शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पूर्व हंगामी कापसाची लागवड करू नये. जूनमध्ये शक्यतो एका गावात एकाच वाणाची एकाचवेळी लागवड करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी कापसाची पऱ्हाटी शेतात उभी आहे. ती काढून कंपोस्ट खत बनवण्यासाठी कुट्टी करून खड्ड्यात भरावे. शेतातील पिकाचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत. स्वच्छता मोहीम सर्व शेतकऱ्यांनी मिळून राबवावी, त्यामुळे शेंदरी बोंड अळीचा अटकाव करण्यास मदत होईल. बाजारातील बोगस बियाण्यांपासून सावध रहावे. शेंदरी बोंड अळी प्रतिकारक्षम असा एकही नवीन बी.टी. वाण बाजारात आलेला नाही. शेतकऱ्यांनी खात्री करूनच पक्की पावती घेऊन बियाणे खरेदी करावे. खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावीत. हिवाळी नांगरट केलेली असल्यास वळवाचा पाऊस झाल्यानंतरच मोगडा-पाळी करावी. कापसाची जमीन पऱ्हाटी काढल्यानंतर पल्टी नांगराने नांगरून घ्यावी. त्यामुळे शेंदरी बोंड अळी व इतर कीड-रोगांचे अवशेष नष्ट होतील. एक उन्हाळ पाळी द्यावी. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते, बीजप्रक्रियेसाठी लागणारी रसायने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरेदी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. माती तपासणीसाठी मातीचे योग्य प्रकारे नमूने घेऊन प्रयोगशाळेत द्यावेत. उन्हाळी भुईमूग पिकास ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. शेंगात दाणे भरतेवेळी पाण्याची पाळी चुकवू नये. टिक्का रोग नियंत्रणासाठी मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारावे. शेंगा पक्व झाल्यानंतर पिकाची काढणी वेळेवर करावी. काढणीस उशीर झाल्यास टीजी किंवा टिएजी जातीच्या शेंगांना मोड फुटतात त्यामुळे बियाण्याची प्रत खराब होते. ज्वारी, बाजरी, मका या उन्हाळी वैरणीच्या पिकांस नत्राचा दुसरा हप्ता (४० किलो प्रतिहेक्टरी) पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा. पिकास आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीक फुलोऱ्यावर येताच हिरव्या चाऱ्याची कापणी करावी. संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२- २२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)