अचलपूरच्या शेतकऱ्यांची बीजोत्पादनात भरारी

कंपनीची बियाणें स्वच्छता आणि प्रतवारी यंत्रणा
कंपनीची बियाणें स्वच्छता आणि प्रतवारी यंत्रणा

अचलपूर (जि. अमरावती) येथील कृषी समृद्धी उत्पादक कंपनीने राज्यात स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. कंपनीने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना एकत्र करीत बीजोत्पादनातून प्रगती साधली. पेरणीपासून ते बियाणे विक्रीपर्यंतच्या सर्व टप्प्यात सभासद शेतकरी सहभागी असतात. त्यामुळे अपेक्षित नफा मिळविण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत.  

एक छोटासा प्रयत्न मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरते, हा विश्‍वास रुजविण्यात अचलपूर ( जि. अमरावती) येथील कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. ही शेतकऱ्यांची कंपनी यशस्वी ठरली. अनेक अडथळ्यांवर मात करीत शेतकऱ्यांच्या कंपनीने बीजोत्पादनात मोठी आघाडी घेतली. शेतकऱ्यांनी केवळ पीक उत्पादनावर न थांबता स्वतः एकत्र येऊन प्रक्रिया किंवा शेतमाल विक्री करावी या उद्देशाने २०१२ साली अचलपूर परिसरातील कापूस उत्पादक एकत्र आले.यासाठी  समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाची मदत मिळाली.  तत्कालीन प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यांनी या उपक्रमासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. या वेळी ५०० एकरांवरील पाच हजार क्‍विंटल उत्पादित कापसावर खासगी जीनिंग मिलमध्ये प्रक्रिया करून त्याच्या गाठी बांधण्यात आल्या. या गाठींच्या निर्यातीचा विचार होता; परंतु, त्याकरिता लागणारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ नव्हता. शेतकऱ्यांनादेखील दुसऱ्या हंगामाकरिता पैशाची गरज असल्याने या गटाला निर्यातीचा उद्देश साधता आला नाही.  गटाने ७५० रुपये प्रती गाठ याप्रमाणे जीनिंग व्यावसायिकाशी प्रक्रियेसाठी करार केला. मात्र या उपक्रमामुळे बाजारभावापेक्षा एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर शेतकऱ्यांना मिळाला. शेतकऱ्यांचा हुरूप वाढला. त्यातून उत्पादक कंपनीची नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले.

शेतकऱ्यांनी केली कंपनीची नोंदणी   पहिल्या टप्प्यात २०० शेतकरी एकत्र आले. या गटाने १८ नोव्हेंबर २०१४  रोजी कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अशी नोंदणी केली. अमरावती विभागीय आयुक्‍त कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीला नोंदणी परवाना मिळाला. याबाबत माहिती देताना कंपनीचे सचीव रवी पाटील म्हणाले, की कंपनीत सहभागी होण्यासाठी शेअर्सची रक्कम नाही. जो शेतकरी पीक लागवड ते बियाणे विक्रीपर्यंत सहभागी होतो, त्यास सभासद म्हणून मान्यता मिळते. शेतकऱ्याने काटेकोरपणे नियमांचे पालन केले पाहिजे ही अट आहे. अमरावती जिल्हा हा संत्रा उत्पादक जिल्हा. सन २०१३, २०१४ आणि २०१५  या काळात संत्र्याचे भरपूर उत्पादन झाले. संत्र्याचे दर तीन रुपये किलोपर्यंत खाली आले. व्यापारी या दरातही संत्रा खरेदीस तयार नव्हते. त्यामुळे कंपनीने शेतकरी ते ग्राहक संत्रा विक्रीचा निर्णय घेतला. समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना प्रकल्पातून वाहतूक खर्च देण्यात आला. संत्रा उत्पादकांनी पुणे, मुंबई, बंगळूर, विशाखपट्टणम, कोलकता, श्रीनगर  शहरात संत्रा विक्रीचे स्टॉल लावले. यामुळे शेतकऱ्यांना खर्च वजा जाता ३५ रुपये किलो दर मिळाला. त्यामुळे दरवर्षी कंपनीतर्फे विविध शहरात संत्रा विक्रीस पाठविला जातो. बीजोत्पादनाला झाली सुरवात कंपनीने शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढ आणि विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. सन २०१२-१३ हंगामात खासगी बियाणे कंपनीसोबत नऊ एकरावर कांदा बीजोत्पादन करार करण्यात आला. यामध्ये नऊ शेतकरी सामील झाले होते. शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे उत्पादन घेऊन दाखविले.

जिल्ह्यात पाहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या पातळीवर लाल कांदा बियाणे उत्पादन व्यवसायिक तत्वावर केले. या अनुभवातून बीजोत्पादनात चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो, हे लक्षात आले. भेंडी बीजोत्पादनाचे वाढले क्षेत्र भेंडी बीजोत्पादनाबाबत रवी पाटील म्हणाले, की पारंपरिक पिकांऐवजी व्यवसायिक पिकाकडे शेतकरी वळले पाहिजे, यासाठी आम्ही पुढाकार घेतला. यासाठी भेंडी बीजोत्पादन कार्यक्रम राबविला. कंपनीने २०१३-१४ या हंगामात एक हजार एकरावर भेंडी बीजोत्पादन घेतले. पाच हजार रुपये प्रती क्‍विंटल या दराने कंपनीला बियाणे पुरवठ्याचा करार होता. परंतु, त्याचवेळी भेंडीच्या दरात तेजी आल्याने कंपनीने शेतकऱ्यांना १७ हजार रुपये प्रति क्‍विंटल असा दर दिला. यंदाच्या वर्षी दोन हजार एकरावर भेंडी बीजोत्पादन होत आहे. यासाठी कंपनीने दिल्ली येथील एका बियाणे कंपनीसोबत करार केला आहे.

नवीन जातींसाठी प्रोत्साहन अमरावती जिल्ह्यात तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, कांदा, भेंडी या पिकांच्या नवीन जातींच्या लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता कंपनी प्रयत्न करते. कंपनीने राज्यातील कृषी विद्यापीठांच्या बरोबरीने राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशातील कृषी विद्यापीठांकडून ब्रिडर सीड मिळविले. नवीन जातींचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यावर कंपनीने भर दिला आहे. शेतकऱ्यांना पेरणी पासून ते बियाणे विक्रीपर्यंतच्या सर्व टप्प्यात सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणास किती दर मिळाला हे कळते. व्यापाऱ्यांशी बियाणे दराबाबतच्या चर्चेतही शेतकरी सहभागी असतात. त्यामुळे अपेक्षित दर मिळतो. विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा परिवर्तनवादी नवा उपक्रम ठरला आहे.

नऊ एकरांवरून चार हजार एकरांवर बीजोत्पादन बीजोत्पादन करताना शेतकऱ्यांना लागवड ते बियाणे पॅकिंगपर्यंत मार्गदर्शन केले जाते. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, खासगी कंपन्यांतील तज्ज्ञांच्या सल्ल्याने बीजोत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवारफेरी घेतली जाते. गुणवत्तापूर्ण उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्यास चांगली मागणी आहे.  सुरवातीला अवघ्या नऊ एकरांवरील बीजोत्पादन कार्यक्रम आज चार हजार एकरांवर पोचला आहे. बीजोत्पादनामुळे शेतकऱ्यांना दुप्पट दर मिळू लागला. कंपनीच्या माध्यमातून ६७० एकर सोयाबीन, ७४ एकर मूग, १०३ एकर उडीद, ९०० एकरावर हरभरा बीजोत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी कंपनीने ४,६३६  बॅग (प्रती ३० किलो बियाणे) सोयाबीन बियाणे विकले. दरवर्षी बियाणे विक्री वाढत आहे.

अशी आहे कंपनी

  • कंपनी कायद्यान्वये कृषी समृद्धी उत्पादक कंपनी लि. अशी नोंदणी. सध्या कंपनीचे अध्यक्ष देवानंद शेळके, उपाध्यक्ष शरद शर्मा आणि रवी पाटील हे सचिव आहेत.
  • अचलपूर बाजार समितीकडून कंपनीने चार हजार चौरस फुटांचा गाळा भाडेतत्त्वावर घेतला आहे. या ठिकाणी बियाणे स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग, साठवण आणि विक्री केली जाते.
  • बियाणे स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंगसाठी कंपनीने ५० लाख रुपयांची यंत्रणा खरेदी केली. यासाठी कंपनीने आर्थिक गुंतवणूक केली आहे. बॅंकेकडून काही रक्कम कर्जाऊ मिळाली. अन्न सुरक्षा अभियानात स्थानिक पुढाकाराची बाब अंतर्गत यंत्रणेच्या खरेदीसाठी दहा लाख रुपयांचे अनुदान मिळाले.
  • एक क्‍विंटल बियाणे प्रक्रियेसाठी शंभर रुपये खर्च होतो.  बॅग आणि टॅगच्या खर्चाचा समावेश केल्यास प्रति क्विंटल ५०० रुपये शेतकऱ्यांना खर्च येतो. या खर्चामध्ये कंपनीतर्फे शेतकऱ्यांना लागवडीपासून ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन केले जाते.
  • अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांतील सुमारे दोन हजार शेतकरी कंपनीशी जोडले गेले आहेत.
  • नफा ना तोटा तत्त्वाने कामकाज चालते. विक्री झालेल्या सर्व शेतमालाची रक्कम उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. कंपनीचे सदस्य पगार घेत नाही. केवळ कंपनीच्या उपक्रमासाठी लागणारा पैसा नफ्यातून घेतला जातो.
  •  संपर्क : रवी पाटील, ९७६४७७८१०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com