नवीन लागवड केलेल्या रोपांना आधार द्यावा. रोप लावल्यानंतर पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या ४५ सें. मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूस रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. नारळ रोप सैलसर बांधून ठेवावे.
नवीन लागवड केलेल्या बागेत स्वच्छता ठेवावी. जेथे रोप मेले आहे तेथे नवीन रोपाची लागवड करावी. नारळ बागेत प्रामुख्याने मोकाट पद्धतीने पाणी दिले जाते. त्यामुळे अळ्यात तणांचा प्रादुर्भाव होतो. जिथे ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते, तिथे नियंत्रित तण व्यवस्थापन करावे लागते. तसेच पाण्याचा योग्य वापर होतो. तण नियंत्रणासाठी रोपांच्या अळ्यात जैविक आच्छादन किंवा प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. बागेत तण नियंत्रण करण्यासाठी ट्रॅक्टरने हलकी नांगरणी करावी. रोपांच्या मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. पहिली दोन वर्षे नारळ रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विणलेले झाप, झावळ्या, गवत, झाडांच्या फांद्या यांची कृत्रिम सावली करावी. रोपाच्या चारही दिशांना उंच वाढणारी केळी, पपई, एरंडी अगर गिरीपुष्पाची लागवड करावी. यामुळे रोपांना सावली मिळते. तसेच या पिकांपासून काही प्रमाणात उत्पन्नही मिळेल. जुन्या नारळ बागेत स्वच्छता करावी. जेथे फळे येतात त्या ठिकाणी शिल्लक असलेले जुने नारळाचे देठ, फोकी, वांझ पोयी व इतर कचरा काढून बाग स्वच्छ करावी. नारळाची मुळे तंतुमय प्रकारातील असतात. त्यामुळे सध्याच्या काळात झाडाच्या बुंध्यात मातीची भर द्यावी. त्यामुळे मुळांचे संरक्षण होऊन त्यांची अन्नग्रहण क्षमता वाढते. योग्य पाणी व्यवस्थापन करावे. ज्या ठिकाणी पुरेसा पडलेला नसेल तेथे मोठ्या झाडांसाठी प्रतिझाड व प्रति दिन ६०लिटर पाणी द्यावे. लहान झाडांसाठी प्रति दिन प्रति झाड १५ लिटर पाणी द्यावे. पावसाळा संपल्यावर झाडावर मोठ्या प्रमाणात नारळ लगडलेले असतात. ते काढून घ्यावेत. या नंतरच्या काळात फळांची नियमित काढणी करावी. कमी उत्पादन म्हणजे प्रतिमाड प्रतिवर्षी सरासरी दहा नारळापेक्षा कमी उत्पादन देणारी झाडे बागेतून काढून टाकावीत. तेथे नवीन रोपे लावावीत. बागेत स्वच्छता तसेच इतर आंतरमशागतीची कामे करताना झाडाच्या बुंध्यांना जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. संपर्क : ०२३५२-२५५०७७ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)