सोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची सुधारित पद्धत, मूलस्थानी जलसंधारण, योग्य वेळी ओलिताचे व्यवस्थापन, कीड रोगांचे नियंत्रण या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनवाढीतील अनेक समस्या दूर ठेवणे शक्य होईल. योग्य जातीची निवड
हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खरिपातील पावसाच्या प्रमाणानुसार योग्य कालावधीच्या जातीची निवड करावी. कमी पावसाचे भाकीत असल्यास, कमी कालावधीच्या एमएसीएस-७१, जेएस -९३-०५, जेएस ९५-६० या जातींची निवड करावी. पावसाचे भाकीत समतोल व योग्य असल्यास जेएस-३३५, फुले कल्याणी, एनआरसी-३७ या जातींची निवड ओलिताची सोय असल्यास फुले अग्रणी या जातीची निवड करावी. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाने पी.के.व्ही. यलो गोल्ड (एएमएस-१००१) ही जातसुद्धा नुकतीच प्रसारित केली आहे. बियाण्यांची उपलब्धता पाहून जातीची निवड करावी. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया द्रवस्वरूपातील रायझोबियम कल्चर ५ मि.लि., पी.एस.बी. कल्चर ५ मि.लि., ट्रायकोडर्मा कल्चर ५ मि.लि. व उपलब्ध झाल्यास द्रवस्वरूपातील के.एस.बी. कल्चर ५ मि.लि. याप्रमाणे प्रतिकिलो बियाण्याला पेरणीपूर्वी साधारण अर्धा तास बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवल्यानंतर लगेचच पेरणी करावी.
सुधारित पेरणी पद्धतीचा अवलंब सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी जोडओळ पेरणी पद्धत, सोडओळ पेरणी पद्धत (पट्टापेर) चा अवलंब करावा. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बैलजोडी चलीत पेरणीयंत्र, ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनची सुधारित पेरणी करता येते.
जोडओळ पेरणी पद्धत : सोयाबीनचे दोन ओळीतील अंतर दीड फूट (४५ सें.मी.) ऐवजी एक फूट (३० सें.मी.) राखावे. प्रत्येक तिसरी ओळ रिकामी ठेवावी. म्हणजे प्रत्येक जोडओळीनंतर ६० सें.मी. (दोन फूट) जागा रिकामी राहूनसुद्धा ओळी व झाडांच्या संख्या कमी होत नाही. उत्पादनात वाढ शक्य होते. सोडओळ पद्धत : सोयाबीनची पेरणी करताना प्रत्येक तीन ओळींनंतर चौथी ओळ अथवा चौथ्या ओळींनंतर पाचवी ओळ मोकळी ठेवावी. म्हणजे शेतात तीन-तीन अथवा चार-चार ओळींचे पट्टे तयार होतात. या पद्धतीमध्ये ओळींची संख्या काही प्रमाणात कमी होऊनसुद्धा उत्पादनात वाढ शक्य होते. वरील दोन्ही पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यानंतर डवऱ्याच्या साह्याने फेरा देताना, डवऱ्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून रिकाम्या ठेवलेल्या ओळीमध्ये गाळ पाडून घ्यावा. त्यामुळे शेतातील जोड ओळी अथवा तीन किंवा चार ओळींचे पट्टे आपोआपच गादीवाफ्यावर येतात. शेतात पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये साचते, मुरते. अशाप्रकारे मूलस्थानी जल संधारण झाल्याने जमिनीतील ओल टिकून राहते. या मोकळ्या ओळींमुळे पिकाची निगराणी, निरीक्षण व वेळप्रसंगी फवारणी करणे शक्य होते. पिकाची एकसारखी वाढ होते, पावसात मोठा खंड पडल्यास व ओलिताची सोय असल्यास तुषार संचांचे पाइप टाकण्यास जागा उपलब्ध होऊन तुषार सिंचन पद्धतीने किंवा सऱ्यांद्वारे पाटपाणी देता येते. शेतात हवा खेळती राहते, पिकाला सूर्यप्रकाशाचे वितरण एकसमान होते. रासायनिक खतांचा समतोल वापर सोयाबीन पेरणीचे वेळी एकरी अर्धा बॅग युरिया, पावणेचार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, आवश्यक असल्यास अर्धा बॅग म्युरेट ऑफ पोटॅश आणि ८ -१० किलो झिंक सल्फेट द्यावे.
सोयाबीनचे पीक कळी अवस्थेत येताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) शेंगामध्ये दाणे भरताना १३:००:४५ एक टक्के (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अथवा डीएपी २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) एकात्मिक तण नियंत्रण व्यवस्थापन
सुरवातीच्या ३५ -४० दिवसांच्या काळात पिकासोबत तणाची स्पर्धा होते. उत्पादनात २५ ते ८५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. एकात्मिक तण व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. पेरणी झाल्याबरोबर त्वरित अथवा पेरणीच्या दुसऱ्या दिवशी पेंडीमिथॅलीन ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी, याप्रमाणे फवारणी करावी. पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी (तणे किंवा पीक दोन ते तीन पानांच्या अवस्थेत असताना.) पुढीलप्रमाणे फवारणी करावी. इमॅझिथॅपर २५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी पीक साधारणत: २२ -२५ दिवसांचे झाल्यानंतर मजुरांद्वारे निंदणी करून घ्यावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार एक किंवा दोनवेळा डवरणी करावी. पीक फुलोऱ्यात आल्यानंतर डवरणीची पाळी देऊ नये. मूलस्थानी जलसंधारण, ओलीत व्यवस्थापन
मूलस्थानी जलसंधारणासाठी जोडओळ किंवा पट्टापेर पद्धतीचा अवलंब करावा. ओलिताची व्यवस्था असल्यास, पावसात मोठा खंड पडल्यास व जमिनीस भेगा पडल्यास पीक कळी अवस्थेत येताना; तसेच शेंगामध्ये दाणे भरताना पाणी द्यावे. कीड, रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन प्राथमिक अवस्थेत केसाळ अळीचा प्रादुर्भाव होतो. पुढे फुलोरा अवस्थेपासून चक्री भुंगा, खोडअळी (खोडमाशी), उंटअळी, पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतो. यासोबतच पाने व शेगांवरील तांबेरा हा बुरशीजन्य रोगही येतो. या कीड व रोगाचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने वेळच्या वेळी करावे.
संपर्क : जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (जितेंद्र दुर्गे हे श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे प्राध्यापक असून, हेमंत डीके हे प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथे कार्यरत आहेत.)