द्राक्षावर रोगांचा धोका वाढला

पावसाळी वातावरणामुळे द्राक्षावर रोगांचा धोका वाढला
पावसाळी वातावरणामुळे द्राक्षावर रोगांचा धोका वाढला

सर्व द्राक्ष विभागामध्ये गेले दोन तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. या नंतर पुढील पंधरा दिवसांपर्यंत पावसाची शक्यता फारशी दिसत नाही. त्यानंतर पुणे, सांगली, सोलापूर भागामध्ये २९ -३० नोव्हेंबर नंतर पुन्हा पावसाळी वातावरण होण्याची शक्यता आहे. पाऊस २८ तारखेनंतर पडेलच, असे आता सांगणे कठीण आहे. कदाचित आणखी आठ दिवसाने त्याविषयी अधिक चांगल्या प्रकारे अंदाज देता येईल. परंतु, पावसाळी वातावरण होईल, अशी सूचना आलेली असताना ती संपूर्णपणे दुर्लक्षित करणे योग्य नाही. दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाची नोंद घेऊन पुढील दहा ते पंधरा दिवस पाऊस पडणार नाही. त्यानंतर असेलल्या पावसाच्या शक्यतेचा विचार करून या वेळी द्राक्ष सल्ला देण्याचा प्रयत्न आहे. दोन तीन दिवसांच्या पावसामुळे आर्द्रता वाढलेली आहे. सकाळच्या वेळी पुन्हा दव पडण्यास सुरवात झाली आहे. रात्रीच्या तापमानामध्ये मागील दोन तीन दिवसांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. रात्रीचे तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. या सर्व घटकांमुळे डाऊनी मिल्ड्यूचा धोका निश्चितच वाढलेला आहे. परंतु, दुपारचे तापमान इथून पुढे ३० ते ३५ अंश सेल्सिअस पर्यंत राहील. त्यामुळे पुढील काही दिवसांत डाऊनीचा धोका पुन्हा कमी होईल. या गोष्टीचा विचार करता काही विशेष उपाययोजना सुचवत आहोत.

  • ज्या बागांमध्ये फुलोरा ते फळधारणेच्या दरम्यान अवस्था आहेत, तिथे डाऊनीचा धोका जास्त आहे. अशा ठिकाणी सीएए जातीतील बुरशीनाशके वापरणे फायद्याचे होईल. त्यात डायमिथोमॉर्फ १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब दोन ग्रॅम (टॅंक मिक्स) प्रति लिटर किंवा इप्रोव्हॅलीकार्ब अधिक प्रोपीनेब ३ ग्रॅम प्रति लिटर (संयुक्त बुरशीनाशक) किंवा सायमोक्झॅनिल अधिक मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर (संयुक्त बुरशीनाशक) यांचा वापर करता येईल. शक्यतो पावसाआधी वापरलेल्या बुरशीनाशकाचा वापर पावसानंतर केल्यास नियंत्रण चांगले मिळू शकेल. या बुरशीनाशकांच्या वापरानंतर विश्लेषणात रेसिड्यू निश्चितपणे आढळतील. परंतु, या रसायनांचा वापर यापुढे न झाल्यास रेसिड्यू एमआरएल पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्या प्रमाणे अनेक्श्चर पाच मध्ये ज्या रसायनाची एमआरएल सर्वांत जास्त आहे, किंवा ज्या रसायनांचा वापर यापूर्वी जास्त झालेला नाही, त्या रसायनांच्या वापरास प्राधान्य देणे महत्त्वाचे राहील.
  • युरोपातील निर्यातीसाठी द्राक्ष बागेचे व्यवस्थापन केले जात असेल तर फुलोऱ्यातील ते फळधारणेच्या काळातील बागांमध्ये फोसेटील एएल २.५ ते ३ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर (टॅंक मिक्स) वापरल्यास डाऊनीचे चांगले नियंत्रण मिळू शकेल. परंतु चीन किंवा रशियामधील निर्यातीसाठी द्राक्ष उत्पादन घेत असाल तर फोसेटील एएल (एमआरएल १० पीपीएम चीनसाठी आणि ०.८ पीपीएम रशियासाठी) व तत्सम रसायनांचा वापर सुरक्षित नाही हे लक्षात घ्यावे.
  • छाटणीनंतरच्या साठ दिवसांच्या पुढे असलेल्या बागेमध्ये डाऊनीसाठी सीएए जातीतील बुरशीनाशके वापरणे रेसिड्यूच्या दृष्टीने धोक्याचे होऊ शकते. या ठिकाणी साठ दिवसानंतरच्या बागेत फोसेटील एएल वापरल्यास डाऊनीचे नियंत्रण मिळू शकेल. मात्र त्यामुळे द्राक्षाची निर्यात केवळ युरोपीय देशांसाठी करणे शक्य होईल.
  • ज्या बागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये पानावर किंवा घडावर डाऊनी रोग आढळलेल्या व छाटणीनंतर साठ दिवसांपुढे असलेल्या बागेमध्ये सध्या डाऊनीचा धोका आहे. वरील दोन पर्यायांचा योग्य विचार करून फवारणीचा निर्णय घ्यावा. फक्त जुने प्रादुर्भाव नसलेल्या बागांमध्ये डायथायोकार्बामेट जातीतील बुरशीनाशकांचा वापर हा नव्याने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगी पडेल. डायथायोकार्बामेट जातीतील बुरशीनाशकाची एमआरएल युरोपिय देशांसाठी पाच पीपीएम आहे.
  • बागेमध्ये ढगाळ वातावरण व जास्त आर्द्रता (८० टक्क्यापेक्षा अधिक) अधिक दिवस राहिल्यास भुरीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. सध्याच्या वातावरणामध्ये भुरीचा धोका सर्वच द्राक्ष विभागात जास्त आहे. त्यामुळे भुरीच्या नियंत्रणासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
    1. फुलोऱ्यापासून फळधारणेपर्यंत असलेल्या बागांसाठी, आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर होऊ शकतो. अनेक्श्चर ५ मध्ये दिलेल्या यादीप्रमाणे ज्या बुरशीनाशकांचा पीएचआय ४५ ते ६० दिवस दर्शवला आहे त्यांचा वापर फळधारणेच्या आधी शक्य आहे. अशा रसायनांचा वापर आता केल्यास नियंत्रण चांगले मिळू शकेल.
    2. छाटणीनंतरच्या साठ दिवसांनंतरच्या काळात ज्यांचा पीएचआय २२ ते ३० दिवस दर्शवला आहे , त्या बुरशीनाशकांचा वापर करणे शक्य आहे. शक्य झाल्यास फक्त सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात वापरावे. (पीएचआय १५ दिवस). कारण सल्फरचा वापर करताना जैविक नियंत्रक घटकांचा वापर करणेही शक्य आहे.

    जैविक नियंत्रणाचा वापर :

  • जैविक नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्मजीवांनाही ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रता फायदेशीर आहे. जोपर्यंत वातावरणामध्ये जास्त आर्द्रता आहे, तोपर्यंत बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य जैविक नियंत्रक घटक चांगले काम करू शकतात. आता झालेला पाऊस आणि पंधरा दिवसांनंतरचा अपेक्षित पाऊस याचा विचार करता जैविक नियंत्रणाचा वापर करणे अतिशय आवश्यक आणि फायद्याचे होऊ शकते. म्हणूनच बुरशीनाशकांचा वापर करताना जैविक नियंत्रकांचा वापर करणे आवश्यक आहे. डायथायोकार्बामेट व ट्रायअझोल बुरशीनाशकांचा वापर जास्त झाल्यास जैविकदृष्ट्या नियंत्रण करणाऱ्या बुरशी व जिवाणू कमी प्रमाणात यशस्वी होतील. फोसेटील एएल आणि सल्फर यांचा वापर केल्यास जैविक नियंत्रक घटक चांगले काम करतील. जैविक नियंत्रक घटकांचा वापर करताना बुरशीनाशकांच्या वापराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
  • ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलीस मुळांमध्ये ड्रिपद्वारे सोडल्यास डाऊनी व भुरी या दोन्ही रोगांविरुद्ध झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढते. बुरशीनाशकांचे परिणाम अधिक चांगले मिळण्यास मदत होते. ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलीस आर्द्रता जास्त असताना फवारल्यास डाऊनी व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी फायदा होतो.
  • अॅम्पिलोमायसीस फवारणीसाठी वापरल्यास भुरीच्या नियंत्रणासाठी फायदा होतो. पावसामुळे तयार झालेल्या जास्त आर्द्रतेचा फायदा जैविक नियंत्रणाचा वापर केल्यास व योग्य बुरशीनाशकांची जोड दिल्यास बागेतील रोगनियंत्रण निश्चितच सोपे होईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com