नवीन बागेची लागवड करण्यासाठी आखणी करून खड्डे करावेत. १x १x १ मीटर आकाराचे जातीपरत्वे ६ ते १० मीटर अंतरावर खड्डे खोदून द्यावेत. हे खड्डे काळी माती, पालापाचोळा आणि सुपर फॉस्फेट (१ किलो प्रतिखड्डा) यांनी भरावेत. बुटक्या संकरित जातीसाठी कमी अंतर ठेवावे. दोन वर्षांपेक्षा लहान असलेल्या झाडास सावली करावी. खोडावर/ सालीवर उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून खोडावर गवत बांधावे. तसेच झाडाच्या खोडाला बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी. कलमीकरण केलेल्या खुंटावर नवीन आलेली फूट कापून काढावी. झाडांना ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. झाडाच्या आळ्यामध्ये वाळलेले गवत, पाचट किंवा इतर पालापाचोळा यांचे आच्छादन करावे. कोरडवाहू क्षेत्रात लागवड केली असल्यास तेथे मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कलमीकरण केलेल्या नवीन झाडास काठीचा आधार द्यावा. मोसंबीची आंबिया बहराची फळे धरली असल्यास तसेच नवीन लागवड केलेल्या बागेस ५ ते ७ दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो दुहेरी आळे पद्धतीने द्यावे. झाडाच्या आळ्यामध्ये वाळलेले गवत, पाचट किंवा इतर पाला पाचोळा याचे आच्छादन टाकावे. झाडांना बोर्डो पेस्ट (१० टक्के) पावसाळ्यापूर्वी लावावी. पाण्याची कमतरता असल्यास आंबिया बहर धरू नये. बागेवर ६ टक्के केओलीनची (६० ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करावी. पोटॅशियम नायट्रेटची ८ ते १० दिवसांच्या अंतराने १.५ ते २ टक्के तीव्रतेची (१५ ते २० ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करावी. लिंबूवर्गीय फळझाडे : मृग बहराची फळे तोडून टाकावीत व जमिनीची नांगरट करावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लिंबुवर्गीय फळझाडांना ३५ ते ५५ दिवसाचा ताण सुरू करावा. नवीन फळबागेसाठी आखणी करून खड्डे खोदणे सुरू करावे. इतर फळझाडे : बोरीची छाटणी एप्रिलमध्ये केली नसल्यास मे महिन्यात लवकरात लवकर उरकून घ्यावी. पाण्याची उपलब्धता असल्यास सीताफळ आणि चिंच झाडांना पाणी सुरू करावे. लवकर फुले येण्यास मदत होईल व पुढे बाजारभाव चांगला मिळेल. चिकूची काढणी संपवावी. नारळ झाडास जमिनीच्या मगदुरानुसार ६ ते १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२- २२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)