गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या काळामध्ये अमेरिकेतील मधमाशीपालकांच्या सुमारे ४०.७ टक्के मधमाशी वसाहती नष्ट झाल्या असल्याची माहिती मेरीलॅंड विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासातून उघड झाली आहे. त्यांनी केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये हिवाळ्यातील नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक ३७.७ टक्के असल्याचे दिसून आले. हे प्रमाण गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक असून, सरासरीपेक्षा ८.९ टक्क्यांनी अधिक आहे. वनस्पतींच्या परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या मधमाश्या कृषी उत्पादनासाठीही प्रचंड महत्त्वाच्या आहेत. केवळ अमेरिकेचा विचार केला तरी, त्यांच्या परागीकरणामुळे निर्माण होणाऱ्या कृषी उत्पादनाचे मूल्य प्रतिवर्ष १५ अब्ज इतके भरते.
गेल्या १३ वर्षांपासून अमेरिकेमध्ये राष्ट्रीय पातळीवर मधमाशी वसाहतींचे सर्वेक्षण केले जात आहे. मेरीलॅंड विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डेन्निस व्हॅनइंगेल्सडॉर्प यांनी केलेल्या सर्वेक्षणातील माहितीनुसार गेल्या वर्षामध्ये मधमाशी वसाहतींचे नुकसान ४०.७ टक्के इतके (सरासरीपेक्षा २ टक्क्यांनी अधिक) झाले आहे. मात्र, हिवाळ्यातील नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक (३७.७ टक्के) असून, सरासरीपेक्षा ८.९ टक्क्यानीं अधिक आहे. डेन्निस व्हॅनइंगेल्सडॉर्प यांनी सांगितले, की हिवाळ्यातील नुकसानीचे हे प्रमाण काळजी करण्याइतके मोठे आहे. मधमाशीपालन उद्योगाला गेल्या काही वर्षांमध्ये हिवाळ्यामध्ये मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. २०१८ च्या उन्हाळ्यामध्ये मधमाशीपालकांनी २०.५ टक्के वसाहती गमावल्या. हे प्रमाण २०१७ च्या उन्हाळ्यातील नुकसानीपेक्षा (१७.१ टक्के) किंचित अधिक व २०११ पासूनच्या सर्वसाधारण सरासरीइतके आहे. गेल्या वर्षाचे एकूण वार्षिक नुकसान ४०.७ टक्के इतके असून, एकूण सरासरी वार्षिक नुकसान ३८.७ टक्क्यांपेक्षा किंचित अधिक आहे. मधमाशीपालकांना वसाहतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होताना दिसत असून, त्यावर राज्य, राष्ट्रीय कृषी संस्था, विद्यापीठातील संशोधक आणि मधमाशी उद्योग सातत्याने काम करत आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी व्यवस्थापनापासून वाहतुकीपर्यंत सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वार्षिक नुकसानीचे सर्वेक्षण २००६ पासून सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये व्यावसायिक आणि परसबागेमध्ये केल्या जाणाऱ्या मधमाशीपालकांच्या पद्धतींचाही पाठपुरावा केला गेला. त्याचा मधमाशी वसाहतींच्या तग धरण्यावर होणारा परिणाम तपासण्यात आला. ५० राज्यांमध्ये सुमारे ४७०० मधमाशीपालक असून, त्यांच्याकडे ३१९,७८७ मधमाशी वसाहती आहे. कोलंबिया जिल्ह्यामध्ये एकूण वसाहती (२०.६९ लाख )च्या सुमारे १२ टक्के वसाहती आहेत. एकूण मधमाशीपालनाचे चित्र व गेल्या दहा वर्षांचे कल पाहता मधमाश्यांचे वसाहतींचे होणारे नुकसान वाढत चालले आहे आणि आपण हे नुकसान कमी करण्यामध्ये अयशस्वी ठरलो आहोत, हे मान्य करायला हवे. - प्रा. जिओफ्रे विल्यम्स, कीटकशास्त्रज्ञ, ऑबर्न विद्यापीठ.
मधमाशी वसाहती कमी होण्याची कारणे
हिवाळ्यामध्ये मधमाशी वसाहती कमी होण्याच्या कारणांमध्ये सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे व्हॅरोवा कोळी हे आहेत. हे मारक परजीवी व त्यापासून पसरणारे विषाणूजन्य रोग मधमाश्यांचा एका वसाहतीपासून दुसऱ्या वसाहतीपर्यंत वेगाने पसरत आहेत. त्यांच्याविरुद्ध उपाययोजना शोधण्यासाठी मेरीलॅंड विद्यापीठामध्ये काम सुरू आहे. सर्वेक्षणामध्ये अनेक मधमाशीपालकांनी व्हॅरोवा कोळ्याच्या निर्मूलन प्रक्रियेच्या कार्यक्षमता नमूद केली. काही मर्यादित चाचण्यांमध्ये हे कोळी ९० टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचे दिसून आले. मात्र, ही उत्पादने दीर्घकाळ काम करत नाहीत. जमिनीचा वापर बदलणे ही दुसरी समस्या आहे. मधमाश्यांना पोषक मध, पराग मिळत नसल्याने त्यांची पोषकतेची गरज भागत नाही. कीटकनाशकांशी होणारा संपर्क, पर्यावरणातील अन्य बदल, मधमाशीपालनाच्या पद्धती यांचाही परिणाम मोठा असल्याचे मत बी इन्फॉर्म्ड पार्टनरशिपचे कार्यकारी संचालक कॅरेन रेन्निच यांनी व्यक्त केले. त्यांनी वारंवार लागणाऱ्या वणव्यांकडे व पुरांकडे लक्ष वेधले. कारण जंगलांना लागणाऱ्या वणव्यांमुळे किंवा पुरांमुळे वनस्पती, झाडे व पिके वाहून जातात. त्याचा फटका सार्वजनिक व्यवस्था, शेतकऱ्यांइतकाच मधमाश्यांनाही बसतो.