डाळिंब या पिकाला पाण्याची गरज ही मुळातच खूप कमी असते. अतिपाणी दिल्यास मुळांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तसेच मर होण्याची शक्यता असते.
डाळिंबाची मुळे नियमित श्वसन क्रिया करीत असतात. या क्रियेद्वारे मुळांतून जमिनीत काही द्रव्ये सोडली जातात. या द्रव्यांवर मुळांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या जीवाणूंची वाढ होत असते. हे जीवाणू जमीन भुसभुशीत करून अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.मात्र जेव्हा पाणी अधिक दिले जाते, तेव्हा मुळांच्या श्वसनक्रियेवर विपरित परिणाम होतो. परिणामी मुळांतून स्त्रवले जाणारे द्रव्य कमी प्रमाणात स्त्रवते किंवा जातच नाही. त्यामुळे जीवाणूंची वाढ व क्रिया मंदावून ते मरतात. परिणामी जमीन भुसभुशीत न राहता कडक बनते. ऑक्सिजनच्या अभावामुळे मुळे गुदमरतात आणि झाडाची मर होते. ज्या पिकात फळे वाढीच्या अवस्थेत असतात तेथे अतिपाण्यामुळे मुळांची कार्यक्षमता घटल्याने फळांचे पोषण होत नाही. परिणामी कमी वजन, निकृष्ट फळांचे उत्पादन मिळते. फळगळ होऊन उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता असते. ज्या पिकात फुले लागली आहेत तेथे फुले गळून पडतात. चुनखडीयुक्त जमिनीत डाळिंबास अधिक पाणी दिल्यास या जमिनीतील कॅल्शियमवर क्रिया होऊन उष्णता निर्माण होते. मुळांच्या कार्यक्षेत्रात उष्णता निर्माण झाल्यास मुळांची मर होऊन झाड मरते. भारी जमिनीची पाणी धारण क्षमता मुळातच जास्त असते. अशा जमिनीत अधिक पाणी दिल्याने मुळांवर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. हलक्या जमिनीची पाणी धारण क्षमता कमी असते. अशा जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे अधिक पाण्यामुळे तेथे विशेष धोका निर्माण होत नाही. प्रतिझाड दोनऐवजी चार किंवा सहा ड्रिपरचा वापर करून पाणी देण्याचा कालावधी कमी करावा किंवा प्रतिझाड दोन इनलाईन लॅटरल (झाडाच्या कॅनॉपीच्या बाहेर ३ ते ४ इंच अंतरावर) टाकाव्यात. या उपाययोजनेमुळे पाणी कमी प्रमाणात व झाडाच्या कॅनॉपीच्या विस्तारानुसार सर्वत्र सम प्रमाणात दिले जाते. पिकाला पाणी देताना जमीन वाफसा अवस्थेत आल्यानंतरच द्यावे. संपर्क : डॉ. विनय सुपे, ०२०-२५८९३७५० (राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)