एक हेक्टर ऊस क्षेत्रातून सुमारे ८ ते १२ टन पाचट मिळते, त्यापासून ५ ते ६ टन सेंद्रिय खत खोडवा पिकाला मिळतेे. पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारे नत्र ४० ते ५० किलो स्फुरद, २० ते ३० किलो व पोटॅश ७५ ते १०० किलो पुढील पिकास उपलब्ध होते. ऊस तुटून गेल्यानंतर प्रतिहेक्टरी सरासरी १० टन इतके पाचट शेतात उपलब्ध होते. सध्या ७० टक्के शेतकरी हे पाचट जाळून टाकत आहेत. त्यामुळे केवळ ५ टक्के म्हणजे सुमारे हेक्टरी ५०० किलो पाचटाची राख शिल्लक राहते. तसेच मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होऊन उष्णतेने जमीन आणि त्यातील उपयुक्त जिवाणू आणि गांडुळावर परिणाम होतो. राज्यातील ऊस क्षेत्राचा विचार करता ७० ते ८० लाख टन पाचट जाळले जाते. ही बाब पर्यावरणाबरोबरच जैविक विविधतेला आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.
ऊस तोडणीनंतर शिल्लक राहणारे पाचट न जाळता शेतात ठिबक सिंचन असल्यास सर्व सरीत व पाटाद्वारे पाणी देण्यात येत असल्यास एक आड एक सरीत ठेवल्यास जमीन, पाणी व पर्यावरण संवर्धन होईल. एक आड एक सरीत पाचटाच्या आच्छादनामुळे तण उगवत नाही. त्यामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात व श्रमात ५० टक्के बचत होते. कृषी संशोधन संस्थांच्या शिफारशीनुसार ऊस पिकास हेक्टरी २.५ ते ३.५ कोटी लिटर पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो. पाचट ठेवल्याने आपणास केवळ रिकाम्या ५० टक्के सरीतच पाणी द्यावे लागते. परिणामी हेक्टरी १.२५ ते १.५० कोटी लिटर पाण्याची व ते वहन करण्यासाठी आवश्यक सुमारे १०० ते १२५ युनिट विजेची बचत होते. राज्यामध्ये एकूण उपलब्ध सिंचन क्षमतेच्या सुमारे ५७ टक्के सिंचनक्षमता सर्वसाधारण ७ ते ८ टक्के क्षेत्रावरील ऊस पिकासाठी वापरली जाते. ५० टक्के पाणीबचत करणाऱ्या ठिबक सिंचन पद्धतीचा प्रसार होण्यामध्ये आर्थिक गुंतवणूक, भौगोलिक परिस्थिती व तुकडीकरणामुळे काही अंशी मर्यादा येत आहेत. अशा वेळी विनाखर्चाचे व कमी कौशल्याचे पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञान ऊस पिकातील पाणीवापराच्या कार्यक्षमतेस निश्चित फायदेशीर ठरते. पाचटाच्या पूर्ण अच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. शेतात ओलाव्याचे प्रमाण दीर्घकाळ (१५ ते २० दिवस) टिकून राहते. त्यामुळे भारनियमामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते. ऊस उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते. एक हेक्टर ऊस क्षेत्रातून सुमारे ८ ते १२ टन पाचट मिळते, त्यापासून ५ ते ६ टन सेंद्रिय खत विनाखर्च विनावाहतूक खोडवा पिकाला मिळते. पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्नद्रव्ये उदा. नत्र ४० ते ५० किलो स्फुरद, २० ते ३० किलो व पोटॅश ७५ ते १०० किलो पुढील पिकास उपलब्ध होते. जमिनीचे तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसने थंड राखले जाते. शेतात गांडुळाची व उपयुक्त जिवाणूची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते, त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. पाचटातील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात. जलसंधारण शक्ती वाढते. पाचट कुजल्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक मिसळले जातात. संपर्क : एन. एस. परीट ९४२३२८६५६६ (तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा, जि. कोल्हापूर)