सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या सोमवारपासून (ता. ५) पुढील आठ ते दहा दिवस वातावरण मोठ्या प्रमाणात ढगाळ राहणार आहे. त्यामुळे सध्याचे ३० अंशांवर असलेले दुपारचे तापमान बऱ्याच वेळा खाली जाण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान सर्वसाधारणपणे वाढलेले असेल, ज्या ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण असेल, तिथे ते १७ -१८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकेल.
पावसाची जास्त शक्यता नाही. मात्र येत्या मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी (ता. ५ किंवा ६) सर्व द्राक्ष विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात रिमझिम किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. औरंगाबाद विभागात पावसाचे प्रमाण जास्त असू शकेल. पाऊस होणाऱ्या ठिकाणी नेहमीप्रमाणे पहाटेची आर्द्रता वाढेल. २२ ते २४ तारखेनंतर पुन्हा सर्व द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचे नेमके प्रमाण आताच सांगणे कठीण आहे. परंतु तमिळनाडूच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे त्याचे परिणाम काही दिवसांत द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण करू शकतात. ढगाळ वातावरण, हलका पाऊस, त्यामुळे वाढणारी आर्द्रता या सर्व गोष्टी भुरीच्या प्रादुर्भावाचे संकेत देतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरण्याची वेळ निघून गेलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आंतरप्रवाही बुरशीनाशके विशेषतः ट्रायअझोल जातीतील किंवा टॅब्युलेरीन जातीतील बुरशीनाशके कमी जास्त प्रमाणामध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्यामुळे भुरीचे अपेक्षित नियंत्रण देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वापरावर अवलंबून राहणे भुरीच्या नियंत्रणासाठी धोक्याचे आहे. छाटणीनंतर सत्तर दिवसांच्या पुढे असलेल्या बागेमध्ये भुरीसाठी शिफारशीत कोणतेही आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरल्यास त्याचे उर्वरित अंश विश्लेषणामध्ये निश्चित दिसतील. फक्त मायक्लोब्युटॅनिल व मेट्राफेनॉन या बुरशीनाशकांचा वापर केल्यास या दोन्हीही बुरशीनाशकांची एमआरएल ही तुलनेने जास्त असल्यामुळे उर्वरीत अंश एमआरएलपेक्षा कदाचित कमी राहू शकतील. या सर्वांचा विचार करता ज्या बागा सत्तर दिवसांच्या पुढे असतील, त्यांनी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. त्या ऐवजी भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) ६०० ते ८०० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात चांगल्या फवारणीयंत्राद्वारे वापरणे जास्त फायदेशीर ठरू शकेल. भुरीच्या नियंत्रणासाठी डाग न येता बुरशीनाशक कसे वापरायचे या बद्दलची सविस्तर माहिती व व्हिडिओ फिल्म राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या वेबसाइटवर मिळू शकेल. वातावरणामध्ये आर्द्रता जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे भुरीच्या जैविक नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. ट्रायकोडर्मा, अॅम्पिलोमायसिस हे दोन्ही बुरशीजन्य घटक पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरल्यास जास्त आर्द्रतेमध्ये चांगले काम करतात. तसेच सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये बॅसिलस सबटिलीस दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात हा जिवाणूसुद्धा जास्त चांगले काम करू शकेल. शून्य रेसिड्यूच्या संदर्भात आम्ही चालू ठेवलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार वेगवेगळ्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या वापराने मिळालेल्या भुरीच्या नियंत्रणापेक्षा फक्त सल्फर व जैविक नियंत्रक घटक वापरलेल्या वेलीमध्ये जास्त चांगले भुरीचे नियंत्रण मिळालेले आहे. द्राक्ष मण्यांतील क्रॅकिंग टाळण्यासाठी...
संपर्क : ०२०-२६९५६००१ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.