नारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेल लावावेत.
नारळ, जायफळ यांच्या लागवडीसाठी १ x१ x१ मीटर आकाराचे, तर दालचिनी लागवडीसाठी ०.६० x ०.६० x ०.६० मीटर आणि काळी मिरी लागवडीसाठी ०.३० x ०.३० x ०.३० मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्ड्याच्या तळाशी कुजलेला पालापाचोळा किंवा गिरिपुष्पाचा पाला, दोन ते तीन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. खड्डा भरताना माती जमिनीच्या पृष्ठभागाच्या थोडी वर ठेवावी, जेणेकरून पाणी झाडाच्या बुंध्याशी साठणार नाही. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर किंवा मध्यभागी खुणेसाठी खुंट ठेवावी. पहिल्या वर्षी विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रताप, टी x डी या नारळ जातींची लागवड करावी. त्याचबरोबर दालचिनीची लागवडही करावी. पहिल्या वर्षी फक्त नारळ आणि दालचिनीची लागवड करावी. पाचव्या वर्षी जायफळ लागवड करावी. बागेमध्ये सुरवातीच्या काळात केळी किंवा पपईची मिश्र पीक म्हणून लागवड केल्यास मसाला पिकांना सावली तर मिळतेच; शिवाय केळी, पपईच्या उत्पादनामधून बागेच्या व्यवस्थापनावर होणारा खर्चही काही प्रमाणात भागविता येतो. मिश्र पीक म्हणून सुरवातीच्या काळात अननसाचीही लागवड करणे शक्य आहे. सातव्या वर्षी नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ मिरीच्या वेलांची लागवड करावी. बागेतील सर्व झाडे ही निरोगी आणि उत्पादनक्षम राहण्यासाठी योग्य खतांच्या मात्रा, पाणीपुरवठा; तसेच पीकसंरक्षणाकडे लक्ष द्यावे. त्यापैकी झाडास लागणारी अन्नद्रव्ये एकाच माध्यमातून न देता ती रासायनिक, तसेच सेंद्रिय खतांच्या माध्यमातून द्यावीत. संपर्क : ०२३५८-२८०५५८ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली