गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा विदर्भाला तडाखा बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता पिकांमध्ये सुधारणा होण्यासाठी, तसेच भावी काळातील कामांवर परिणाम होऊ नये यासाठी त्वरित काही उपाययोजना कराव्यात.
सर्वप्रथम शेतात साठलेले पाणी निचरा करून शेताबाहेर काढून टाकावे. मळणी व काढणी झालेली असल्यास पीक ताडपत्रीने झाकून ठेवावे. फळबागांमध्ये गारपिटीचे अधिक नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे तुटलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. फळांना इजा झाली असल्यास जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कॉपरऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. फळपिकांमध्ये फांद्या, खोडे आदी ज्या ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसून इजा झाली आहे, अशा ठिकाणी १० टक्के बोर्डाे पेस्ट लावावी. गारपिटीच्या तडाखा बसलेल्या ठिकाणच्या पेशी मृत झालेल्या असतात. त्यामुळे पेशींपासून बनलेल्या उतींची काही प्रमाणात हानी झालेली असते. त्यामुळे पेशीनिर्मिती वाढून उतींची वाढ पूर्ववत व्हावी यासाठी झाडावर बोरीक अॅसिड २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गहू, हरभरा आदी पिकांत साचलेले पाणी काढून टाकावे. भाजीपाला पिके वाढीच्या प्राथमिक अवस्थेत असल्यास त्यांची वाढ पूर्ववत सुरू राहावी यासाठी युरिया १ टक्के (१० ग्रॅम प्रतिलिटर) या प्रमाणात फवारणी करावी. हवामान खात्याने आगामी दोन दिवसांतही गारपीट व अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांत ज्या ठिकाणी फळे काढणीला आली असतील, ती त्वरित काढावीत. म्हणजे पुढील नुकसान टाळता येईल. गारपिटीच्या तडाख्यामुळे फळबागांमध्ये आगामी काळात होणारी फूल व फळधारणा बाधित होऊ नये, यासाठी झाडांवर पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर) या प्रमाणात फवारणी करावी. संपर्क : डॉ. विलास खर्चे, ८२७५०१३९४० (संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)