ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचे व्यवस्थापन

ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचे व्यवस्थापन
ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचे व्यवस्थापन

ठिबकमधून विद्राव्य खतांची मात्रा देण्यापूर्वी माती परीक्षण करणे अावश्‍यक अाहे. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घ्यावे व त्यानुसार विद्राव्य खतांची मात्रा ठरवावी. पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात (विद्राव्य खते) पिकांच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला फर्टिगेशन अथवा केमिगेशन म्हणतात. या पद्धतीमुळे जमिनीतील ओलाव्यात मुळाच्या जवळ खते दिली जातात. फर्टिगेशन हा काटेकोर शेतीतील महत्त्वाचा भाग बनलेला आहे.

  • ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खतांची वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे अाहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चंगल्या प्रतीचा म्युरेट अाॅफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक सिंचनातून द्यावा.
  • ठिबक सिंचनाद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्‍य नसल्यास आठवड्यातून/पंधरवड्यातून एकदा द्यावी. यामुळे खतांची वापर कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.
  • हंगामापूर्वी मातीची तपासणी करून मातीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणात गरजेनुसार बदल करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास आवश्‍यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. लागवडीपूर्वी उपलब्धतेनुसार व शेवटच्या पाळीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.
  • फर्टिगेशनचे फायदे

  • सर्व परिस्थितीत अचूक व समप्रमाणात खतांचा वापर शक्‍य होतो. खते ठिबकमुळे पाण्याबरोबर झाडाजवळ मुळांच्या कक्षेत पडत असल्यामुळे नेमके समान पाणी व खत मुळांच्या क्षेत्रात योग्य वेळी उपलब्ध करता येते.
  • खताची मात्रा ही झाडाची गरज व हवामानातील परिस्थितीनुरप वेळेवर निश्‍चित करता येते.
  • पाण्याची कार्यक्षमता ४०-५० टक्के व खतांची कार्यक्षमता २५-३० टक्के इतकी वाढते. खतांची कार्यक्षमता वाढते. कारण ठिबक सिंचन पद्धतीने पिकास पाणी दिल्याने पिकांच्या कार्यक्षम मूळांच्या कक्षेत ओलावा निर्माण होतो व दिलेली खते या भागातच पसरतात. त्यामुळे त्याचा जमिनीतून वाहून निचऱ्याद्वारे ऱ्हास होत नाही किंवा साठून राहत नाहीत.
  • पिकांच्या संवेदनक्षम अवस्थानुसार आवश्‍यक तेवढी खतांची मात्रा एकूण वाढीच्या कालावधीत अनेक वेळा विभागून देता येतात. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.
  • पीक लवकर तयार होते व उत्पादनात २०-४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते. विद्राव्य खते वापरामुळे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन मिळते. पिकाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते.
  • हलक्‍या व कमी प्रतीच्या जमिनीतसुद्धा पीक घेता येते.
  • आम्लयुक्त विद्राव्य खतांमुळे ठिबक संचामध्ये आपोआपच रासायनिक प्रक्रिया होते व ठिबक तोट्या किंवा संच बंद पडत नाही.
  • विद्राव्य खतांमध्ये सोडियम व क्‍लोरीनचे प्रमाण अत्यल्प असते.
  • पारंपरिक पद्धतीने खते देताना जमीन तुडवली जाऊन ती घट्ट होते व मुळांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही. ठिबक सिंचन संचातून खते दिल्याने हे टाळता येते.
  • फर्टिगेशनसाठी विद्राव्य खतांचे गुणधर्म

  • विद्राव्य खते संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी, आम्लधर्मी असावीत. विद्राव्य खते घन स्वरूपात उपलब्ध असावीत. यामुळे हाताळणी व वाहतूक करण्यासाठी सुलभ असतात.
  • विद्राव्य खते क्‍लोराईड्‌स व सोडियमसारख्या हानिकारक मूलद्रव्यांपासून मुक्त असावीत.
  • पाण्यात विरघळ्यानंतर साका तयार होऊ नये. दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असावीत.
  • संपर्क : डॉ. उदय खोडके, ९४२२१७८०२५ (लेखक सिंचन पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com