तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...

तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे
तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे

सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत तिळाची वाढ चांगली होते. लागवडीसाठी एकेटी-१०१ ही जात निवडावी. यामध्ये तेलाचे प्रमाण ४९ टक्के आहे. प्रतिहेक्‍टरी ७.५ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते.

तीळ हे कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. उन्हाळी हंगामात तीळ लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला, तर निश्चितपणे उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. चांगल्या उगवणीसाठी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस; तर पिकांच्या कायिक वाढीसाठी २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान लागते. फुले, फळधारणेसाठी २६ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची चांगली वाढ होते. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास फुलगळ होते.

  1. सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. वाळूमिश्रित पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पिकाची चांगली वाढ होते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ इतका असावा.
  2. निचरा न होणाऱ्या पाणथळ जमिनीत तिळाचे पीक चांगले वाढत नाही. पेरणी करण्यासाठी एक नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
  3. पेरणीसाठी उत्तम प्रतीचे २.५ ते ३ किलो प्रतिहेक्‍टरी बियाणे वापरावे. बुरशीजन्य रोग होऊ नये यासाठी प्रतिकिलो बियाणास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम अशी प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रतिकिलो बियाणास अॅझोटोबॅक्‍टर २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.
  4. जानेवारीचा दुसरा आठवडा ते फेब्रुवारीच्या दुसरा आठवड्यापर्यंत पेरणी करावी. पेरणी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर पाभरीने करावी. पाभरीने पेरणी करताना बारीक वाळू किंवा चाळून घेतलेले गांडूळखत किंवा शेणखतात मिसळून पेरल्याने बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होऊन एकसारख्या अंतरावर पडते. २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो.
  5. पेरणी ४५ सें.मी. अंतरावर असल्यास विरळणी ओळीतील दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून करावी. पेरणी ३० सें.मी. अंतरावर केली असल्यास विरळणी १५ सें.मी. अंतर ठेवून करावी. विरळणी पेरणीनंतर २१ दिवसांनी करावी.
  6. शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्‍टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी नत्राचा अर्धा हप्ता २५ किलो नत्र देऊन पाणी द्यावे.
  7. रोप अवस्थेत हे पीक नाजूक असल्याने ते तणांबरोबर जमिनीत ओलावा व अन्नद्रव्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे तिळाचे क्षेत्र तणविरहित ठेवावे. त्यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली निंदणी व कोळपणी आणि पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दुसरी निंदणी व कोळपणी करावी.
  8. जरुरीप्रमाणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मुख्यतः फुले येण्याच्या कालावधीत नव बोंड्या भरण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. तीळ पिकास जमिनीच्या मगदुरानुसार सरासरी ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

तिळाचे महत्त्व ः

  • तिळामध्ये तेलाचे ५० टक्के आणि प्रथिनांचे २५ टक्के प्रमाण.
  • तेलामधील ज्वलनविरोधक घटक सिसमोल, सिसॅंमोलीन. दीर्घकाळ चांगले टिकते, खवट होत नाही.
  • पेंडीत प्रथिने ३५ ते ४५ टक्के. कॅल्शियम, फॉस्फरसचे चांगले प्रमाण.
  • पशू व कोंबडीसाठी पेंड उत्तम खाद्य.
  • जात ः एकेटी-१०१ ः

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली एकेटी-१०१ जात ९० ते ९५ दिवसांत पक्व होते.
  • दाण्याचा रंग पांढरा. प्रतिहेक्‍टरी ७.५ ते ८ क्विंटल उत्पादन.
  • पर्णगुच्छ, मूळ आणि खोड कुजव्या रोगास साधारण प्रतिकारक.
  • तेलाचे प्रमाण ४८ ते ४९ टक्के.
  • संपर्क ः डॉ. मधुकर बेडीस, ९३०९८४५५८६ (तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com