सर्वच द्राक्ष विभागांमध्ये सोमवार, मंगळावरपर्यंत पहाटेची थंडी राहणार आहे. सोमवारनंतर तापमान वाढायला लागेल. या थंडीच्या दिवसांमध्ये दुपारचे तापमान मात्र रोज ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. सोमवार, मंगळवारनंतर सांगली, सोलापूर भागात सरासरी तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. नाशिक विभागात तापमान नियमितपणे ३० ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. पुणे विभागामध्ये जुन्नर, नारायणगाव भागात रविवारपर्यंत तापमान कमी राहणार आहे.
सध्या पहाटेचे तापमान फार कमी आणि दुपारचे तापमान सकाळच्या तापमानापेक्षा २० ते २५ अंश सेल्सिअस जास्त रहात आहे. अशा परिस्थितीत ज्या बागांमध्ये मण्यात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे, त्या बागेत पिंक बेरीचे प्रमाण वेगाने वाढू शकते. म्हणूनच अशा बागांच्यामध्ये घडांवर पेपर लावण्याचे काम लवकरात लवकर करावे. सर्व विभागांमध्ये वातावरण अधून मधून ढगाळ असल्याचे चित्र आहे. अशा वातावरणामध्ये भुरी वेगाने वाढू शकते. म्हणून घडांवर पेपर लावण्याअगोदर घडावर भुरीचा प्रादुर्भाव नाही याची खात्री करून घ्यावी. घडावर भुरी दिसल्यास एखाद दुसरा भुरीचा प्रादुर्भाव झालेला मणी हाताने काढून टाकावा. अशा घडांवरती सल्फर (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी )किंवा जैविक नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलिसची (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी ) फवारणी करावी. त्यानंतर घडावर पेपर लावावा. जेणेकरून पेपर चढविल्यानंतर घडावर भुरी वाढणार नाही. थंडी जास्त झाल्याने वातावरणातील सापेक्ष आर्द्रता वाढते. चांगली कॅनोपी असलेल्या बागांच्यामध्ये वाढलेल्या सापेक्ष आर्द्रतेमुळे पानांमधून होणारे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. अशावेळी बागेत देण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी न केल्यास मण्यांमध्ये क्रॅकींग होऊ शकते. बागेमध्ये मण्यांचे क्रॅकिंग झाले नाही, तरीही काढणीनंतर बॉक्समध्ये मण्याचे क्रॅकिंग होऊन मण्यातील साखर बाहेर येऊ शकते. त्यावर बुरशी वाढून मण्यांची कूज होऊ शकते. म्हणूनच ज्या बागेमध्ये काढणी काही दिवसांत होणार असेल त्या ठिकाणी बागेमध्ये दिल्या जाणाऱ्या पाण्याकडे विशेष लक्ष देऊन ते बाष्पीभवनाच्या प्रमाणात कमी करावे. पहाटेची थंडी विभागातील सर्व बागेत वाढत नाही. शेततळे, नदी, कालव्याच्या जवळ असलेल्या बागांमध्ये तसेच उताराची जमीन असल्यास शेवटच्या भागामध्ये असलेली बाग तसेच कॅनॉपीमध्ये खेळती हवा रहात नसलेल्या बागांमध्ये जास्त थंडी रहाते. अशा बागांच्यामध्ये थंडीमुळे मणी खराब होऊ शकतात. थंडीमुळे खराब होणारे मणी लगेच लक्षात येत नाहीत. परंतु बागेतील तापमान वाढायला लागले की खराब झालेले मणी दिसू लागतात. त्यानंतर काहीही करता येत नाही. म्हणूनच वर नमूद केलेल्या परिसरात बागेचे ठिकाण असेल तर त्याठिकाणी थंडीच्या वेळेस दक्षता घेतली पाहिजे. अशा बागांच्यामध्ये रात्रीच्या वेळी शेकोटी करून वातावरण थोडे ऊबदार ठेवणे फायद्याचे ठरते. येत्या रविवार, सोमवारपर्यंत कमी तापमान असलेल्या विभागात असलेल्या बागायतदारांनी सिलिकॉन तसेच कायटोसॅन असलेले फॉर्मुलेशन मण्यावर फवारल्यास बऱ्याच प्रमाणामध्ये थंडीपासून सुरक्षित रहातात. संपर्क :०२०-२६९५६००१ राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे