आंबा फळगळ वेळीच रोखणे आवश्‍यक

डावीकडील छायाचित्र अांब्यावरील भुरी रोग, उजवीकडील छायाचित्र आंब्यावरील करपा रोग
डावीकडील छायाचित्र अांब्यावरील भुरी रोग, उजवीकडील छायाचित्र आंब्यावरील करपा रोग

सद्यःस्थितीमध्ये राज्यातील हवामान ढगाळ अाहे. काही भागात पाऊस होण्याची शक्यताही आहे. अशा वातावरणात विविध कीड व रोगांमुळे आंबा फळांची गळ हाेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फळगळीच्या विविध कारणांचा अभ्यास करून उपाययोजना कराव्यात. आंबा बागेत एकाच जातीची झाडे लावल्यास ४० - ५० टक्के संयुक्त फुलांचे परागीकरण होत नाही. परिणामी त्यांचे फक्त अंडाशय वाढून गळ होते. त्यामुळे आंबा बाग लावताना १० टक्के इतर जातीची झाडे लावणे महत्त्वाचे ठरते.

  • यंदा सुरवातीच्या काळात थंडी उशिरा सुरू झाली. मध्येच तापमान वाढून पुन्हा थंडीची तीव्रता वाढली. त्यामुळे आंबा झाडांना पुन्हा पुन्हा मोहर आला. या पुनर्मोहरामुळेदेखील आंबा फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होताना दिसून येत आहे. ज्या बागांमध्ये नुकतीच फळधारणा सुरू झाली आहे तेथे ताबडतोब ५०  पीपीएम (५० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) जिब्रेलिक अॅसिडची फवारणी केल्यास फळगळ रोखण्यास मदत मिळणार आहे.  
  • बहुतांश आंबा झाडांची फळगळ ही अन्नद्रव्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे होते. अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात फळांची गळ होते. ही फळगळ रोखण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. तसेच फळांच्या विविध अवस्थेत युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अधिक एन ए ए २० पीपीएम (२० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) याची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • बऱ्याच आंबा झाडांना सुरवातीच्या अवस्थेत आवश्‍यकतेपेक्षा जास्त फळधारणा होत असते. सर्व फळांना पोसण्याची क्षमता झाडामध्ये नसते. त्यामुळेही फळगळ होताना दिसते. फळे पोसण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
  • आंबा फळांची वाढ होण्यासाठी व फळगळती थांबविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्‍यकता असते. वाढीच्या काळात पाणी न मिळाल्याने फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असते. त्यामुळे आंबा फळे वाटाणा आकाराची झाल्यानंतर दर दहा दिवसांच्या अंतराने तापमानवाढीचा अंदाज घेऊन पाणीपुरवठा करावा. जेणेकरून फळगळ थांबणे सोईचे होईल.
  • काही वेळा तापमानात अचानक वाढ झाल्यास फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असते. अशावेळी मोठी फळेदेखील गळून पडतात. अशावेळी त्वरित संरक्षित सिंचन करावे. त्यामुळे बागेतील तापमान कमी होऊन फळगळ थांबविणे शक्य होते.  
  • मागील आठवड्यात राज्यातील काही भागात रिमझिम पाऊस झालेला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. यामुळे मोठ्या प्रमाणात भुरी व करपा या बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेदेखील फळगळ होऊ शकते. अशावेळी भुरी व करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी.
  • काही बागांतील आंबा झाडांवर बोर, लिंब एवढ्या आकाराची फळे व मोहर तसेच नवीन पालवी तिन्ही एकाचवेळी दिसत आहे. नवीन पालवी अन्नद्रव्य ओढून घेत असल्यामुळेही फळांच्या पोषणासाठी अन्नद्रव्य कमी पडून फळगळ होत आहे. अशावेळी होणारी फळगळ रोखण्यासाठी १२:६१:० या विद्राव्य खताची २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. गळून पडलेली फळे वेचून बागेबाहेर नेऊन त्यांची विल्हेवाट लावावी जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळणे सोईचे होईल.
  • रोगनियंत्रण भुरी रोग : फवारणी प्रतिलिटर पाणी विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा डिनोकॅप १ ग्रॅम करपा रोग : फवारणी प्रतिलिटर पाणी कॅप्टन २ ग्रॅम किंवा कॉपरऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम  

    संपर्क : डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४ (फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com