सद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. पुढील दोन ते अडीच महिने तापमान जास्तच राहणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये केळी बागेचे उन्हापासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी वारे या घटकांचा केळी पिकावर प्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. अधिक तापमानामुळे वातावरणातील सापेक्ष आर्द्रता कमी होणे तसेच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे आदी अप्रत्यक्ष परिणाम होतात.
उन्हाळ्यात केळी बागेच्या व्यवस्थापनामध्ये वारारोधक कुंपणाचे खूप महत्त्व आहे. लागवडीच्या वेळी बागेच्या भोवती चारही बाजूंनी वारारोधक सजीव कुंपण करणे आवश्यक आहे. यासाठी केळी बागेच्या बाहेरील बाजूच्या ओळीपासून २ मीटर अंतर सोडून शेवरी, गजराज गवत, बांबू या झपाट्याने वाढणाऱ्या वारारोधक पिकांची दोन ओळींची दाट लागवड केळी लागवडीनंतर लगेच करावी. उन्हाळ्यापर्यंत या सजीव कुंपणाची वाढ पूर्ण होते. ही कुंपणे उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्णलाटेपासून तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून बागेचे संरक्षण करतात. त्यामुळे केळीच्या बागेत सुसह्य तापमान, आर्द्रता टिकून राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. वाऱ्याला अटकाव घातला गेल्याने पाने कमी प्रमाणात फाटतात. घड सटकण्याच्या आणि झाडे उन्मळून पडण्याच्या प्रमाणात घट येते. अधिक खर्च करायची क्षमता असल्यास बागेभोवती शेडनेटचे वारारोधक कुंपण उभे केल्यास त्वरित चांगले परिणाम मिळतात. केळी पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असते. एकूण पिकाच्या कालावधीत केळीला १६०० ते २००० मि.मी. पाण्याची गरज असते. त्यासाठी ठिबकसिंचन पद्धतीने मृगबाग केळीला एप्रिल महिन्यात १८ - २० लिटर तर मे महिन्यात २० - २२ लिटर पाणी प्रति झाड/दिन द्यावे. कांदेबागेसाठी या दोन्ही महिन्यामध्ये प्रतिझाड प्रतिदिन १० ते १४ लिटर पाणी द्यावे. उन्हाळ्यात केळी पिकाच्या पोषणासाठी निसवणीच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेतील मृग बागेस प्रतिहजार झाडांसाठी १२ आठवड्यांपर्यंत प्रतिआठवडा युरिया ५.५ किलो आणि म्युरेट आॅफ पोटॅश ७ किलो अशी खतमात्रा द्यावी. मुख्य वाढीच्या अवस्थेत असलेल्या कांदे बागेस प्रतिहजार झाडास प्रति आठवडा युरिया १३ किलो युरिया आणि म्युरेट आॅफ पोटॅश ८.५ किलो ठिबकसिंचन संचातून द्यावे. व्यवस्थित पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पीक सशक्त राहते आणि त्याच्या प्रतिकार क्षमतेत वाढ होते. उन्हाळ्यात मृग बाग लागवडीची केळी घड निसवणीच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेेत असते. घड पूर्ण निसवल्यानंतर तसेच केळफुल तोडल्यानंतर घडावर पोटॅशियम डायहायड्रोजन फाॅस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम अधिक सरफेक्टंट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी पाॅलिप्राॅपलीन कापडाची स्कर्टिंग बॅग किंवा पिशवीने घड झाकावा. वाळलेल्या केळीच्या निरोगी पानांचाही घड झाकण्यासाठी वापर करता येतो. पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या घडांना आधार देणे आवश्यक आहे. त्यासाठी घडांना बांबूचा किंवा पाॅलिप्राॅपलीन पट्ट्यांचा आधार द्यावा. केळी बागेमध्ये ३० मायक्राॅन जाडीच्या चंदेरी /काळ्या रंगाच्या पाॅलिइथिलीन कापडाचे आच्छादन करावे. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो; पाण्याची बचत होते. त्याशिवाय झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाणही खूप कमी राहते. एकूण उत्पादनात वाढ होते. ज्यांना पाॅलिथीनचे आच्छादन टाकणे शक्य नाही त्यांनी केळीच्या दोन ओळीत उसाचे पाचट, गव्हाचा भूस्सा, सोयाबीनचा भूस्सा यांचे सेंद्रिय आच्छादन करावे. केळीच्या पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या वेग नियंत्रित करण्यासाठी पानांवर बाष्परोधकांची फवारणी करावी. त्यासाठी उन्हाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने केओलीन भुकटी ८० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. संपर्क : एन. बी. शेख, ७५८८०५२७९२, (केळी संशोधन केंद्र, जळगाव.)