वातावरण बदलामुळे बांगलादेशात शेतकऱ्यांची स्थलांतर प्रक्रिया तीव्र

वातावरण बदलामुळे बांगलादेशात शेतकऱ्यांची स्थलांतर प्रक्रिया तीव्र
वातावरण बदलामुळे बांगलादेशात शेतकऱ्यांची स्थलांतर प्रक्रिया तीव्र

वातावरणातील बदलामुळे हिमकडे वितळून सागरी पातळीमध्ये वाढ होणार असून, त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढणार आहे. याचा फटका बांगलादेश येथील किनारपट्टी भागातील सुमारे २ लाख शेतकऱ्यांना बसणार असल्याचा अंदाज ओहियो राज्य विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन ‘नेचर क्लायमेट चेंज’ मध्ये प्रकाशित केले आहे. सातत्याने येणाऱ्या क्षारयुक्त पाण्याच्या पूर परिस्थितीमुळे बांगलादेशातील शेतकऱ्यांची भातशेती धोक्यात आली आहे. त्यांनी अनेकांनी भातशेतीऐवजी कोळंबी व अन्य सागरी जिवांच्या संवर्धनाला प्रारंभही केला आहे. मात्र, सर्व किनारपट्टीतील रहिवाशांना शेतीपासून पळ काढता येणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट होणार असल्याचे ओहिओ राज्य विद्यापीठातील कृषी, पर्यावरण आणि विकास अर्थशास्त्र या विषयाच्या प्रा. जॉयसे चेन यांच्या अभ्यासात पुढे आले आहे. त्यातही ज्यांच्याकडे स्रोतांची कमतरता आहे, अशा शेतकरी कुटुंबासाठी हे अत्यंत आव्हानात्मक राहणार आहे. जॉयसे चेन आणि त्यांचे सहलेखक ॲरिझोना राज्य विद्यापीठातील व्हॅलेरी म्युल्लर यांनी सामाजिक आर्थिक, लोकसंख्या, भौगोलिक आणि वातावरणातील बदल यांच्या माहिती साठ्याचा उपयोग करून सागरी पाण्यातील वाढलेल्या पातळींच्या परिणाम मिळवण्यासाठी प्रारूप तयार केले आहे. किनाऱ्यावरील शेतीमध्ये व त्यातील वाढत्या क्षारतेमुळे होणारे परिणाम व त्यामुळे होणारे लोकसंख्येचे स्थलांतर याचा अंदाज मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. क्षारयुक्त जमिनीमध्ये भात आणि अन्य पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतात. संशोधकांच्या अंदाजामुळे सुमारे प्रति वर्ष उत्पन्नामध्ये २१ टक्केने घट येणार आहे. थोडक्यात, शेती न परवडणारी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतराला चालना मिळेल.

  • येत्या १२० वर्षांमध्ये, जगभरातील सागरी किनारपट्टीवरील समुदाय (त्यांचे प्रमाणे अंदाजे १.३ अब्ज असेल) सागराच्या वाढत्या पातळीमुळे बाधित होतील, अशा शास्त्रीय अंदाज आहे. यात वाढती सागरी पातळी आणि त्यामुळे येणारी सातत्यपूर्ण पूर परिस्थिती यातून बांगलादेशातील सुमारे ४० टक्के शेतीप्रदेश धोक्यात येणार आहे. चेन यांनी सांगितले, की या विभागातील अनेक शेतकरी हे आधीच खाऱ्यापाण्यातील मत्स्य संवर्धनाकडे वळले आहे.
  • मातीची क्षारता कमी ते उच्च पातळीपर्यंत पोचल्यामुळे शेतीतील उत्पन्नाचा वाटा कोळंबी आणि अन्य सागरी जिवाच्या उत्पादनातून येऊ शकेल. याचे प्रमाण सुमारे ६० टक्क्यांपर्यंत राहणार आहे. अर्थात, हा बदलही फार सोपा किंवा स्वस्त असणार नाही. अनेत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हे बदलही शक्य होणार नाही.
  • देशांतर्गत स्थलांतर हे २५ टक्क्याने वाढेल. मात्र, परदेशामध्ये स्थलांतर होण्याचे प्रमाण अन्य व्यवसायातून मिळणाऱ्या रोजगार व उत्पन्नामुळे तितकेसे वाढणार नाही. उलट ते ६६ टक्क्याने घटण्याचा अंदाज असल्याचे जॉयसे सांगतात.
  • पाण्याची पातळी दरवर्षी १० ते १८ मिलिमीटर या दराने वाढत जाईल. या वाढत्या सागरी पातळीमुळे सागरी वादळांच्या वारंवारितेमध्ये वाढ होईल. किनारपट्टी भाग सातत्याने संवेदनशील राहील. याचा प्रमुख फटका गरीब शेतकऱ्यांना बसेल. त्यांना रोजगारासाठी खूप दूरपर्यंत स्थलांतर करावे लागेल.
  • बांगलादेशप्रमाणे अन्य सागरी किनारपट्टी असलेल्या देशामध्येही असेच बदल होऊ शकतील. वातावरण बदलामुळे होणाऱ्या स्थलांतरांना रोखण्यासाठी धोरणकर्त्यांनी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com