मळणीनंतर धान्याची साठवण करताना त्यात ओलावा असणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी तयार केलेले धान्य प्रथम स्वच्छ करून ३-४ दिवस खळ्यावर कडक उन्हात वाळवून मगच साठवावे. साठवण केल्या जाणाऱ्या धान्यात ओलावा असल्यास धान्याची उगवणशक्ती कमी होते. धान्याची प्रत ढासळते. धान्याचे गुणधर्म नष्ट होतात. तसेच कीडी व बुरशीपासून नुकसान होण्याची शक्यता वाढते. उंदीर तसेच कीटकापासून नुकसान टाळण्यासाठी शक्यतो पत्र्याच्या सुधारित कणग्यांचा वापर करावा. त्या पूर्णपणे हवाबंद असल्यामुळे धान्याला कीड लागण्याची शक्यता कमी असते. धान्यात प्रामुख्याने टोके, सोंडे, छोटे भुंगेरे, खापरा, पिठातील तांबडे भुंगेरे, दातेरी कडाचे भुंगेरे या कीडी आढळतात. धान्याची साठवण करण्यापूर्वी खोलीच्या भिंती व तळाची साफसफाई करून घ्यावी. भिंतीला असलेल्या चिरा बुजवून घ्याव्यात. कणग्या/कोठ्या तसेच रिकामी पोती स्वच्छ करुन घ्यावीत. कारण त्यामध्ये जिवंत किडी असतात. धान्य साठविल्यानंतर लागलेल्या किडीचे नियंत्रण फक्त धुरीजन्य किटकनाशकांद्वारे पासून करावे लागते. दुभत्या जनावरांना वर्षभर समतोल चारा उपलब्ध असणे आवश्यक आहे. समतोल आहार व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकदल व द्विदल अशी संमिश्र चारा पिके घ्यावीत. एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मे निम्मे असावेत. भरपूर व उत्कृष्ट प्रतीचा चारा सातत्याने मिळण्यासाठी धान्य पिकाप्रमाणे चारा पीक लागवडीचे नियोजन करावे. त्यासाठी योग्य चारा पिकाची निवड, जमिनीची निवड, शेताची मशागत, योग्य वाणांची निवड, खतपाणी व्यवस्थापन आदी गोष्टी विचारात घ्याव्यात. संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ७५८८०८२१३७ (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)