लागवडीस अयोग्य जमिनीवरील मृद संधारणासाठी जलशोषक समतल चर, समपातळी सलग चर यांना प्राधान्य दिले जाते. तर वहितीखालील क्षेत्रात जागच्या जागी पावसाचे पाणी मुरविण्यासाठी वेगवेगळ्या मशागत पद्धतीचा अवलंब करावा. पाणलोटातील ओहळीत मृद व जलसंधारणासाठी दगडाचे बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, मातीचे नाला बांध बांधावेत.
जमिनीच्या धुपीबरोबरीने मातीतील अन्नद्रव्ये वाहून जातात. हे थांबविण्यासाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हा महत्त्वाचा मार्ग आहे. पाणलोट क्षेत्र विकासाचा प्रमुख हेतू म्हणजे त्या भागातील जमीन, पाणी आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा कार्यक्षम वापर करून कमीत कमी खर्चात शेती उत्पादन वाढविणे. यात सातत्य राहावे यासाठी पाणलोट क्षेत्रात मृद व जलसंधारणासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. माथ्यापासून पायथ्यापर्यंतचे कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र व साठवण क्षेत्र अशी विभागणी करण्यात येते. प्रथम अपधाव क्षेत्र व साठवण क्षेत्र अशी विभागणी करण्यात येते. प्रथम अपधाव क्षेत्रात, नंतर पुनर्भरण क्षेत्रात कामे पूर्ण केल्यानंतर साठवण क्षेत्रात कामे करावीत. जैविक आणि अभियांत्रिकी कामे उद्दिष्टानुसार करावी.
लागवडीस अयोग्य जमिनीवरील मृद संधारणासाठी जलशोषक समतल चर, समपातळी सलग चर यांना प्राधान्य दिले जाते. तर वहितीखालील क्षेत्रात जागच्या जागी पावसाचे पाणी मुरविण्यासाठी वेगवेगळ्या मशागत पद्धतीचा अवलंब करावा. पाणलोटातील ओहळीत मृद व जलसंधारणासाठी दगडाचे बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, मातीचे नाला बांध बांधावेत. अवर्षणाची परिस्थिती बराच काळ लांबल्यावर भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी खाली जाते. नदी, ओढे, तलाव यातील पाणी कमी होते. या परिस्थितीला जल-अवर्षण असे म्हणतात. अवर्षण प्रवण प्रदेशाच्या कार्यक्रमामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची कामे प्रामुख्याने करावीत. प्रत्येक गाव शिवारातील पाणी त्या शिवारातच कसे अडवून जिरविले जाईल याकडे लक्ष द्यावे. यासाठी प्रत्येक शेतशिवारात पाणलोट क्षेत्र विकास महत्त्वाचा आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे पद्धतशीरपणे संवर्धन होते. वहितीखालील क्षेत्र निकृष्ट होण्याची क्रिया कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे थांबविण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने मृद व जल या दोन नैसर्गिक संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करावे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील पाणी आणि माती आपल्याच शेतात राहील याची दक्षता घ्यावी. मृद व जलसंधारणाची कामे वेगवेगळ्या यंत्रणेच्या नियंत्रणाखाली, पाणलोट क्षेत्रात उपलब्ध निधीनुसार व प्राधान्यक्रमानुसार राबवावी. ही सगळी कामे एकमेकांना पूरक आहेत. सर्व घटकांची एकत्रितपणे एकाच पाणलोट क्षेत्रात परस्परांशी सांगड घालून कामे केली, तर त्याचा निश्चितच अधिक फायदा होईल. पावसाच्या अनियमितपणामुळे दिवसेंदिवस पाण्याचा साठा कमी होत आहे. पावसाचे पडणारे पाणी जमिनीच्या उताराप्रमाणे वाहत जाते. त्यापैकी काही जमिनीत मुरते तर बरेचसे जमिनीवरून वाहून जाते. जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. त्याची बरीच कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे जमिनीवरील गवत, झाडे, झुडपे यांचे आच्छादन कमी झाल्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होते. खालावलेली भूजल पातळी पूर्वस्थितीत आणणे अत्यंत आवश्यक आहे. भूजल पुनर्भरण म्हणजे उपसलेल्या पाण्याच्या जागी पुन्हा पावसाचे पाणी विविध उपायांनी मुरविणे. आज नैसर्गिकरित्या जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे विविध कृत्रिम उपायाद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविता आले पाहिजे. वाहून जाणारे पाणी अडवून किंवा त्यांचा वेग कमी करून ते पाणी मातीशी जास्त वेळ संपर्कात ठेवले पाहिजे. मानवनिर्मित जलसंधारण उपायांद्वारे हे भूजल पुनर्भरणाचे प्रमाण निश्चितपणे वाढविता येते. शेत पातळीवर पाणी अडवून जिरविण्यासाठी खोल नांगरणी, उताराला आडवी नांगरणी केल्याने पावसाचे वाहते पाणी कमी वेगाने थांबून वाहते. जमिनीत जास्त प्रमाणात मुरते. मृद-जलसंधारणाच्या उपाययोजना नाला बंडिंग
नाल्यात मातीचे नाला बांध बांधल्यास पावसाचे वाहणारे पाणी दीर्घकाळ साठवून राहाते. नाल्यामध्ये साठलेले पाणी जमिनीत कालांतराने मुरत जाते. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. नाल्याच्या प्रवाहामधून उजव्या आणि डाव्या बाजूने पाणी वळविण्याची सोय असल्यास वाहणारे पाणी शेतातून फिरत येते. यातूनच हे पाणी जमिनीत झिरपून पाणी अडविणे, जिरविणे हे साध्य होते. बंधाराच्या पाणलोट क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे केल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरते. हे मुरलेले पाणी झऱ्याच्या स्वरूपात नदी किंवा विहिरीत पुन्हा येते. गावाच्या आसपास खोलगट जमिनीत जेथे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहत येते तेथे मातीचा बंधारा तयार करून गावतळे तयार होते. गावतळ्यात पाण्याचा साठा जास्तीत जास्त कसा करता येईल याकरिता स्थानिक पातळीवर नियोजन करावे. दर तीन वर्षांनी गावतळ्यातील गाळ काढावा. जेणेकरून पाणीसाठा कमी होणार नाही. गावतळ्यात साठलेले पाणी दीर्घकाळ साठून जमिनीत झिरपते. त्यामुळे खालील बाजूस असणाऱ्या विहिरीमधील पाण्याच्या पातळीत चांगली वाढ होते. काही गावातील पाणलोट क्षेत्रातून वाहणारे नाले अरुंद असतात. दोन्ही तिरांवर खडक आढळतो. अशा ठिकाणी दगडी बंधाऱ्याचा उपयोग पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत झिरविणे यासाठी करावा. दगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील गोष्टी बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून असतात. बंधाऱ्यात पाणीसाठा जास्त झाल्यास अधिक येणारे पाणी बंधाऱ्यातून वाहून जाते. यामुळे बंधारा बांधताना हे पाणी बाजूच्या शेतजमिनीतून जाऊ नये याप्रमाणे बांधकाम करावे. ज्या भागात विहीर नसेल तेथे रिचार्ज पीट तयार करून छतावरील किंवा इतर ठिकाणचे पाणी जमिनीत मुरविता येते. हे पीट २.५ ते ३ मीटर खोल तसेच १.५ ते ३ मीटर लांबी रुंदीचे असावेत. यात मोठे दगड, छोटे दगट तसेच वाळू/रेतीचा चाळा भरावा आणि त्याचा पृष्ठभाग कुठल्याही जाळीने झाकावा जेणे करुन पाण्यासोबत येणारा कचरा यात जाणार नाही. सांडपाणी किंवा पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शोष खड्ड्याचा वापर करावा. शोष खड्डा तयार करताना १.५ ते २ मीटर लांबी, रुंदी तसेच २ ते २.५ मीटर खोल खड्डा तयार करून त्यात दगड विटा भरून तयार करावा. पाणलोट क्षेत्रातील गावात पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये पाणी पुनर्भरणाची प्रक्रिया वेगाने व्हावी हे उद्दिष्ट समोर ठेवून आज जमिनीत पाण्याचे पुनर्भरण यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पुनर्भरण चर हे पाणलोटात एक महत्त्वाचे कार्य आहे. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्त्रोत कायम होण्यासाठी मदत होते. पाणी जमिनीच्या आत साठवून राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. पुनर्भरण चराविषयी तांत्रिक बाबी
ज्या पाणलोटात नाला, विहीर आहे त्या नाल्याच्या खाली पुनर्भरण चर खोदावयाचा असल्यामुळे नाल्याचा तळ ४ ते ५ सें.मी. पर्यंत कच्च्या मुरमाचा असावा. पुनर्भरण चर भरण्यासाठी लहानमोठ्या दगडांची आवश्यकता असते. दगड कमीत कमी अंतरावर उपलब्ध असणे आवश्यक आहे. नाल्याची रुंदी १० मीटर एवढी असेल तर नाल्यात १० मीटर रुंद आणि ४ ते ७ मीटर खोलीचा खड्डा खोदावा आणि लांबी २० ते ३० मीटर उपलब्धतेनुसार ठेवावी. येथे गोल दगड वापरणे सोईचे असते. दगड हे २० ते ५० सें.मी. व्यासाच्या आकाराचे असावे. हे पुनर्भरण चर खोदत असताना कठीण खडक लागला तर उंची तेथपर्यंतच ठेवावी. तसेच खोदकाम केल्यानंतर निघणारी माती नाल्याच्या दोन्ही काठांवर समान पसरावी. पुनर्भरण चर खोदल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण जवळजवळ ६ ते ८ महिने सतत होत राहते. संपर्क : डॉ. मदन पेंडके, ९८९०४३३८०३ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी )