केळी बागेवर लक्ष द्या

केळी बागेवर लक्ष द्या
केळी बागेवर लक्ष द्या

राज्याच्या बऱ्याच भागात थंडी वाढू लागली आहे. केळी फळपिकासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पीकवाढीवर अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना कराव्यात.   सद्यस्थितीत मृगबाग लागवडीतील केळफूल निसवण्याच्या अवस्थेत आहे. कांदेबाग लागवड मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. थंडीचा परिणाम या दोन्हीही बहरातील पिकांवर होतो.

थंडीचा होणारा परिणाम : ऊतिसंवर्धित लागवडीवर होणारा परिणाम : ऊतिसंवर्धित रोपांना जमिनीच्या वातावरणाबराेबर जुळवून घेण्यासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची आवश्‍यकता असते. ज्याठिकाणी उशिराची कांदेबाग लागवड केली जाणार असेल त्याठिकाणी वाढत्या थंडीमध्ये रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

मुळावर होणारा परिणाम : ज्याठिकाणी ऊति संवंर्धित रोपांची कांदेबाग लागवड झालेली आहे, अशा ठिकाणी कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी राहते. तसेच कमी तापमानामुळे मुळांची अन्न व पाणी शोषणाची कार्यक्षमता घटते.   पानांच्या वाढीवर होणारा परिणाम : केळीला दरमहा सरासरी ३ ते ४ पाने येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग (दरमहा २-३ पाने) मंदावतो. कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात. त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. परिणामी प्रकाशसंश्‍लेषण क्रिया (अन्न तयार करण्याची प्रक्रिया) मंदावून झाडांची वाढ खुंटते. उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

पीकवाढीवर होणारा परिणाम : कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते. परिणामी मृगबागात खोडातून केळफुल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी केळी निसवण्याचा कालावधी लांबून उत्पादन खर्च वाढतो. क्वचित प्रसंगी केळफुल अर्धवट बाहेर येऊन खोडातच अटकून बसते. त्यामुळे पूर्ण नुकसान होते.

बुंधा व घडावर होणारा परिणाम : कमी तापमानामुळे केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसतात. थंडीचे प्रमाण वाढत जाईल तसतसे हे चट्टे वाढून घड सटकतो.

फळवाढीवर होणारा परिणाम : थंडीच्या काळात घडातील केळीची वाढ खूप सावकाश होते. घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो.   रोगाचा प्रादुर्भाव : करपा (सिगाटोका) तसेच जळका चिरुट या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

उपाय योजना :

  • ऊती संवर्धित रोपांच्या लागवडीनंतर  बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगनियंत्रणाच्या मुद्द्यात  दिल्याप्रमाणे  बुरशीनाशकांची फवारणी आणि आळवणी करावी.
  • बागेच्या चोहोबाजूंनी वारा संरक्षक उंच वाढणाऱ्या वनस्पती जसे की गजराज, शेवरी, गिरीपुष्प इत्यादींची २ ते ३ ओळीत दाट लागवड करावी.
  • प्रतिझाड पाच किलो शेणखत द्यावे.
  • बागेस प्रति एकरी युरिया २० ते २५ किलो याप्रमाणे खतमात्रा द्यावी. पालाश ८२ ग्रॅम प्रतिझाड द्यावे.   
  • खोडालगत आच्छादन करावे. त्यामुळे थंडीचा मुळांच्या वाढीवर परिणाम होत नाही.
  • बागेस रात्री पाणी द्यावे.
  • रात्रीच्या वेळी बागेच्या चोहोबाजूने काडीकचरा जाळून धूर करावा.
  • ह्युमिक अॅसिड २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी .
  • रोग नियंत्रण : करपा (सिगाटोका) आणि जळका चिरुट, बुरशीजन्य रोग  : फवारणी : (प्रतिलिटर पाणी)  प्रोपीकोनॅझोल (२५ ई.सी.) १ मि.लि. किंवा  कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १ मि.लि. सूचना : उतिसंवर्धित रोपांना वरीलप्रमाणेच आळवणी करावी.

    संपर्क :  आर. व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com