गोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना कासदाह होतो. यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते. दुग्धोत्पादनावर परिणाम होतो.
गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जनावर बैचेन होते. जनावराच्या पायाशी शेण, काडीकचरा असेल तर ते खाली बसत नाही. गोठ्यात पाणी साचलेले असल्यास जनावर घसरण्याची शक्यता असते. गोठ्यातील जमीन समतल नसेल तर जनावरांना व्यवस्थित बसता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो. विशेषतः गर्भावस्थेमध्ये गाई, म्हशींची काळजी घेणे आवश्यक असते. या वेळेस जर पाय घसरला तर वाढ होणाऱ्या गर्भाला इजा होऊ शकते. गोठ्यात अस्वच्छतेमुळे गोचीडांचा प्रादुर्भाव होतो. गोचीड जनावरांचे रक्त शोषतात, जनावर त्यामुळे अस्वस्थ होते. त्यांच्या दूध देण्याच्या प्रमाणात घट येते. उष्णतेमुळे जनावरांना कडकी बसते, त्यामुळे जनावर अस्वस्थ होते. जनावरांना होणारा त्रास लक्षात घेता गोठ्यामध्ये त्यांना बसण्यासाठी रबराची गादी उपयुक्त ठरते. रबर गादी खास प्रकारच्या नैसर्गिक रबरापासून बनवतात. त्यामुळे जनावरांस कुठल्याही प्रकारची अलर्जी होत नाही. ही गादी ६.५ फूट बाय ४ फूट आणि ७ फूट बाय ४ फूट या आकारात उपलब्ध आहे. याची जाडी १५ मि.मी. आणि १७ मि.मी. असते. टिकवण क्षमताही चांगली असते. गादीवर जनावर आरामदायीपणे बसते. जनावरांस सहजपणे उठ-बस करता यावे तसेच त्याच्या अंगाला मॉलिश व्हावे यासाठी रबर गादीवर नक्षी असते. त्यामुळे गादीवरून जनावर घसरत नाही. रबर पाणी, मूत्र शोषणरहित असल्यामुळे स्वच्छता रहाते. कासदाह आजाराचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो. कासेला खडा किंवा गवताची काडी टोचून होणारी इजा टळते. गुडघ्याला येणारी सूज कमी होते. रबरी गादीमुळे जनावर स्वच्छ राहते. गादी स्वच्छ करणे सोपे जाते. जनावर माती, सिमेंट फरशीवर बसण्यापेक्षा रबरी गादीवर बसल्यास त्यास आराम मिळून खाद्य, पाणी सेवन करण्याची क्षमता वाढते. त्याचा दूध उत्पादनवाढीस फायदा होतो. जनावरांच्या खुरांची झीज होऊन होणाऱ्या जखमा आणि आजारापासून संरक्षण होते. संपर्क : अजय गवळी, ८००७४४१७०२ (पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)