कृषी उत्पादन, जैवविविधता यांतील संघर्ष टाळण्यासाठी होतोय अभ्यास

कृषी उत्पादन, जैवविविधता यांतील संघर्ष टाळण्यासाठी होतोय अभ्यास
कृषी उत्पादन, जैवविविधता यांतील संघर्ष टाळण्यासाठी होतोय अभ्यास

निसर्गाचे संवर्धन आणि कृषी उत्पादनासाठी शेती या दोन्ही बाबींमध्ये संघर्षाची स्थिती राहिलेली आहे. त्यासाठी जमिनीच्या वापराचे उत्तम नियोजन करण्याची आवश्यकता जागतिक पातळवरील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यासाठी जागतिक पातळीवरील जमीन वापराचा पर्यावरण आणि कृषी क्षेत्र यातील समन्वय शाश्‍वततेच्या अनुषंगाने अभ्यास करण्यात येत आहे. जर्मनीतील गोंटिगन विद्यापीठ, जर्मन सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह बायोडायव्हर्सिटी रिसर्च, हेल्महोल्ट्झ सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च, म्युनस्टर विद्यापीठ येथील संशोधकांचा गट जागतिक पातळीवर जंगले आणि पिकांखालील जमिनींचे नेमके भौगोलिक वितरण आणि जंगलामध्ये राहत असलेल्या हजारो प्राणी प्रजाती याविषयीची माहिती गोळा करत आहेत. त्याचप्रमाणे मुख्य कृषी पिके आणि त्यांचे उत्पादन याविषयी माहिती गोळा करत आहेत. त्यातून शेती आणि जैवविविधता यामध्ये होत असलेल्या संघर्षाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले. वाढत्या लोकसंख्येचा भार कृषिक्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात येत आहे. अशा वेळी जंगलांचे प्रमाण कमी होऊन शेतजमिनींचे प्रमाण वाढत आहे. त्याचे विपरीत परिणाम जंगले, वन्यजीव आणि स्थानिक पर्यावरणावर होत आहेत. सध्या चालू असलेल्या पद्धतीने शेतीचा विस्तार होत गेल्यास जागतिक पातळीवर ८८ टक्क्यांपर्यंतची जैवविविधता नष्ट होण्याचा धोका या अभ्यासातून समोर आला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी जमिनींची निवड करताना कमीत कमी प्राणी प्रजातींचे नुकसान होईल या अनुषंगाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.त्याविषयी माहिती देताना गोटिंगन विद्यापीठातील संशोधक ल्युकास एगली म्हणाले, की उष्ण कटिबंधातील अनेक देशांमध्ये जैवविविधता उत्तम असून, तेथील प्रजातींचे प्रमाण अधिक आहे. त्यांची विविधता व नैसर्गिक स्रोत जपण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या शेती उत्पादनाच्या संधी आणि आर्थिक विकासावर पाणी सोडावे लागेल. यासाठी कोणताही देश तयार होणार नाही. परिणामी राष्ट्रीय हित आणि जागतिक पातळीवरील शाश्वतता धोरणे यातही संघर्षाची स्थिती उत्पन्न होते.

  • विशेषतः जे देश प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत, अशा ठिकाणी संघर्ष अधिक असतो. केवळ दहा देशांनी जरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणानुसार राष्ट्रीय धोरण ठरवल्यास जागतिक जैवविविधतेमध्ये एकतृतीयांश घट कमी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक देशामध्ये या धोरणाचा अवलंब केल्यास जागतिक जैवविविधतेचा ६१ टक्क्यांपर्यंत ऱ्हास रोखता येईल.
  • उष्ण कटिबंधातील दहा देशांमध्ये विशेषतः भारत, ब्राझील किंवा इंडोनेशिया या देशांमध्ये कृषी उत्पादनामध्ये अधिक शाश्वतता आणण्याची क्षमता असल्याचे लेईपझिग विद्यापीठातील संशोधक कार्स्टन मेयर यांनी सांगितले. ते म्हणाले, की या देशामध्ये स्थानिक पातळीवरही जमिनीच्या वापरासंदर्भात सातत्याने संघर्ष सुरू आहेत. त्यामुळे जमिनीच्या वापरासंदर्भात अधिक शास्त्रीय आणि शाश्‍वत विचार होण्याची गरज पुढे येत आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com