येत्या सात दिवसांमध्ये सर्वच विभागांमध्ये ३६ ते ३९ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, सोलापूर, विजापूर आणि लातूर विभागामध्ये अधूनमधून वातावरण ढगाळ राहील. आज आणि त्यानंतर सोमवारी अाणि मंगळवारी बऱ्याच ठिकाणी विजा कडकडून हलक्या पावसाची शक्यता आहे. ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तेथे दुपारच्या तापमानात घटीची शक्यता आहे.
सांगली आणि विजापूर विभागांत आज दुपारनंतर तर सोमवार, मंगळवार आणि सांगली, सोलापूर, लातूर, विजापूर या भागांत विजा कडकडून वळवाच्या पावसाची शक्यता आहे. ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्या ठिकाणच्या नवीन फुटलेल्या बागांतील फुटी चांगल्या व जोमाने वाढण्यासाठी फायदा होईल. परंतु ढगाळ वातावरणामुळे नवीन फुटलेल्या फुटींमध्ये भुरी पसरण्याची शक्यता आहे. आपल्या द्राक्ष विभागांमध्ये भुरी ही पांढऱ्या पावडर प्रमाणे तयार होणाऱ्या बिजाणू स्वरूपात प्रतिकूल परिस्थितीमध्येही जिवंत राहते. काड्यांवर येणारे भुरीचे डाग आणि त्यावर असलेली भुरीची बुरशी हे बागेत वाढणाऱ्या भुरीचे महत्त्वाचे ‘इनॉक्युलम’ आहे. याचे वेळीच नियंत्रण केल्यास पुढे बागेत भुरी वाढण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी घेणे आवश्यक आहे. तापमान जास्त असताना आर्द्रता वाढली तरच नवीन फुटींवर करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सध्याच्या वातावरणामध्ये एखाद दुसऱ्या पावसाने अशा प्रकारची आर्द्रता बागेत वाढत नाही. त्यामुळे लगेचच करप्याच्या नियंत्रणासाठी फवारणी फारशी जरूरी वाटत नाही. मात्र एक दोन दिवस पाठोपाठ पाऊस पडल्यास अशा पावसानंतर करप्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी लागले. अशा परिस्थितीत प्रतिलिटर पाण्यात कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम स्वतंत्रपणे फवारल्यास किंवा २ ग्रॅम मॅन्कोझेब मिसळून वापरल्यास करप्याचे चांगले नियंत्रण मिळेल. पंढरपूरच्या जवळपासचे कासेगाव, पुळूज या परिसरामध्ये द्राक्षाची काढणी सुरू आहेत किंवा द्राक्ष मण्यांत साखर भरण्याची सुरवात झाली आहे. या परिसरामध्ये हलका पाऊस झाला आहे. पंढरपूरच्या जवळपासच्या भागामध्ये सोमवार, मंगळवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. परंतु वातावरण ढगाळ राहू शकेल आणि शनिवारी दुपारी पंढरपूरच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये घडाच्या देठावरील भुरीचे नियंत्रण योग्य प्रकारे झाले पाहिजे. शेवटच्या या काही दिवसामध्ये सल्फर (८० डब्लूजी) दीड ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल. सल्फर योग्य प्रकारे न फवारल्यास त्याचे डाग मण्यांवर दिसण्याची शक्यता असते. ढगाळ वातावरणामुळे किंवा अाजूबाजूला पडलेल्या पावसामध्ये वातावरणातील आर्द्रता वाढलेली असल्यास संध्याकाळच्या वेळेला ट्रायकोडर्मा ५ मि.लि. किंवा २ ग्रॅम बॅसिलस सबटिलिस प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या वेळी जैविक नियंत्रणाचे उपाय भुरीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतात. सल्फर वापरलेल्या बागांमध्येही जैविक नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते, परंतु भुरी नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरले असल्यास मात्र भुरीचे नियंत्रण जैविक नियंत्रणाने मिळणार नाही. सल्फर डाग न पडता कसे फवारावे याची माहिती एनआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही माहिती वाचून योग्य प्रकारे सल्फरचा वापर करावा. याचबरोबरीने सल्फर वापराबाबतची फिल्म संकेतस्थळावर पाहता येईल ( लिंक https://www.youtube.com/watch?v=qZr470YzF2w) सल्फर किंवा जैविक नियंत्रणाचा वापर केला असल्यास पावसामुळे ते धुऊन जाऊ नये किंवा जैविक नियंत्रणाचा परिणाम चांगल्या रीतीने मिळावा यासाठी मण्यांवर कायटोसॅन २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणे शक्य आहे. या फवारणीमुळे मण्यात चांगली साखर भरण्यासाठीसुद्धा मदत होईल. संपर्क : ०२०-२६९५६००१ राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे