जनावरांच्या शरीराला लवचिकता पाण्यामुळे येते. पचनक्रियेत अन्नघटक विरघळून ते संपूर्ण शरीरात पुरवले जातात. पाण्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान स्थिर राहण्यास मदत होते.
शरीरातील टाकाऊ व विषारी घटकपदार्थ शरीराबाहेर मूत्र आणि घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जनावरांच्या शरीराला पाणी कमी पडले तर गंभीर आजार होऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने डोळे कोरडे होतात, कातडी अंगाला चिकटते, जनावरांच्या वजनात घट होते, शरीरातील विषारी घटक मूत्रद्वारे, घामाद्वारे शरीराबाहेर टाकले जाऊ शकत नाहीत, त्याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होतो. मूत्रपिंड व मूत्राशयावर परिणाम होतो. दूध देण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटते. नेहमी स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी द्यावे. दिवसातून कमीत कमी तीन वेळेस पाणी पाजावे. जनावर गाभण असेल तर दिवसातून ४ ते ५ वेळेस पाणी पाजावे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, चव,वास, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा सामू व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इ. वर अवलंबून असते. पाणी हे स्वच्छ, रंगहीन व मुबलक प्रमाणात द्यावे. रंग असलेले पाणी जनावरांना पाजू नये.पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास नसावा. पाण्याला उग्र चव नसावी. पिण्याच्या पाण्याचे तापमान हे खूप कमी किंवा खूप जास्त नसावे. गाभण जनावरांना देण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये जैविक तत्त्वे, क्षार, धातूचे कण प्रमाणापेक्षा जास्त नसावेत. जनावरांना पाण्याची आवश्यकता ही त्यांचा आहार, जात, गर्भावस्था, वातावरणातील तापमान, आरोग्य तसेच दूध उत्पादनावर अवलंबून असते. दुभत्या जनावरांना दिवसातून कमीतकमी चार वेळेस पाणी पाजले तर दूध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. उन्हाळ्यात जनावरांना ४ते ५ वेळेस पाणी पाजावे. पाण्याचे तापमान जर जास्त असेल तर जनावरे गरजेपेक्षा कमी पाणी पितात. त्यामुळे त्याचा परिणाम थेट दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे जनावरांचे पिण्याचे पाणी सावलीत साठवावे. जनावरांच्या ओल्या चाऱ्यात ६५ ते ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे जनावरांनी ओला चारा जास्त प्रमाणात खाल्ला तर ते कमी पाणी पितात. तर सुका चारा जास्त प्रमाणात खाल्ला तर जास्त पाणी पाजावे. नवीन आणलेली जनावरे पाण्यातील बदलामुळे कमी पाणी पितात. अशावेळी पाण्यात थोडा गूळ मिसळून पाणी पाजावे. जनावर आजारी असल्यावर सुद्धा कमी पाणी पिते. अशावेळी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. दुभती जनावरे, गाभण जनावरे, लहान वासरे, भाकड जनावरे यांना पाणी स्वच्छ व मुबलक प्रमाणात मिळेल याकडे लक्ष द्यावे. संपर्क : अजय गवळी - ८००७४४१७०२ (क.का.वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,नाशिक)