाही, याकडे काटेकोर पाहतो. कुटुंबाची एकजूट आणि विश्वास यावरच पत्र्याच्या शेडपासून एक कोटी रुपयांचा बंगला झाला. दोघे भाऊ अन् पंचवीस जणांचे एकत्र कुटुंब एका छताखाली, एकहाती निर्णयावर वाटचाल करते आहे. - सुभाषराव मुळे
नोकरीइतकाच पगार मिळतो प्रत्येकाला... शिकलेले मनुष्यबळ शेतीत थांबत नाही, ही कायमची तक्रार आहे. शेती म्हणजे कोणीही करू शकतो, ही भावनाच चुकीची. घरातील हुशार मुलांनी शेती पाहिल्यास केवळ शेतीचेच नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे भले होऊ शकते, हे मुळे कुटुंबीयांच्या उदाहरणातून दिसून येते.
प्रसंग पहिला वर्ष १९९२. सुभाषरावांची प्रताप व सत्यवान आणि गोविंदरावांचा भीम ही मुले तोपर्यंत हाताशी आलेली. प्रतापची पदवीनंतर दिलेल्या परीक्षेमध्ये पी.एस.आय. म्हणून निवड झाली. ट्रेनिंगला जाण्याची तयारी सुरू असताना सुभाषरावांनी त्याला विचारले, ‘‘तुला दुसऱ्याला सलाम करायला आवडेल की तुला दुसऱ्याने आदराने नमस्कार केलेला? ताठ मानाने शेती केलीस, तर काळी माय तुला कधीही कमी पडू देणार नाही. दुसऱ्याला सलाम ठोकत राहण्यापेक्षा स्वाभिमानाने राहशील.’’ नोकरी, त्यातही पोलिस इन्स्पेक्टरचा रुबाब, याची भुरळ पडलेल्या प्रतापची द्विधा अवस्था झाली. तेव्हा वडिलांनी सांगितले, ‘‘नोकरीएवढेच काम तू शेतीत कर, तेवढाच पगार तुला मी शेतीतून देतो. आम्ही शून्यातून इथपर्यंत आलो. आम्ही लहाणपणापासून दुसऱ्याची कामे करत वाढलो. नोकरीत नाही म्हटले तरी लाचारी येतेच.’’ हळूहळू प्रताप शेतीत रुळला. नवनवे प्रयोग करू लागला.
प्रसंग दुसरा सत्यवानचे डी.फार्मसी पूर्ण झाल्यानंतर मेडिकल सुरू करण्याचे नियोजन होते. ‘‘सकाळी आठ वाजता सुरू झालेले दुकान रात्री डॉक्टर जाईपर्यंत ९.३० पर्यंत चालणार. चार भिंतीत बारा ते पंधरा तास कोंडला जाशील, त्यापेक्षा निसर्गात शेतीत चल. मोकळ्या झाडाखाली राहशील,’’ असे विनवत त्याचेही मन वळवले. असाच गोविंदरावांचा भीमा मॅट्रिक झाल्यानंतर शेतीत उतरला.
ई मेल ः pratapsmule@gmail.com (लेखक लातूर येथे कृषी अधिकारी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.