हवामान कोरडे आणि थंड राहील

हवामान कोरडे आणि थंड राहील
हवामान कोरडे आणि थंड राहील

महाराष्ट्रातील वातावरण बहुतांश कोरडे व थंड राहण्याची शक्यता सध्याच्या हवामान स्थितीवरून दिसून येत आहे. 15 तारखेनंतर हवामानात काही प्राणात बदलाची शक्यता दिसत आहे.

महाराष्ट्रावरील वातावरणात हवेचा दाब कमी होत असून, तो १०१० हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे या आठवड्याचे सुरवातीस थंडीचे प्रमाण सौम्य राहील. त्याचवेळी बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तिथे भावी काळात चक्राकार वारे वाहणे शक्‍य आहे. अर्थात, त्याचा त्वरित कोणताही परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार नाही. काश्‍मीर व ईशान्य भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. संपूर्ण हिमालयाच्या हवेच्या कमी दाबामुळे तिकडेही थंडी सौम्य राहील. या आठवड्यातील बुधवारनंतर (ता. १५, १६ व १७) हवामानात बदल जाणवतील. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाब क्षेत्रामुळे चक्राकार वारे वाहून, महाराष्ट्राचा पश्‍चिम भाग ढगाने व्यापला जाईल. ता. १५ रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यांच्या भागात अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. पुढे १६ व १७ तारखेला पाऊस मराठवाड्याचा भागही व्यापत नाशिक जिल्ह्यापर्यंत विस्तारला जाईल. ता. १८ नंतर वातावरण निवळेल. भरपूर सूर्यप्रकाश आणि थंडी वाढण्यास सुरवात होईल. समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्यच राहील. उत्तर भारतातील हरियाना, पंजाब, दिल्ली, छत्तीसगड, पश्‍चिम उत्तर प्रदेश भागावर दाट धुके कायम राहील. भंडारा जिल्ह्यात ताशी वाऱ्याचा वेग वाढेल. विदर्भात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील आणि थंडीचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे राहील.

  1. कोकण ः सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४५ टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ६८ टक्के इतकी राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांतच दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २९ टक्के राहील तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ६१ टक्के इतकी राहील. दक्षिण कोकणात दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.
  2. उत्तर महाराष्ट्र ः नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, नंदूरबार जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील आणि नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३६ ते ३८ टक्के राहील, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ४० ते ४३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. पावसाची शक्‍यता नाही.
  3. मराठवाडा ः लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ते ३१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के व दुपारची १५ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ४८ टक्के राहील. उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २७ टक्के इतकी कमी राहील. पावसाची शक्‍यता अल्पशा प्रमाणात काही भागांत राहील.
  4. पश्‍चिम विदर्भ ः बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५५ ते ५७ टक्के, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ६० ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २१ ते २९ टक्के राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३० ते ४० टक्के राहील.
  5. मध्य विदर्भ ः मध्य विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. कापूस वेचणीचे कामासाठी हवामान अत्यंत अनुकूल राहील. त्याचप्रमाणे खरिपातील काढणी केलेला माल उन्हात वाळवावा, मगच साठवण करावी.
  6. पूर्व विदर्भ ः पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस व उर्वरित जिल्ह्यांत ते १५ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३५ टक्के राहील. पावसाची शक्‍यता नाही.
  7. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील, तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर कोल्हापूर जिल्ह्यात ते १८ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांत ५४ ते ५८ टक्के राहील व उर्वरित जिल्ह्यांत ती ४७ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ किलोमीटर राहील.

कृषी सल्ला ः

  • कापूस वेचणीसाठी हवामान अत्यंत अनकूल असून, कापसाची वेचणी सकाळी करावी. त्या वेळी वारा शांत असतो आणि कापूस स्वच्छपणे वेचता येतो. त्यास कचरा चिकटत नाही.
  • रब्बी हंगामातील हरभरा, सूर्यफूल, ज्वारी, गहू या पिकांना पिकांचे वाढीचे अवस्थेनुसार पाणी द्यावे.
  • रब्बी ज्वारीचे पीक एक महिन्याचे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता युरियाद्वारे द्यावा.
  • गहू, हरभरा, मोहरी या पिकांची पेरणी १५ नोव्हेंबरपूर्वी करावी.
  • - डॉ. रामचंद्र साबळे (लेखक ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ असून, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे संशोधन परिषदेचे सदस्य आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com