उन्हाळ्यात सीताफळ बागेच्या नवीन हंगामासाठी छाटणी करणे, पाणी तोडणे आदी कामे चालू असतात. ज्या बागांत फुलधारणा व फळधारणा चालू आहे, अशा बागांमध्ये पाणी व्यव्यस्थापन महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टिकोनातून नियोजन करावे. नवीन बहर नियोजन :
नवीन बहराचे नियोजन करताना झाडांना विश्रांती देणे आवश्यक असते. त्यामुळे अशा ठिकाणी पानगळ करून घेण्यासाठी ताण देणे आवश्यक असते. त्यामुळे पाणी देण्याची गरज नसते. बहर घेण्यासाठी प्रथम बागेस पाणी देणे बंद करावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणपणे हलक्या जमिनीत ३० ते ३५ दिवस तर मध्यम ते भारी जमिनीत ४० ते ४५ दिवसांपर्यंत पाणी तोडावे. संपूर्ण पानगळ झाल्यानंतर झाडांची छाटणी करावी. छाटणी करतेवेळी अनावश्यक, वेड्यावाकड्या जमिनीलगत असलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. मुख्य बुंध्यावर चार ते पाच मुख्य फांद्या व त्यावर आठ ते दहा दुय्यम फांद्या ठेवून छाटणी करावी. पेन्सिलपेक्षा कमी आकाराच्या सर्व लहान फांद्या सिकेटरच्या साह्याने काढून टाकाव्यात. फुले व फळे लागण अवस्थेतील बाग : उत्तम फळधारणा होण्यासाठी बागेमध्ये पुरेशी आर्द्रता राहून तापमान सौम्य राहणे आवश्यक असते. साधारणपणे सकाळी व संध्याकाळी कमी तापमानात फुले उमलतात. फुलातील स्त्रीकेसराची सक्रियता फुले उमलल्यानंतर पहिल्या दिवसाच्या पहिल्या सकाळी जास्त असते त्यामुळे या वेळेत तापमान कमी व आर्द्रता राहिल्यास ९० टक्के फळधारणा होऊ शकते. या कालावधीत फळधारणा झाल्यावर फळे जुन-जुलैमध्ये काढणीस येतात. उष्ण व कोरड्या वातावरणातील हवेत आर्द्रता फार कमी असते. परिणामी फुलांमधील स्त्रीकेसराची फलन सक्रियता व परागकणाची कार्यक्षमता कमी होते. अशा वातावरणात परागसिंचन कार्यात व्यत्यय येतो. फुले उच्च तापमानामुळे करपून जातात व फळधारणा कमी प्रमाणात होते किंवा होतच नाही. बागेेस साधारणपणे सकाळी ६ ते ८ या काळात सिंचन करावे. त्यामुळे आर्द्रता व्यवस्थापन व पाण्याचा पुरेपूर वापर परागसिंचनासाठी होतो. तसेच फळांची वाढही समाधानकारक होते. सिंचनासाठी ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे पाण्याची ५० ते ७० टक्के बचत हाेते. झाडाच्या दोन बाजूंनी दाेन लॅटरल्स टाकाव्यात. तसेच प्रत्येक लॅटरलवर दोन ड्रिपर्स ठेवावीत. त्यामुळे झाडाच्या मुळांच्या विस्ताराच्या क्षेत्रात समप्रमाणात पाणी मिळून पाण्याची संपूर्ण मात्रा पिकास उपयोगी पडते. तसेच पाण्याची बचतही होते. पाण्याची बचत व पिकाकडून प्रभावी वापर होण्यासाठी बागेमध्ये सेंद्रिय किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा. आच्छादन झाडाच्या बुंध्याभोवती करावे. सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावयाचा असल्यास प्रतिझाड ८-१० किलो (साधारणपणे २ टोपल्या) पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा इ.चा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाची अधिक उपलब्धता असल्यास झाडाच्या विस्ताराची (कॅनॉपी) सावली जेथेपर्यंत पडते तेथपर्यंत सेंद्रिय अाच्छादन करावे. कारण झाडाची मुळे तेथपर्यंत पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण करीत असतात. तण पाण्यासाठी पिकाबरोबर स्पर्धा करीत असतात. त्यामुळे वेळोवेळी झाडांच्या दोन ओळींच्या मध्ये कोळपणी करून तण नियंत्रण करावे. कोळपणीमुळे जमिनीतील भेगाही बुजतात व त्यातून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनास अटकाव करता येतो. संपर्क : डॉ. वैभव कांबळे, ८५५१९२८१२८ (वि. दे. कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर)