सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळे

सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळे
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळे

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच दुष्काळाच्या झळा सोसतो. अजनाळे गावाची स्थितीही वेगळी नव्हती. इथल्या शेतकऱ्यांना शेततळ्याचा हुकमी पर्याय मिळाला. डाळिंबाच्या व्यावसायिक शेतीला चालना मिळाली. बघता-बघता सर्वाधिक साडेसहाशे शेततळी झालेले गाव म्हणून गावाने राज्यात आघाडी घेतली. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळलेल्या शेतकऱ्यांनी एकरी सात ते दहा टन उत्पादनासह बाजारपेठही काबीज केली. तब्बल पंधराशे हेक्‍टरवर डाळिंबाचे शिवार बहरले. गावाची सामाजिक, आर्थिक शानही वाढली. सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर सांगोल्यापासून जवळ सव्वापाच हजार लोकसंख्येचे अजनाळे गाव आहे. अजनाळे आणि लिगाडेवाडी अशी गटग्रामपंचायत आहे. भौगोलिकदृष्ट्या गावाची परिस्थिती उलट्या तव्यासारखी आहे. पाऊस कितीही पडला तरी पाणी थेट पायथ्याशी किंवा पुढे वाहून जाते. साहजिकच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष, दगडधोंडे आणि माळरानाने व्यापलेला हा परिसर. पण प्रतिकूलता हीच इथल्या शेतकऱ्यांनी संधी मानली. गरबाज शेतकऱ्यांनी रानमाळावरचा दगड फोडून त्यात डाळिंब बागा फुलवल्या. आज शेततळे व डाळिंब पीक हीच गावची मुख्य ओळख बनली आहे.   पाण्याचा विचार करणारे गाव गावात प्रवेश करताच हिरवाई दृष्टीस पडते. पसरलेल्या डाळिंब बागा, कुठे लाल-भगव्या रंगाची सेटिंग झालेली फुले, तर कुठे फळांनी धारण केलेला आकर्षक लालचुटूक रंग. प्रत्येक बागेशेजारी एखादे शेततळे हमखास नजरेस पडते. आज दुष्काळामुळे हा परिसर काहीसा काळवंडला आहे. अनेक शेततळ्यांत पाच-दहा फूटच पाणी बाकी आहे. पण हिम्मत न हारता उपलब्ध पाणी मोजून, मापून वापरून बागा फुलवण्याचे कसब अजनाळेतील शेतकऱ्यांनी अवगत केले आहे.     पंधराशे हेक्‍टरवर डाळिंब बागा सन १९९२ च्या सुमारास गावातील बहुतेक कुटुंबे रोजगार हमी योजनेच्या कामावर राबायची. पाणी नसल्यानं गावशिवारं ओस पडलेली असायची. रोजगार हमी योजनेतून गावात फळबाग लागवड योजना आली. शेतीत उत्साह निर्माण होण्यासाठी तेवढं निमित्त पुरेसं होतं. त्या काळी शंभर टक्के अनुदानावर ही योजना होती. ज्यांच्याकडे विहीर, बोअर यासारखे स्राेत होते त्यांनी बागा जगवण्यास सुरवात केली. गावात डाळिंब फुलू लागलं. त्याचं अर्थकारण शेतकऱ्यांना उमगू लागलं. आजमितीला गावाच्या एकूण ३६०० हेक्‍टरपैकी सुमारे पंधराशे हेक्‍टरवर डाळिंबाच्याच बागा उभ्या आहेत. सर्वाधिक ६५० शेततळे असलेले गाव गाव परिसरातील पाण्याची पातळी खोल असल्याने विहीर, बोअर हे स्राेत तग धरू शकत नव्हते. मग सामूहिक तसेच वैयक्तिक शेततळे यासारख्या योजनांकडे शेतकरी वळले. पावसाळ्यात पडणारे पाणी आणि एरवी विहीर, बोअरच्या पाण्यावर शेततळी भरुन घ्यायची. उन्हाळ्यात त्याचा वापर करायचा हा पायंडा इथं रूजू झाला.   सिंचनाच्या जोरावर फुलल्या बागा संरक्षित पाणी उपलब्ध झाल्यानंतर अजनाळेतील डाळिंब उत्पादक पीक व्यवस्थापन अधिक चोख ठेवू लागले. प्रत्येक बहारात पाणी व्यवस्थापन नेटके करू लागले. साहजिकच एकरी सात ते दहा टनांपर्यंत उत्पादन आणि ए ग्रेडची गुणवत्ता मिळवण्यात ते कुशल झाले. निर्यातीत आघाडी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होती. पण निर्यातीतही गावाने आघाडी घेतली. त्यासाठीच्या व्यवस्थापनाबाबत ते जागरूक झाले. निर्यातदार हंगामात थेट गावात येऊन फळांची खरेदी करू लागले.  गुणवत्ता आणि निर्यातीच्या वाढत्या टक्‍क्‍यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांची वार्षिक उलाढाल काही लाख रुपयांच्या घरात पोचली. त्यांची सामाजिक पतही वाढली. गावातील अन्य शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्राेत झाले. गावची शेतीतील उलाढाल शंभर ते दीडशे कोटी रुपयांच्या घरात पोचली.    शेततळी हाच पर्यायच महत्त्वाचा

  • पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेच्या वेळी गावात साडेसहाशे एकरांवर ‘कंपार्टमेंट बंडिग’ची कामे,  सुमारे ११० नाले तयार झाले. त्यावर १६ ठिकाणी बंधारे उभारले. गावकार्यक्षेत्रात २७ लघुतलाव आकारास आले. अलीकडील वर्षांत पाऊस घटला आहे. यंदा तर भीषण दुष्काळ आहे. तलाव कोरडे आहेत. पावसाचे पाणी त्यात साठले की विहिरी आणि बोअर्सला फरक पडतो. पण पाण्याची पातळीच मुळात खोल असल्याने ते शाश्‍वत स्राेत राहात नाहीत. अशावेळी शेततळे हाच उत्तम पर्याय ठरतो.
  • शंभर टक्के ठिबक सिंचन
  •   गावाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान २०० ते ३०० मिमी.   पण तेवढाही पाऊस कधी पडत नाही.   यंदा संपूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस.    त्यामुळे इथला प्रत्येक शेतकरी ठिबकचे तंत्र वापरतो. स्वयंफूर्तीने शेतकऱ्यांनी स्वतःला लावलेला हा दंडक आहे.
  • दोनच बहार पाण्याचे संकट ओळखून बहुतेक शेतकरी जून- जुलैमध्ये मृग आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हस्त असे दोनच बहार धरतात. आंबे बहारात बागेला ताण दिला जातो. मुख्यतः पाऊस किती पडतो, पाणी किती दिवस टिकू शकते, किती साठवू शकतो या सगळ्या गणितावरच बहारांचे नियोजन ठरते.  पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी झाडांच्या बुडात पाचटाचे मल्चिंग केले जाते. त्यातून झाडाजवळ ओलावा टिकून राहतो. उन्हाळ्यात झाडांना साड्यांचे संरक्षण दिले जाते. त्यामुळे झाडावर उन्हाची प्रखर किरणे थेट पडत नाहीत. त्यामुळे फळांचा दर्जा टिकून राहतो.   

    गावातील शेततळी- दृष्टिक्षेपात

  •   गावातील एकूण खातेदार ७००
  •   पैकी ६५० शेतकऱ्यांकडे शेततळी
  •   एवढी संख्या असलेले अजनाळे हे महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे   
  •   तीस लाख लिटरपासून ते दोन कोटी लिटर क्षमतेपर्यंत त्यांची क्षमता
  •   प्रती सरासरी क्षमता २० ते ३० लाख लिटर गृहित धरली तरी पाणी साठण्याची क्षमता सुमारे २० ते २५ कोटी लिटरहून अधिक .
  • आमची २८ एकर शेती आहे. तीन शेततळी आहेत. एक कोटी लिटर साठवण क्षमता आहे. यंदा पाऊस कमी झाला. शेततळ्यात पाच-दहा फुटापर्यंत पाणी शिल्लक आहे. त्या जोरावरच यंदाचा हंगाम साधला.    विजय येलपले, ९९७०८२३०९९

    दहा वर्षांपूर्वी पाच एकर शेती विकत घेतली. डाळिंब हे मुख्य पीक आहे. विहीर, बोअर आहे, पण हंगामातही त्यास पाणी नसते. शेततळ्याच्‍या आधारेच पाच एकर बाग जगवतो आहे.   संजय येलपले, ९९२३५१०१५५

    अकरा एकरांपैकी नऊ एकरांत डाळिंब बाग व एक एकरात शेततळे आहे. त्यात एक ते सव्वाकोटी लिटर पाणी साठते. त्यावरच बागेचे गणीत असते. संपूर्ण क्षेत्र ठिबकवर आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करतो.   सुनील येलपले, ७३८७०६०१७०

    वीस एकरांपैकी १० एकरांत डाळिंब तर तीन एकरांत द्राक्ष आहे. दीड एकरांत शेततळे आहे. त्यात सध्या २० ते३० टक्के पाणी आहे. संपूर्ण बागेला सध्या त्याचाच आधार आहे. दत्तात्रय येलपले

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com