सातत्यपूर्ण पिकांना हिरवळीच्या खतांची जोड

सातत्यपूर्ण पिकांना हिरवळीच्या खतांची जोड

सवना (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील गणेश चेलमीलवार यांनी पारंपरिक हंगामी पिकांना ऊस, केळी, मोसंबी या पिकांच्या सातत्यातून आर्थिक आधार दिला आहे. खेळत्या उत्पन्नासाठी टोमॅटो, काकडीसह टरबूज ही पिकेही फायदेशीर ठरतात. या पिकांना आवश्यक जमिनीची सुपीकता मिळवण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून शेणखताचा अधिक वापर, हिरवळीच्या खतासाठी धैंचासारख्या पिकांची लागवड ते करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सवना (ता. महागाव) येथील गणेश माधव चेलमीलवार यांच्याकडे वडिलोपार्जित ३० एकर शेती. त्यांच्या वडिलांनी किराणा दुकान चालवतानाच शेतीचा व्यासंगही जपला. पारंपरिक शेतीमध्ये ज्वारी, कपाशी, ऊस ही पिके होती. साधारणतः १९७५ सालीच दहावीनंतर गणेश यांनी शेतीमध्ये लक्ष घातले होते. २००७ मध्ये वडिलांच्या निधनानंतर पूर्ण सूत्रे त्यांच्या हाती आली. केळी लागवडीत सातत्य :

  • गणेश यांनी दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१४ मध्ये दोन एकर क्षेत्रामध्ये केळी लागवड केली. प्रति रोप १५ रुपये प्रमाणे २५०० उतीसंवर्धित रोपे लावली. त्यातून ५५० क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला १२ रुपये प्रति किलो दर मिळाल्याने ६.५ लाख रुपये उत्पन्न मिळाले. सुमारे दीड लाख रुपये खर्च झाला. गेल्या वर्षी उत्पादन थोडे घटले असले तरी केळी लागवड क्षेत्र सात एकरापर्यंत वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. त्यानुसार बेण्याची खरेदी केली आहे.
  • पुसद तालुक्यामध्ये केळी लागवडीचे प्रमाण मोठे असल्याने केळी खरेदीदार व्यापारीच उत्तम शेतकऱ्यांच्या शोधात असतात. चेलमीलवार यांची शेती रस्त्यालगत असल्याने व्यापाऱ्याची आवकजावक कायमच राहते.
  • भाजीपाला लागवडीचा प्रयोग ः दरवर्षी दीड एकर क्षेत्र दोडकी, काकडी, टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांसाठी असते. त्यातून रोख रक्कम खेळती राहत असल्याने ही पिके उपयुक्त ठरतात. भाजीपाला विक्रीसाठी पुसद बाजारपेठेला त्यांची पसंती आहे. मात्र, या वर्षी पाण्याअभावी भाजीपाला पिके घेऊ शकले नसल्याचे गणेश यांनी सांगितले. टरबुजातून भरभराट ः जानेवारी २०१५ पासून मल्चिंगवर टरबूज पीक घेतात. तीन एकरमधून ५५ टन टरबूज उत्पादन मिळाले. त्याला ६ रुपये २५ पैसे प्रति किलो असा दर जागेवरच मिळाला. टरबूज व्यवस्थापनाला एकरी ५० हजार रुपये खर्च झाला. ऊस पिकातही सातत्य ः

  • गणेश यांच्याकडे वडिलांपासून सुमारे आठ एकर क्षेत्रामध्ये ऊस लागवड असते.
  • २०१६ मध्ये पाच एकर क्षेत्रामध्ये ऊस लागवडीमध्ये हरभरा आंतरपीक घेतले होते. आंतरपिकातून ३० क्विंटल उत्पादन मिळून, सुमारे १ लाख ३० हजार रुपये निव्वळ फायदा झाला. ऊस लागवडीचा खर्च बऱ्यापैकी वसूल झाला.
  • उसाचे एकरी ५० टनापर्यंत उत्पादन मिळते. व्यवस्थापनासाठी सरासरी २४ हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. त्यानंतर खोडवा घेतला जात असल्याने उत्पादन खर्चात बचत होते.
  • फळपिकाचा जपला वारसा ः दोन एकर क्षेत्रामध्ये दहा वर्षे जुनी मोसंबी लागवड आहे. दोनशे झाडे आहेत. बाग जुनी असली तरी वेळेवर छाटणी, रोग किडीसाठी फवारणी, खोडांना बोर्डो पेस्ट लावणे, फळमाशीसाठी सापळ्यांचा वापर याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. यासाठी सामान्यत: एकरी १० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. संपूर्ण बाग व्यापाऱ्यांना देतात. त्यातून दोन एकरमधून गेल्या वर्षी एक लाख रुपये मिळाले होते. या वर्षी दीड लाख रुपयांची मागणी झाली आहे. हिरवळीच्या खताकरिता धैंचाचा पर्याय ः पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेणखतांचा वापर महत्त्वाचा आहे. मात्र, चारा व पाणीटंचाईमुळे गेल्या काही वर्षांमध्ये जनावरांचे प्रमाण कमी होत असल्याने शेणखताची उपलब्धताही कमी झाली आहे. त्यामुळे गणेश यांनी शेणखताइतकेच हिरवळीच्या धैंचा पिकाला प्राधान्य दिले. गेली तीन वर्षे सलग हिरवळीचे पिके घेत आहेत. आंतरमशागतीनंतर नुसते बियाणे फेकूनही धैंचाची उगवण होते. खरिपासाठी पीक नियोजन झाल्यानंतर धैंचा लागवड करतात. लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांत पीक फुलोरा अवस्थेत येते. या काळात ते जमिनीत गाडले जाते.

  • एकरी दहा किलो बियाण्याची लागते. त्याचा दर ४५ रुपये प्रति किलो असा आहे.
  • हिरवळीचे खतानंतर टरबूज, ऊस, केळी यासारखी पिके त्यांनी घेतली आहेत. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून, अन्नद्रव्ये उपलब्ध होत असल्याने ते जमिनीच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरत असल्याचा अनुभव आहे.
  • शेतीच्याच सेवेत राहण्याचा प्रयत्न ः

  • ॲग्रोवनचे नियमित वाचक असून, त्यातून प्रयोगशीलतेला बळ मिळत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
  • शेतीमुळेच आजवर संपन्नतेचा मोठा पल्ला गाठता आला. आपल्या मुलानेही हाच वसा चालवावा, ही इच्छा होती. त्यामुळे आपला मुलगा प्रवीणला बी.एस्सी.(कृषी) अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला लावल्याचे त्यांनी सांगितले. हेच प्रवीण आता कृषी खात्यात पर्यवेक्षक आहेत.
  • शेती परवडत नसल्याने आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातच गणेश चेलमीलवार यांच्यासारखे शेतीतून प्रगती करणारे शेतकरीही आहेत. शेतातील प्रयोगशीलतेने मिळालेला त्यांचा आत्मविश्वास नक्कीच समाधानकारक आहे.
  • अनुकरण करण्यासाखे ...

  • जमिनीच्या सुपीकतेला प्राधान्य. एकरी ९ ट्रॉली शेणखत आणि हिरवळीच्या खतांचा वापर ते करतात.
  • ३० एकरपैकी १२ एकर ठिबक सिंचनाखाली आणली.
  • सिंचनाकरिता २ विहिरी असून, ठिबकसह २ तुषार संच व एक रेनगन ते वापरतात.
  • भारनियमनावर पावरटिलर चालवून, त्यावर सिंचन करण्याचा उपाय शोधला आहे.
  • गांडुळखतासाठी चार हौद आहेत. शेणखताच्या उपलब्धतेनुसार गांडुळखत तयार करतात.
  • सुपीकतेसाठी जीवामृताचाही अधूनमधून वापर.
  • २०१५ मध्ये यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला.
  • संपर्क ःगणेश चेलमीलवार, 9763757597

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com