पेशींच्या स्वयंहानी तत्त्वाचा वनस्पती करतात ताण स्थितीमध्ये वापर

पेशींच्या स्वयंहानी तत्त्वाचा वनस्पती करतात ताण स्थितीमध्ये वापर
पेशींच्या स्वयंहानी तत्त्वाचा वनस्पती करतात ताण स्थितीमध्ये वापर

ऊर्जेबाबतीत ताणाची स्थिती असताना विशेषतः जीवन मरणाच्या स्थितीमध्ये वनस्पतींच्या पानाच्या पेशीतील अमिनो आम्लाचाही वापर केला जातो. त्यामुळे काही पेशींची मोठ्या प्रमाणात हानी होत असली तरी वनस्पती जगण्यासाठी ही क्रिया उपयुक्त ठरू शकते. त्याबाबत जपान येथील तोहोकू विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आले असून, या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवणे शक्य होऊ शकते. हे संशोधन ‘प्लॅंट अॅंड सेल फिजिओलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचा वापर करून अन्नाची निर्मिती करतात. ही प्रक्रिया पानातील हरितद्रव्यांमध्ये होते. निसर्गात प्रत्येक पानांवर सूर्यप्रकाश हा कमी-अधिक पडत असतो. त्यामध्ये वरील पानांची किंवा अन्य झाडांची सावली पडून अडथळे येतात. त्याच प्रमाणे पूरस्थितीमध्ये मुळे अधिक काळ पाण्यामध्ये राहिल्याने अन्नद्रव्ये घेऊ शकत नाहीत. परिणामी वनस्पतीला अपेक्षित ऊर्जा किंवा अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाही. अशा स्थितीमध्ये जपान येथील तोहोकू विद्यापीठातील संशोधिका डॉ. मासानोरी इझुमी आणि हिरोयुकी इशिदा यांनी अशा स्थितीमध्ये वनस्पतीमध्ये होत असलेल्या विविध बदलांचा अभ्यास केला आहे. प्रामुख्याने पेशीमधील राखीव ऊर्जेचा वापर होतो. त्यानेही ऊर्जेची गरज न भागल्यास काही पेशींची हानी करून (स्वयंहानी) त्यातील घटकांचा वापर तग धरण्यासाठी केला जातो. अर्थात, ही प्रक्रिया यीस्ट, माणूस किंवा वनस्पती या सर्वांमध्ये होत असते. मात्र, या संशोधनामध्ये हरितद्रव्य असलेल्या पेशींमधील अशा स्वयंहानीच्या क्रियेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याविषयी माहिती देताना इझुमी म्हणाल्या की, ऊर्जेच्या कमतरतेच्या काळात हरितद्रव्य असलेल्या पेशीमधील स्वयंहानीचे तत्त्व हे अमोनो आम्लाच्या चयापचयाशी संबंधित असल्याचे गृहीतक मांडण्यात आले. असे आहे संशोधन प्रयोगशाळेतील प्रारूप वनस्पती अर्बिडॉप्सीस थॅलीना संपूर्ण अंधारामध्ये ठेवून, अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणण्यात आली. परिणामी निर्माण झालेल्या ताणांच्या स्थितीमध्ये हरितद्रव्ये असलेल्या पेशींच्या स्वयंहानीतून प्रथिने व अमिनो आम्लांची पातळी यावरील परिणामांचा अभ्यास केला.

  • या प्रक्रियेमध्ये अमिनो आम्लाच्या विविध साखळ्यांमध्ये (व्हॅलिन, ल्युसून, आयसोल्युसीन) वाढ झाल्याचे आढळले. मुळे स्वयंहानीची प्रक्रिया थांबवलेल्या प्रजातीमध्ये या अमिनो आम्लाच्या निर्मिती वेगाने होत असल्याचे दिसून आले. इझुमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्युटंट केलेल्या स्थितीमध्ये वरील अमिनो आम्लांचा पुनर्वापर करणारे विकर नसतात. त्यामुळे ताण सहन करण्याची वनस्पतींची क्षमता कमी होत असल्याचे दिसून आले.
  • अमिनो आम्लांचा पुनर्वापर हा पिकांच्या उत्पादकतेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. ही अमिनो आम्ले प्रथिनांच्या विघटनातून तयार होऊन बियामध्ये प्रवाहित केली जातात. तृणधान्यामध्ये काढणीपूर्व काही काळामध्ये ही प्रक्रिया वेगाने घडते.
  • सध्याच्या संशोधनामध्ये पेशींच्या स्वयंहानीमध्ये काही बदल केल्यास पिकांच्या अमिनो आम्लांचा वापर पद्धतीमध्ये बदल करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः हरितद्रव्य पेशीतील स्वयंहानी नियंत्रण प्रणालीवर काबू मिळवता आल्यास तृणधान्यांच्या दर्जा आणि उत्पादनामध्ये वाढ करणे शक्य होईल, असा संशोधकांचा होरा आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com