विद्याताईंनी घेतला एकात्मिक शेतीविकासाचा ध्यास

विद्याताईंनी घेतला एकात्मिक शेतीविकासाचा ध्यास
विद्याताईंनी घेतला एकात्मिक शेतीविकासाचा ध्यास

ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी ॲवॉर्ड    विद्या बाबूराव रुद्राक्ष, डिघोळअंबा,  जि. बीड ----------------------------------- हिंमत असली की किंमत होते असं म्हणतात. डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील विद्याताई बाबूराव रुद्राक्ष त्यापैकीच एक. सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवीचा उपयोग त्यांनी शेती सुधारणा आणि मुलांना शिकविण्यासाठी केला. त्याचा परिणाम म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील शेती शाश्वत करत, प्रक्रियेच्या माध्यमातून उत्पादित शेतमालाला अपेक्षित दरही मिळवून दिला आणि मुलांना आयटीपर्यंतचे शिक्षणही दिले.

सन १९९३ पासून शेतीत उतरलेल्या डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील विद्या रुद्राक्ष यांचे पती कोकण विभागात कृषी खात्यात सेवेत होते. कोकणपट्टीतील हवामान मुले आणि त्यांना न मानवल्यामुळे त्यांनी स्वत:च्या गावी म्हणजेच डिघोळअंबा येथे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. मुलांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला. विद्याताईंनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेती आणि मुलांच्या शिक्षणासाठी करणे सुरू केले. पारंपरिक शेती करताना भरपूर पीक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अनियंत्रित वापर केला. परंतु या शेतीत उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याचे पाहून त्यांनी शेतीच्या पद्धतीत बदल करण्याचे ठरविले.

रुद्राक्ष यांची पंधरा एकर शेती आहे. पहिल्यांदा शेणखताच्या उपलब्धतेसाठी जनावरे वाढविली. जमीन सुपीक बनविण्यासाठी शेणखताचा जास्तीत जास्त वापर सुरू केला. गांडूळ खत निर्मिती, कीटकनाशक म्हणून गोमूत्र आणि कडुनिंब पाल्याचा वापर सुरू केला. ताग, धैंचा यांसारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडली. शेतीतील काडीकचरा न जाळता त्याचा फळझाडांना आच्छादन म्हणून उपयोग सुरू केला. शेतशिवारात पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी बांधबंदिस्ती केली. विहिरीतील पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार आणि ठिबक संचाचा वापर सुरू केला.

जमीन सुधारणा सुरू झाल्यानंतर विद्याताईंनी नव्याने पीक लागवडीचे नियोजन केले. चार एकरावर केसर आंब्याची १० बाय ५ मीटरवर लागवड केली. त्यामध्ये हळद, अाले, सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा, इत्यादी आंतरपिके घेऊन उत्पन्न वाढविण्यास सुरवात केली. जमिनीचे सशक्‍तीकरण, धूप थांबविणे, पाणी व्यवस्थापन, जनावरांचे व्यवस्थापन, बायोगॅसमधून ऊर्जानिर्मिती व ऊर्जा बचत, पीक संरक्षण, अन्न सुरक्षा, शेतीमालाचे मूल्यवर्धन, सामाजिक बांधीलकी, गुंतवणूक, पर्यावरण आदी बाबतीत केलेल्या परिणामकारक कामामुळे विद्याताई  कार्यक्षम महिला शेतकरी म्हणून पुढे आल्या आहेत.

शेती उत्पन्नातून बांधले घर

वाढलेल्या पीक उत्पादनातून बचत करत त्यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये छोटेसे घर बांधले. या घराच्या पाठीमागे जनावरांसाठी गोठा, पाण्याचा हौद, बायोगॅस, ट्रॅक्‍टर व शेतातील इतर अवजारे ठेवण्यासाठी शेड बांधली. जनावरांना लागणाऱ्या वैरणीसाठी जागा ठेवली. शेतपरिसरात आंबा, चिक्‍कू, डाळिंब, अंजीर, पेरू, सीताफळ, कागदी लिंबू, बदाम, केळी आदी फळझाडांची लागवड केली. यासोबतच घर परिसर सुशोभित करण्यासाठी गुलाब, मोगरा, रातराणी, शेवंती, पारिजातक, जुई, चाफा, निशीगंध आणि जास्वंद आदी फुलझाडांचीही लागवड केली.

बचत गटातून महिलांना रोजगार

शेती व्यवस्थापनाचे काम करत असताना विद्याताई रुद्राक्ष यांनी १९९७ मध्ये डिघोळअंबा गावामध्ये कल्पना चावला महिला बचत गटाची स्थापना केली. वीस सदस्य असलेल्या महिला सुरवातीला ५० रुपये प्रतिमहिना आणि आता २०० रुपये प्रतिमहिनाप्रमाणे बचत करताहेत.

प्रक्रिया उद्योग आणि थेट विक्रीतून मूल्यवर्धन  

शेतामध्ये सेंद्रिय धान्य, कडधान्य व हळद उत्पादन होते. शेतमाल मूल्यवर्धनावर भर दिला. या माध्यमातून इतरांना रोजगार देण्याची तयारी केली. विद्याताईंनी हळद प्रक्रिया उद्योग सुरू केला. गहू, ज्वारीची थेट विक्री सुरू केली. कडधान्यापासून डाळी करून त्यांची वर्षभर विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे चार महिलांना रोजगार मिळाला आहे.

विशेष बाबी

  • नोकरीमध्ये सात वर्षे शिल्लक असतानाही शेतीचे काम वाढल्याने २०१० मध्ये पतींना  विद्याताईंनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगितले.  त्यानंतर शेतीविकासाचा आराखडा तयार करत पीक लागवड व्यवस्थापनाचे नियोजन राबवले.
  • शिलकीतून ट्रॅक्‍टर घेतला. ट्रॅक्टरच्या उपलब्धतेमुळे त्यांनी गावाजवळील तळ्यातील सुमारे १००० ट्रॉली गाळ स्वतःच्या शेतीत मिसळला. त्यातून जमीन सुपिकता वाढविण्याचा प्रयत्न.
  • जमिनीच्या उपलब्धतेनुसार हंगामी पिके आणि फळपिकांचे नियोजन.
  • हळदीतील कुरकुमीन प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न, प्रक्रिया उद्योगाला सुरवात.
  • गावातील २० महिला बचत गटाची सुरवात. त्यातून प्रक्रिया उद्योगाला गती. शेती व शेतीपूरक उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • खळद (जि. पुणे) येथील सेंद्रिय शेती अभ्यास गटाच्या सदस्या.
  • २०१५ मध्ये पंजाबमधील चंडीगड येथील पाचव्या राष्ट्रीय सेंद्रिय शेती संमेलनाचे विशेष आमंत्रण.
  • २०१५ मध्ये सेंद्रिय शेतीतील कार्यासाठी अंबाजोगाई कृषी विज्ञान केंद्राकडून सन्मानीत.
  • २०१७ मध्ये राज्य शासनाकडून जिजामाता कृषिभूषण पुरस्कार.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com