काकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात. खरबुजाच्या बियांचे तेल जास्त पौष्टिक अाणि थंड गुणाचे आहे. तर अतिसार, कॉलरा, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतडय़ातील रक्तस्राव इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे. काकडी बी
उत्तर भारतात काकडी, खिरा, बालमखिरा, तरकाकडी, वालूक अशा वेगवेगळय़ा नावाच्या काकड्यांच्या बिया वाळवून त्यांच्या मगजाचा वापर पौष्टिक म्हणून केला जातो. काकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात. आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात. शोष पडणे किंवा खूप तहान लागत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्यात. काकडीच्या बियांचा वाटून केलेला शिरा पौष्टिक असतो. हिवाळय़ामध्ये वजन वाढविण्याकरिता उपयोग होतो. खिरा किंवा खजुराच्या बियांच्या मानाने काकडीच्या बिया कमी पौष्टिक आहेत. पण त्या पित्त कमी करण्याचे कार्य चांगले करतात. काकडीच्या बियांचा वाटून केलेला लेपामुळे चेहऱ्याची त्वचा सुधारते. काकडीच्या बिया या उत्साहवर्धक आहेत. उन्हाळ्यात अंगावर उष्णतेचे फोड उठणे, ताप या तक्रारींत काकडीच्या बियांचे सरबत उत्तम अाहे . खरबुजाच्या बियांचा मगज दीर्घकाळ येणाऱ्या तापावर उपयुक्त आहे. काकडी, खरबूज, कोहळा, कलिंगड व दुधीभोपळा अशा पाच प्रकारच्या बियांचा अष्टमांश काढा कडकी, जुनाट ताप यावर उपयुक्त अाहे. खरबुजाच्या बिया गरम केल्यास त्यातून तेल निघते. तेलाचे दहा-पंधरा थेंब घेतले की लघवी साफ होते. खरबुजाच्या बियांचे तेल जास्त पौष्टिक आहे. कॉडलिव्हर ऑइल इत्यादी महागडी तेले उष्ण असतात. खरबुजाच्या बियांचे तेल थंड गुणाचे आहे. पौष्टिक आहे. उन्हाळ्यात अंगावर फोड आल्यास किंवा सनस्ट्रोकसारख्या अवस्थेत खरबुजाच्या बियांचा मगज हितकर आहे. शारीरिक सौंदर्य, त्वचाविकार, व्यंग, फोड याकरिता खरबुजाच्या बिया वाटून लावाव्या. त्वचा नितळ व स्वच्छ होते. अतिसार, कॉलरासारखे वारंवार जुलाब होणे, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतड्यातील रक्तस्राव इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे. खसखशीचे कार्य मधुर रसासारखे पण उष्ण आहे. स्निग्ध व मलावष्टंभ आहे. कफ पित्त वाढवून वातशमन करणाऱ्या पदार्थात खसखस जास्त उपयोगी आहे. कारण त्याच्या वापराने जुलाब होत नाहीत. खसखशीबरोबर साखर, बदाम, बेदाणा, चारोळी, खारीक, मनुका इत्यादी पदार्थ वापरून लापशी करावी. खूप कृश झालेल्या व्यक्तीने हिवाळ्यात खसखस लापशी जरूर घ्यावी. प्रकृती सुधारते, झोप येत नसल्यास साखर किंवा मधाबरोबर खसखशीचा काढा झोपताना घ्यावा. आमातिसार, पोट दुखून जुलाब होत असल्यास खसखस ताकात वाटून चवीपुरते मीठ मिसळून घ्यावी. बदाम पचायला जड पडू नयेत म्हणून खसखशीचा उपयोग होतो. टीप ः सर्व उपचार तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला)