रासायनिक खत व्यवस्थापनातील तथ्ये

रासायनिक खत व्यवस्थापनातील तथ्ये
रासायनिक खत व्यवस्थापनातील तथ्ये

पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक व सेंद्रिय खताद्वारे केला जातो. सुरवातीला त्यांची संख्या १६ होती, त्यात आणखी काही मूलद्रव्यांची भर पडली. ती अन्नद्रव्ये रासायनिक सूत्रानुसार ओळखली जातात. उदा. नत्र (N), स्फुरद(P२O५), पालाश(K२O) वगैरे. पिकातील रासायनिक खत व्यवस्थापन हा भाग कृषी रसायनशास्त्र विभागाकडून हाताळला जातो, यातही काही चूक नाही. एखाद्या अन्नद्रव्याची एखाद्या पिकासाठीची गरज आणि ती पुरवण्यासाठी किती रासायनिक खत द्यावयाचे, याचे पृथःकरण आणि गणिते रसायनशास्त्राशिवाय करताच येणार नाहीत. मी कृषी पदवीधर होऊन शेतीला सुरुवात केल्यानंतर या विषयाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता. कारण पिकांचे योग्य पोषण केल्यास उत्तम उत्पादन मिळेल. प्रामुख्याने या शास्त्र शाखेच्या ग्रंथासोबत कृषी विभागाची माहिती पत्रके यावरच खताचे हप्ते देत असे. पहिल्या १५-२० वर्षांत उत्तम उत्पादन मिळाल्याने या तंत्रावर ठाम विश्‍वास बसला होता. मी शेती करण्यापूर्वी वडिलांच्या काळात रासायनिक खताबरोबर तितक्‍याच वजनाची भुईमूग पेंड (तेलमुक्त) टाकण्याची प्रथा होती. मात्र, १९७०-७५ या काळातील एका प्रयोगाचे निष्कर्ष शास्त्रज्ञांनी जाहीर केले. पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रावर सलग तीन वर्षे फक्त रासायनिक खत, रासायनिक खत + ५०% भुईमूग पेंड अशा वापराचे प्रयोग झाले. त्यातून उत्पादन व उत्पादन खर्चाचा विचार करता सर्वांत जास्त निव्वळ नफा फक्त रासायनिक खत मात्रेच्या वापरातून होत असल्याचे निष्कर्ष मांडले हाते. भुईमूग पेंडीचा वापर बंद करून फक्त रासायनिक खतांचाच वापर करावा. हा प्रयोगा सुचवला होता. या निष्कर्षाशी वडील अजिबात सहमत नसले, तरी पुढे मला आर्थिक ओढाताणीच्या परिस्थितीचा विचार करता पेंडीचा वापर बंद करावा लागला. कृषीची पदवी घेऊन मुलाला शेतकरी करण्याची वडिलांची इच्छा होती. सुरुवातीला मलाही चांगले उत्पादन मिळत गेल्याने त्यांनी हळूहळू शेतीतून अंग काढून घेतले. आर्थिक प्राप्ती वाढल्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. १५-२० वर्षांनंतर उत्पादन पातळी घसरायला लागली. उत्पन्न व खर्चाचा मेळ घालताना तारेवरची कसरत होऊ लागली. घरची उत्तम वापश्‍याची जमीन, समृद्धीचे काळात केलेल्या उत्तम पाणीपुरवठ्याच्या सुविधा, मशागतीची स्वतःची साधने, फवारणीची साधने अशा गरजेच्या सर्व यंत्र सामग्रीची रेलचेल, अभ्यासूवृत्तीपासून सर्वकामे वेळच्या वेळी करूनही आता उत्पन्नाचा आलेख काही सुधारत नव्हता. हा सर्व इतिहास वाचकापुढे मी मुद्दाम ठेवीत आहे. तमिळनाडूच्या एका संशोधन केंद्राने प्रसिद्ध केलेला ऊसशेतीवरील ग्रंथ मी मागवला. त्यात झाडाच्या खाली जमिनीत मुळांचा पसारा दाखवतानाच केशमुळाभोवती ठिपक्यांच्या स्वरूपात सूक्ष्मजीव दाखवले होते. ते वनस्पतीच्या अन्नद्रव्य पोषणाच्या कामात मदत करतात, इतकाच त्रोटक उल्लेख होता. या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाच्या उद्देशाने मी सूक्ष्मजीवशास्त्राकडे वळलो. भू-सूक्ष्मजीवशास्त्राची तोंडओळख असा एक इंग्रजी ग्रंथ मिळाला. त्यातून केशमुळाभोवतीच्या सूक्ष्मजीव गटाला रायझोस्फिअर असे म्हणतात. या गटात जीवाणू, ऍक्‍टिनोमायसेट्‌स व बुरशी अशा तीन प्रकारातील अगणित सूक्ष्मजीवांचे वास्तव्य असते.

  • वनस्पतींची अन्नद्रव्ये जमिनीत पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत साठविली जातात, याला स्थिरसाठा म्हणतात. तो वनस्पतीना उपलब्ध अवस्थेत नसतो.
  • पिकाच्या बाल्यावस्था, फुटीची (असल्यास) अवस्था, वाढीची व शेवटी पक्वतेची अवस्था अशा विविध अवस्थेत अन्नद्रव्याच्या गरजा बदलत जातात. उदा. बाल्यावस्थेत नत्र-कमी, स्फुरद-जास्त, तर पालाश कमी लागते. वाढीच्या अवस्थेत जास्त नत्र, तर पक्वतेच्या काळात जास्त पालाश लागते.
  • वनस्पती या जिवाणूकडे कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात पाहिजेत, याची मागणी नोंदविते. मागणीनुसार या गटातील सूक्ष्मजीव पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेतून पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर करतात. त्यामुळे पाण्यात विरघळलेल्या साठ्याचे केशमुळाकडून शोषण होते.
  • स्थिर साठा मोठा असतो, तर उपलब्ध साठा त्या वेळच्या वनस्पतीच्या गरजेइतकाच असतो.
  • आता या तंत्राविषयी आणखी खोलात जाऊन माहिती घेऊ.

  • वनस्पतीच्या अन्नद्रव्य शोषणाच्या पाच पायऱ्या आहेत. या पाच पायऱ्यांचा समन्वय झाल्यास पिकाचे योग्य प्रकारे पोषण होते. वापरलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होतो. त्या पाच पाचऱ्या व त्याची इंग्रजी नावे खालीलप्रमाणे ः १) शेतात खत वापरणे - अॅप्लीकेशन, २) स्थिरिकरण - इम्‌मोबिलायझेशन, ३) उपलब्धीकरण - मिनरलायझेशन, ४) शोषण - अॅबसॉर्प्शन, ५) पचन - डायजेशन
  • यातील पहिली पायरी शेतकऱ्याच्या हातात असून, आजवर केवळ या एका पायरीबाबतच शेतकऱ्यांचे प्रबोधन चालू आहे. स्थिरीकरण व उपलब्धीकरण या सूक्ष्मजीवांच्या कक्षेतील, तर चार व पाच या पायऱ्या वनस्पती अगर पिकाच्या कक्षेतील आहेत.
  • खत किती टाकायचे, कोणते व केव्हा ह्या पहिल्या पायरीचा वापर सर्वत्र सुरू आहे. खताचा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना आपली जबाबदारी संपल्याचे वाटते. पुढील कार्यभाग निसर्ग पाहून घेईल. इथपर्यंतचे काम कृषी रसायनशास्त्राशी संबंधित आहे.
  • खते जमिनीत टाकल्यानंतर रसायनशास्त्राचे काम संपते. भू-सूक्ष्मजीवशास्त्राचे काम सुरू होते. भू-सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यासच होत नसल्याचे रासायनिक खत व्यवस्थापनासंबंधित पुढील भाग आजही अंधारात आहे. सूक्ष्मजीवशास्त्रात याविषयी विवेचन असले, तरी कृषी शास्त्रज्ञांचे दुर्लक्ष झाले आहे. ज्याविषयी कृषिशास्त्रातील उच्च विद्याविभूषितांनाच माहिती नाही किंवा अल्पशी आहे, ती शेतकऱ्यांपर्यंत पोचणार कशी? आजच्या शेतीच्या दुरवस्थेचे मूळ या अज्ञानात आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com