सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला उद्योजकतेचा वसा
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला उद्योजकतेचा वसा

सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला उद्योजकतेचा वसा

`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी म्हण आहे. धडपड्या माणसांना उद्योग नेहमीच आकर्षित करीत असला, तरी नोकरी सोडत त्यात उतरण्याचे धाडस फारच कमी जणांकडे असते. असेच धाडस दाखवत अकोला येथील अभिजित ठाकरे आणि शुभम तेजनकर या उच्चशिक्षित युवकांनी सीताफळ गर काढणी आणि फ्रोजन उत्पादन निर्मितीचा व्यवसाय उभा केला आहे. राज फ्रोजन ऍग्रो प्रोडक्‍ट्स या उद्योगातून फ्रूट ब्लेझ ब्रॅण्डअंतर्गत होणाऱ्या सीताफळाच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळण्यास मदत होईल. अकोला येथील अभिजित ठाकरे आणि शुभम तेजनकर हे दोघे मावस भाऊ आपल्या आजोळी प्रा. बी. डी. शेळके यांच्याकडे लहानपणापासून शिकायला होते. त्यानंतर अभिजितने एम. टेक. (मॅकेनिकल इंजि.) केले. सुरवातीला चिखली, जि. बुलडाणा येथील अनुराधा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्राध्यापक म्हणूनही काम केले. त्याच्यापेक्षा तीन वर्षाने लहान असलेल्या शुभमनेही या काळात अभियांत्रिकीची पदवी मिळवली. दोघांच्याही मनात स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा विचार चांगला रुजला होता. त्यांनी परिसरामध्ये भरपूर उपलब्ध होत असलेल्या सीताफळावर प्रक्रिया करण्याचा विचार केला. २०१६ ते २०१८ या काळात दोघांनी महाराष्ट्रातील विविध प्रक्रिया उद्योगांना भेटी देत या उद्योगाचे अर्थकारण जाणून घेतले. बाजारपेठेतील गोठवलेल्या उत्पादनांची सध्याची मागणी, भविष्यातील संधी जाणून घेतल्या. व्यवसायातील बारकाव्यासाठी त्यांचे आजोबा (कै.) प्रा. बी. डी. शेळके यांचीही मदत झाली. यातून आत्मविश्वास वाढत गेला. विविध बॅंकांकडे जाऊनही वेळेवर कर्ज मिळत नसल्याने अडचणी आल्या. तेव्हा वडिलांच्या निवृत्तीनंतर आलेल्या रकमेतून प्रकल्पांच्या कामांना जानेवारी २०१८ पासून सुरुवात केली. त्यासाठी अकोल्यातील औद्योगिक परिक्षेत्र क्रमांक तीनमधील सुमारे अडीच हजार चौरसफुटांची जागा ८ हजार रुपये प्रतिमाह अशा दराने करारावर घेतली. राज फ्रोजन अॅग्रो प्रोडक्‍ट्स या नावाने ऑक्टोबर २०१८ पासून उत्पादनाला सुरुवात केली आहे. सीताफळ गराच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असले, तरी वर्षभर प्रकल्प यंत्रणा सुरू राहण्यासाठी अन्य फळांचे गरही काढले जातात. एमआयडीसीकडून त्यांना नुकतीच जागा उपलब्ध झाली असून, पुढील वर्षी त्या जागेवर प्रकल्पाचे स्थलांतर व विस्तार करणार असल्याचे अभिजित ठाकरे यांनी सांगितले. त्यासाठी २५ लाखांपर्यंतचा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेला सादर केला आहे. प्रकल्पाची क्षमता ः

  • राज फ्रोजन ऍग्रो प्रोडक्‍ट्स या उद्योगाची क्षमता प्रतिदिन १ टन इतकी आहे. विस्तारानंतर ती ३ टन प्रतिदिन इतकी वाढणार आहे.
  • वडिलांकडून उपलब्ध झालेल्या १२ लाख रुपयांतील ८ लाख रुपये यंत्रे, अवजारे यांच्या खरेदीसाठी वापरले. उर्वरित चार लाख रुपये व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून ठेवले.
  • ब्लास्ट फ्रीजर, गर काढण्याचे यंत्र, प्रतवारी यंत्र, पॅकेजिंग यंत्र अशा यंत्रसामग्रीची खरेदी केली आहे. त्याचबरोबर ८ टन क्षमतेचे १५०० घनफूट आकाराचे गोठवणगृह उभारले आहे. येथील तापमान वजा ४५ अंश सेल्सिअस इतके कमी करता येते. सध्या येथील तापमान वजा २० अंश सेल्सिअस ठेवले जाते.
  • सीताफळ गर हे प्रमुख उत्पादन असून, त्यासोबत स्ट्रॉबेरी फ्रोजन, जांभूळ पल्प, नारळाची मलई (टेंडर कोकोनट), ग्रीनपीस, स्वीटकॉर्न अशी उत्पादने तयार केली जातात. स्ट्रॉबेरी महाबळेश्वर परिसरातून, तर नारळ थेट आंध्र प्रदेशातून मागवले जातात.
  • हिरव्या तुरीचे दाणेही फ्रोजन स्वरूपात प्रथमच विक्रीला आणण्यात येत आहेत.
  • अशी आहे बाजारपेठ

  • वेगवेगळ्या राज्यांतील आइस्क्रीम उद्योगांकडूनही सीताफळ पल्प चांगली मागणी येत आहे. ऑक्‍टोबर २०१८ पासून सुरू झालेल्या या उद्योगातून तीन टन सीताफळ पल्पचा पुरवठा आइस्क्रीम कंपन्यांना केला आहे. आणखी २० टन सीताफळ पल्पची आगावू मागणीही नोंदवण्यात आली असल्याची माहिती अभिजितने दिली.
  • एका कंपनीच्या मागणीनुसार पेरूचाही ५०० किलो गर काढून देण्यात आला. पुढील टप्प्यामध्ये वर्षभर प्रकल्प सुरू ठेवण्याच्या उद्देशाने पेरू गर काढून फ्रोजन स्वरूपात विकण्याचा मानस आहे.
  • सीताफळापासून रबडी, कुल्फी, बासुंदी, चॉकलेटस अशा प्रकारचे उपपदार्थही तयार करतात. अकोला येथील कृषी विद्यापीठामध्ये २७ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ॲग्रोटेक कृषी प्रदर्शन भरवले होते. त्यामध्ये दालन घेत अभिजित व शुभम यांनी आपली सीताफळाची उत्पादने विक्रीसाठी ठेवली होती. या पाच दिवसांत सीताफळ गरापासूनच्या कुल्फीची जोरदार विक्री झाली. त्यातून एक लाख रुपयांची प्राप्ती झाली. या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे दोघांचा हुरूप वाढला.
  • कुल्फीसाठी सीताफळ गराबरोबरच खवा आणि क्रिमचा वापर होतो. त्याची खरेदी ग्रामीण भागातील डेअरी आणि शेतकऱ्यांकडून केली जाते.
  • कच्चा मालाच्या नियोजन ः

  • एका टन गर मिळवण्यासाठी सुमारे चार टन सीताफळ आवश्यक असतात.
  • परिसरातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी आणि उद्योगाच्या उभारणीदरम्यान महाराष्ट्र सीताफळ महासंघाचे अध्यक्ष शाम गट्टाणी, सचिव अनिल बोंडे, प्रभाकर ताडे यांचे सहकार्य मिळाले असल्याचे अभिजित यांनी सांगितले. या उद्योगाच्या माध्यमातून सीताफळाला उत्तम दर मिळण्यास मदत होणार आहे.
  • सध्या व सी ग्रेडच्या सीताफळांची खरेदी शेतकऱ्यांकडून दर्जानुसार १५ ते २१ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे केली जाते.
  • असे आहेत दर

  • सीताफळ पल्प ः १७५ रुपये किलो घाऊक, किरकोळ २२० रुपये किलो.
  • टेंडर कोकोनेट ः ४०० रुपये किलो.
  • सीताफळ पिकाविषयी...

  • २०१४ च्या शासकीय सर्वेक्षणानुसार, राज्यात ७० हजार हेक्‍टर सीताफळ लागवड असून, त्यातील ४२ हजार हेक्‍टर उत्पादनक्षम आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. विदर्भात अमरावती जिल्ह्यात २५० हेक्‍टर, बुलडाणा जिल्ह्यात १०० हेक्‍टर, असे लागवड क्षेत्र आहे.
  • एकरी ३४० झाडे बसून, त्यातून ३ टन उत्पादन मिळू शकते. एकरी साधारणपणे २० ते २२ हजार रुपयांचा खर्च होतो. कमी पाण्यात येणारे चांगले उत्पादन देण्याची क्षमता या पिकामध्ये असल्याने शेतकऱ्यांचा ओढा त्याकडे वाढत आहे. येत्या काळात या पिकाखाली क्षेत्र वाढण्याची शक्‍यता असल्याचे पुणे येथील अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाचे सचिव अनिल बोंडे यांनी सांगितले.
  • बालानगर जातीच्या सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. हे वाण चवीला उत्तम असून, बियांवर पाकळी असल्याने गर उत्तम प्रकारे निघतो. त्यामुळे प्रक्रियेसाठी बालानगर जातीच्या सीताफळांना मागणी आहे.
  • संपर्क ः अभिजित ठाकरे, ८६६८८५६०८४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com