अन्नपदार्थ आणि त्याच्या उत्पादनाची प्रक्रिया यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार प्रामुख्याने केला जात आहे. कृषी प्रक्रिया आणि अन्नपदार्थांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे मोजमाप करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. तसे लेबल या उत्पादनांवर असल्याने ग्राहकांना अधिक पर्यावरणपूरक प्रक्रिया राबवणाऱ्या उत्पादनांची निवड करणे सुलभ होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एअरोस्पेस या स्विस कृषी संशोधन संस्थेने एकत्रितरीत्या माहितीसाठा तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी सुमारे ४० हजार फार्म आणि १६०० प्रक्रिया आणि पॅकेजिंग उद्योगांचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला आहे. ४० उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांचा अभ्यास त्यात केला आहे.
मांसासाठी मोठ्या जनावरांचे पालन करणाऱ्या उद्योगांकडून प्रति १०० ग्रॅम प्रथिनांच्या निर्मितीसाठी १०५ किलो कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित होतो, तर त्यासाठी ३७० वर्गमीटर जमीन वापरली जाते. अशाच साध्या पद्धतीने मांस निर्मात्या उद्योगाच्या तुलनेमध्ये हे प्रमाण १२ आणि ५० पट अधिक आहे. त्याचप्रमाणे वाटाण्याच्या उत्पादनातून एवढीच प्रथिने मिळवण्यासाठी साध्या पद्धतीने मांस निर्मात्या उद्योगाच्या तुलनेमध्ये सहा पट कर्ब उत्सर्जन कमी होते, तर जमीन ही ३६ पटीने कमी लागत असल्याचे अभ्यासात आढळले आहे. मत्स्यपालनातून तुलनेने कमी कर्ब उत्सर्जन होत असल्याचे मानले जाते. मात्र, त्यातूनही गायींच्या प्रतिकिलो जिवंत वजनाच्या तुलनेमध्ये अधिक मिथेन आणि हरितगृह वायू उत्सर्जित होत असल्याचे आढळले. एक पिंप बिअर तयार करण्यासाठीही अन्य पद्धतीच्या तुलनेमध्ये ३ पट अधिक कर्ब उत्सर्जन आणि ४ पट जमीन अधिक वापरली जाते. या अभ्यासामध्ये पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारे पर्यावरणीय घटक (उदा. पाणी, जमीन व अन्य ) व त्यातून होणारे युट्रोफिकेशन आणि आम्लीकरण या बरोबरच विविध उत्सर्जन या निकषांचा विचार केला आहे. अनेक उत्पादक संख्येने कमी असले तरी त्यांचा पर्यावरणावरील परिणाम मोठा असतो. उदा. १५ टक्के मांसासाठी जनावरांचे पालन करणारे उद्योग १.३ अब्ज टन कर्ब वायू उत्सर्जित करतात. हे प्रमाण ९५० दशलक्ष हेक्टर शेतीतून उत्सर्जित होणाऱ्या कर्बाइतके आहे. एकूण उत्पादनाच्या तुलनेमध्ये २५ टक्के उत्पादक सरासरी ५३ टक्के विपरीत परिणाम करतात. हा फरक त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रिया, पद्धती यामुळे पडत असतो. अनेक प्राणीज पदार्थ हे पर्यावरणावर अधिक ताण निर्माण करतात. उदा. गायीपासून निर्माण होणाऱ्या प्रतिलिटर दूधासाठी सोयादुधाच्या तुलनेमध्ये सुमारे दुप्पट जमीन वापरली जाते. अगदी शाश्वत पद्धतीने मिळवलेले मांस आणि डेअरी उत्पादनाऐवजी संपूर्ण शाकाहारी (यांना व्हेगान्स असे इंग्रजीमध्ये म्हणतात. हे लोक दूध, अंडी व कोणताही प्राणीज पदार्थ खात नाहीत.) आहार पर्यावरणासाठी फायदेशीर ठरू शकतो. अशा किमान प्राणीज पदार्थाकडे वळण्याची गरज निर्माण होत आहे. अगदी ५० टक्के लोकांनीही प्राणीज आहाराऐवजी वनस्पतिजन्य आहाराचा वापर केला तरी हरितगृह वायूच्या उत्सर्जनामध्ये ७३ टक्क्यांनी घट होईल. तेले, अल्कोहोल, साखर यांसारख्या अधिक स्रोताचा वापर करणाऱ्या पदार्थांचा वापर कमी केला तरी २० टक्के उत्सर्जन कमी होईल. त्यातही अधिक उत्सर्जन करणाऱ्या प्रक्रियांचा वापर करणाऱ्या उद्योगाच्या तुलनेमध्ये सामान्य उत्पादकांची उत्पादने वापरल्या हरितगृह वायूच्या उत्सर्जनामध्ये ४३ टक्क्यांनी घट होईल. जागतिक पातळीवर कृषी पिकांखालील जमिनींचे प्रमाणही ३.१ अब्ज हेक्टर म्हणजेच ७६ टक्क्यांनी कमी करता येईल. सध्या वने, जंगलांवर शेतीमुळे येणारा ताण कमी करणे शक्य असल्याचे जोसेफ म्हणाले. पदार्थ एकच असला तरी त्याच्या निर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या पद्धतीनुसार पर्यावरणावरील परीणाम भिन्न असतात. बाजारातून खरेदी करताना आपल्याला त्याविषयी माहिती असत नाही. त्यामुळे पर्यावरणासाठी चांगल्या प्रक्रिया वापरणाऱ्या उद्योगांचीही निवड करणे शक्य होत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये अशी धोरणे व लेबल आपल्याला तयार करावी लागतील. यातून केवळ शेतकऱ्यांवर पर्यावरणाचा टाकला जाणारा भारही कमी होऊ शकेल. - जोसेफ पूरे, संशोधक, प्राणीशास्त्र विभाग, भूगोल आणि पर्यावरण विद्यालय.