पुढील अाठवड्यात सर्व द्राक्ष विभागामध्ये वातावरण सर्वसाधारणपणे निरभ्र राहण्याची शक्यता अाहे. पहाटेचे तापमान नाशिक भागामध्ये १३ ते १४ अंश सेल्सिअस, पुणे, सांगली भागामध्ये १५ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत अाणि सोलापूर भागामध्ये १६ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता अाहे. तर दुपारचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता अाहे.
गुरुवार अाणि शुक्रवारी काही भागामध्ये वातावरण अधूनमधून हलके ढगाळ होण्याची शक्यता अाहे. सर्वच भागामध्ये अाता हळूहळू अार्द्रता कमी होण्यास सुरवात झाली अाहे. अार्द्रता ५० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता अाहे, त्यामुळे ड्यू पाॅइंट हा कमीत कमी तापमानापेक्षासुद्धा ३ ते ४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत कमी राहणार अाहे. याचा अर्थ सकाळचे दव फारसे कुठेही पडणार नाही. या सर्व वातावरणाचा विचार करता सर्वच द्राक्ष विभागांमध्ये कुठल्याही रोगांचा विशेष धोका दिसत नाही. त्यामुळे विशेष रोगाच्या नियंत्रणासाठी काही करणे फारसे अावश्यक नाही. काही जुन्या बागांमध्ये भुरी जास्त वाढली असल्याचे समजते. बागेत असलेल्या अशा प्रकारच्या भुरीचे नियंत्रण संपूर्णपणे करणे अावश्यक अाहे. त्यासाठी बाग छाटणीच्या ७० - ८० दिवसाच्या पुढे असल्यास शक्यतो सल्फर (८० डब्लू जी) १.५ ते २ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारल्यास बागेमध्ये भुरीच्या नियंत्रणाबरोबर जैविक नियंत्रणाचा वापर करणे शक्य होईल. सल्फर वापरत असताना फवारणी यंत्रामधून निघणारे तुषार जेवढे कमी करता येणे शक्य अाहे तेवढे कमी करून फवारावे. फवारलेले बुरशीनाशक मण्यांवरून अोघळून येणार नाही याची दक्षता घ्यावी. असे केल्यास सल्फरचे डाग मण्यांवरती येण्याची शक्यता कमी होईल. ज्या ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव जास्त अाहे अशा ठिकाणी सल्फर धुरळणी स्वरूपात दिल्यास जास्त चांगले नियंत्रण मिळू शकेल. बागेमध्ये पोटॅशिअमची (०ः५२ः३४ किंवा सल्फेट अाॅफ पोटॅश २ ते ३ ग्रॅम प्रती लिटर) फवारणी केल्यास भुरीच्या नियंत्रणासाठी चांगली मदत होते. कॅल्शिअमची फवारणी (कॅल्शिअम क्लोराईड किंवा कॅल्शिअम सल्फेट) केल्यास भुरीच्या नियंत्रणास मदत होते. थंडीच्या दिवसामध्ये अातल्या कॅनाॅपीतील पाने बऱ्याच वेळेला पिवळी पडून गळून पडतात. कारण त्या पानांपर्यंत सूर्यप्रकाश पोचत नसतो. अशा प्रकारची पाने अातल्या कॅनाॅपीमध्ये तशीच राहू दिल्यास फवारणीचे कव्हरेज अातल्या कॅनॉपीमध्ये मिळण्यासाठी अडथळा निर्माण करतात. अशा प्रकारची निरुपयोगी पाने लवकरच काढून घेतल्यास कॅनाॅपीमध्ये होणाऱ्या फवारणीचे चांगले कव्हरेज मिळाल्यामुळे चांगला फायदा होईल. बऱ्याच ठिकाणी बागांमध्ये मण्यात पाणी भरायला सुरवात होत अाहे. अशा घडांवर पिंक बेरीच्या नियंत्रणासाठी कागद लावला जातो. कागद लावण्याअाधी घडांवर भुरीच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रणाचा वापर (ट्रायकोडर्मा किंवा अॅम्फिलोमायसीस, किंवा बॅसीलस सबटिलीस) केल्यास घडावरील भुरीचे नियंत्रण शेवटपर्यंत चांगले राहू शकेल. बागेच्या बाहेर अनेक ठिकाणी तण (लांडगा - xanthium strumarium) वाढलेले असतात. त्या तणांवर बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात भुरी वाढलेली असते. अशा भुरीवर अॅम्फिलोमायसीस, ट्रायकोडर्मासारख्या बुरशीची फवारणी केल्यास जैविक नियंत्रणाची बुरशी चांगल्या प्रकारे भुरीवर वाढेल व त्याचा प्रसार जवळपासच्या बागेमध्ये चांगला होऊन बाग भुरीपासून सुरक्षित राहू शकते. संपर्क : ०२०-२६९५६००१ ( राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)