या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात बीटी कपाशीवर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे लक्षणीय नुकसान झाले. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा तीव्र प्रादुर्भाव असलेल्या विभागामध्ये तिच्या प्रभावी नियंत्रणासाठी या हंगामापासूनच काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यातील फरदड न घेता वेळेवर कपाशीचा हंगाम संपवणे आणि पूर्व हंगामी कपाशीचे उत्पादन न घेणे अशा काही निर्णय त्वरित घ्यावे लागणार आहेत. भारतामध्ये २००२ मध्ये अधिकृतरीत्या बीटी कापूस लागवडीसाठी शासन मान्यता मिळाल्यानंतर ते लागवडीखाली आले. पुढे २००६ मध्ये बीटी-२ हे वाणही बाजारात उपलब्ध झाले. देशामध्ये कापसाखालील एकूण क्षेत्रापैकी ९३% हून अधिक क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड होते. दीड दशकाहून अधिक काळ बोंड अळ्यापासून संरक्षण मिळत असले तरी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव वाढत गेला. अर्थात, ही काही अचानक घडलेली प्रक्रिया नाही. या प्रकाराची तपशीलवार मिमांसा केली असता त्यामागील अनेक कारणे दिसून येतात. उदा. कपाशीभोवती रेफ्युजी किंवा आश्रय पिके न लावणे, कापसाचा हंगाम फेब्रुवारी आणि त्यानंतरही लांबविणे, पूर्व हंगामी कापसाची एप्रिल-मे दरम्यान लागवड करणे, प्रादुर्भावाचे योग्य वेळी निदान न होणे, या सोबत एकात्मिक नियंत्रण पद्धतींचा अवलंब न करणे इ. यातील कापसाचा हंगाम वेळेत संपविणे व पूर्वहंगामी लागवड थांबविणे या सारख्या काही कारणांमुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र अविरतपणे सुरू राहण्यास मदत होते. बीटी प्रमाणे अन्य घटकांबाबतही त्यांच्यामध्ये प्रतिकारकता वाढण्यास मदत होते.
का संपवावा हंगाम वेळेतच? चालू हंगामात महाराष्ट्रातील बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची तीव्रता व त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पीक संरक्षण विभागातील शास्त्रज्ञांनी सप्टेंबर - डिसेंबर २०१७ दरम्यान विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांतील जवळपास १०५ गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये प्रादुर्भावग्रस्त शेतातील नमुने तपासणीबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यातून शेतकरी वापरत असलेले उत्पादन तंत्रज्ञान, कीड नियंत्रण उपाययोजना, स्थानिक पीक पद्धती यासारखी माहिती संकलित केली. त्यातील काही महत्त्वाच्या बाबी.
उपाययोजना :
पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळावी साधारणपणे पाऊस पडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करण्याची शिफारस आहे. परंतू, सर्वेक्षणादरम्यान प्रकर्षाने आढळून आलेली दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे ओलिताखालील कापूस क्षेत्रात बहुतेक शेतकरी कापसाची लागवड एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यान करतात. यालाच पूर्वहंगामी लागवड असे म्हणतात. आधीच मार्चपर्यंत लांबवलेला मागील पिकाचा हंगाम व एक - दीड महिन्याच्या अंतराने केलेली पुढच्या हंगामातील कपाशीची लागवड यामुळे किडीचे जीवन चक्र खंडित होत नाही. किडीसाठी वर्षभर खाद्य पुरवठा उपलब्ध झाल्याने कीड सतत कार्यरत राहते. गुलाबी बोंड अळीचे पतंग कोवळ्या पात्या, कळ्या, व बोंडावर अंडी घालण्यास अधिक पसंती देतात. पूर्वहंगामी लागवड केलेल्या कापसाला पात्या लागण्याची अवस्था जुलै महिन्याच्या दरम्यान येते. तसेच मागील हंगामातील सुप्तावस्थेत असणाऱ्या गुलाबी बोंड अळ्यांपासून निघणारे पतंगही याच कालावधीत बाहेर पडतात. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जुळून येतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची नवीन हंगामातील पहिली पिढी ही पूर्वहंगामी पिकावरच तयार होते. पुढे हाच प्रादुर्भाव नंतर जून-जुलै मध्ये लावलेल्या हंगामी कपाशी पिकावर प्रसारित होतो. उपाययोजना पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणे टाळावे. त्यामुळे जून-जुलै दरम्यान सुप्तावस्थेतून निघालेल्या पतंगांनी घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले व कोवळी बोंडे उपलब्ध नसतात. त्यामुळे या अळ्या मरून जातात. या क्रियेला पतंगांचा “आत्मघाती उदय” (suicidal emergence) असे म्हणतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची पुढची उत्पत्ती रोखता येते. हंगामी कापूस पिकावरील प्रादुर्भाव कमी करण्यास मोठा फायदा होऊ शकतो.
महत्त्वाचे
संपर्क : डॉ. बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५ (पीक संरक्षण विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.