शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज नेमकेपणाने सांगता येत नाही. मात्र मिशिगन राज्य विद्यापीठातील नव्या संशोधनामुळे शेतीतील नेमक्या कोणत्या भागातून चांगले उत्पादन येईल आणि कोणत्या नाही, ते स्पष्टपणे कळणे शक्य होणार आहे. त्याच प्रकारे सातत्याने कमी उत्पादन येणारे शेतातील भाग लक्षात येऊ शकतील. या भागांवर लक्ष केंद्रित करता आल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे वाचण्यासोबतच शेतीक्षेत्रातून होणारा नत्र ऱ्हासही कमी होऊ शकेल. आपल्या शेताच्या नेमक्या कोणत्या भागातून चांगले उत्पादन मिळते, याविषयी नेमकेपणाने शेतकऱ्यांना सांगता येत नाही. मात्र मिशिगन राज्य विद्यापीठातील प्रो. ब्रुनो बॅस्सो यांनी केलेल्या संशोधनानुसार, अमेरिकेतील मका क्षेत्रामध्ये अगदी लहान भागातील उत्पादनातील फरक लक्षात येणे शक्य होणार आहे. या निष्कर्षातून शेतकऱ्यांना आपल्या शेताचा नेमका कोणता भाग शाश्वत उत्पादन देतो, कोणत्या भागामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, हे समजू शकेल. यामुळे वेळ, खतांच्या वापर, खर्च आणि एकूण शेतातून होणारा नत्राचा ऱ्हास रोखणे शक्य होणार आहे.
एका अभ्यासानुसार १० मध्यपश्चिमेच्या राज्यातील नत्रयुक्त खतांचा ऱ्हास हा सुमारे १ अब्ज डॉलरइतक्या किमतीचा असून, त्यातून दरवर्षी होणारे हरितगृहवायू उत्सर्जन ६८ लाख मे. टन इतके आहे. बॅस्सो व त्यांचे सहकारी ग्युनयुन शुई, जिन्शुई झॅंग आणि फिल रॉबर्टसन यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्टिफिक रिपोर्ट्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केले आहेत. या अभ्यासामध्ये प्रथमच प्रत्येक शेतातून मिळणारे उत्पादन, त्यातील कमी उत्पादकता असणारे भाग आणि त्यातून होणारे नत्राचा ऱ्हास यांचे नेमके आकडे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी बॅस्सो यांच्या गटाने मध्य पश्चिमेतील सुमारे ७० दशलक्ष एकर शेतांची गेल्या आठ वर्षांतील उपग्रह प्रतिमा आणि माहिती गोळा केली. त्याचे विश्लेषण केले. या विश्लेषणाशी मध्य पश्चिमेतील एकूण मका उत्पादनांच्या आकड्यांशी सांगड घातली. हे उत्पादनाचे आकडे उपग्रहाची माहिती आणि प्रत्यक्ष कंबाईन हार्वेस्टरवर बसवलेल्या सेन्सरद्वारे मिळवण्यात आले. एक हजारपेक्षा अधिक शेतांवरील ही माहिती उपग्रहाच्या माहितीशी ताडून पाहण्यात आली. त्याविषयी माहिती देताना बॅस्सो म्हणाले, की आम्ही छायाचित्रातील प्रत्येक पिक्सलचे रंग तपासले. त्यावरून शेतातील स्थिर आणि अधिक उत्पादन देणारी पीकस्थिती शोधली. दर वर्षी कमी उत्पादन देणारे अस्थिर भाग वेगळे केले. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, विश्लेषण केलेल्या शेतातील सुमारे ५० टक्के भाग हा स्थिर आणि अधिक उत्पादनक्षम होता. एकूण शेताच्या सुमारे २५ टक्के भाग हा अस्थिर आणि कमी उत्पादक आढळला. मका प्रक्षेत्रामध्ये शेतकरी वापरल असलेले खतांचे प्रमाण, त्याता वाया जाणारे प्रमाण मिळण्याचा प्रयत्न केला. त्यावरून ज्या भागामध्ये कमी उत्पादकता आहे, त्या भागामध्ये खतांचा वापर करणे टाळण्याचा निष्कर्ष हाती आला. हा निष्कर्ष शेतकरी आणि पर्यावरण दोघांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारा होता. त्यातही अशा कमी उत्पादक भागामध्ये शेती करण्याऐवजी गवतांची किंवा जैवइंधन पिकांची लागवड करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते. बॅस्सो यांच्या मते, कोणत्याही स्थितीमध्ये आपल्या शेतीतील सर्वाधिक उत्पादक पट्ट्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. किंवा सध्या अस्थिर असलेल्या पण एकेकाळी अधिक उत्पादक असलेल्या भागावरही लक्ष दिले पाहिजे. असे अस्थिर शेतीभागांमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक, काटेकोरपणे केला पाहिजे. शाश्वततेचा विचार करून अधिक माहिती गोळा केली असता, शेतकऱ्यांना नत्रयुक्त खतांच्या नेमक्या वापराविषयी शिफारशी करणे शक्य आहे. यामुळे शेतातून वाहून जाणारे नत्र परिसरातील भूजल, नद्या, प्रवाहांना प्रदूषित करणार नाही. त्यामुळे अधिक उत्पादकतेसह शेतकऱ्यांनाही पर्यावरणाचे दूत बनण्याची संधी मिळू शकेल. कोणत्याही उद्योगासाठी कमी उत्पादक भागामध्ये अधिक निविष्ठांचा वापर करणे हे अत्यंत महागडे पडत असते. शेती करताना नत्राचा काटेकोर वापर करण्याचे ध्येय साततत्याने पुढे ठेवले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या भल्याचे, ते पर्यावरणासाठीही उत्तम असले पाहिजे, असे मत नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या दीर्घकालीन पर्यावरणीय संशोधन कार्यक्रमांचे संचालक कॉलेट सेंट मेरी यांनी व्यक्त केले. नॅशनल प्रोग्रॅम लिडर फॉर वॉटरचे जिम डोब्रोवोलस्की यांनी सांगितले, की संपूर्ण माहिती साठा रिमोट सेन्सिंगशी जोडून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा व्याहवारीक शिफारशी या संशोधनातून करणे शक्य होईल. शेतीतील अधिक उत्पादक व स्थिर भाग वाढवतानाच कमी उत्पादक, अस्थिर भागातून होणारे अतिरीक्त नत्र ऱ्हास रोखता येईल. ही शेतकरी आणि पर्यावरणासाठी दोघांसाठी जिंकण्यासारखी (विन- विन) परिस्थिती असेल.