नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा हंगाम असतो. दालचिनीची साल सकाळच्या वेळेस काढावी. दालचिनीची निवडलेली फांदी जमिनीपासून २५ ते ३० सें.मी. उंचीवर तोडावी. साल काढल्यानंतर सावलीत वाळवावी. दालचिनी साल काढण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. झाडाचे योग्य व्यवस्थापन असेल तर लागवडीनंतर दोन ते तीन वर्षांनी दालचिनीचे झाड काढण्यासाठी तयार होते. या वेळी झाडाची किमान एक फांदी सुमारे १५० सें.मी. ते १७५ सें.मी उंच, बुंध्याची जाडी ४ ते ५ सें.मी. आणि खोडावरील साल ७० टक्के तपकिरी रंगाची झालेली पाहिजे.
दालचिनीचे झाड तोडावे लागत असल्याने काढणीचा हंगाम महत्त्वाचा ठरतो. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा हंगाम असतो. हा हंगाम जमीन वातावरण व जातीनुसार बदलतो. म्हणूनच आपल्या भागातील हंगामाची निश्चिती करून घ्यावी. दालचिनी काढणीस तयार फांदीवरील सालीचा एक लहानसा तुकडा चाकूने काप देऊन काढावा. हा सालीचा तुकडा सहजपणे निघून आल्यास साल काढणीसाठी खोड तोडावे. सहजपणे साल न आल्यास १५ दिवसांनी पुन्हा तपासणी करावी. जोपर्यंत सहजपणे साल सुटत नसेल तोपर्यंत झाड तोडू नये. साल सहजपणे सुटत असल्याची निश्चिती झाल्यानंतर दालचिनीची साल काढण्यासाठी झाड तोडावे. दालचिनीची साल सकाळच्या वेळेस काढावी. दालचिनीची निवडलेली फांदी जमिनीपासून २५ ते ३० सें.मी. उंचीवर तोडावी. बाजूच्या हिरव्या लहान फांद्या लगेचच तोडून बाजूला कराव्यात. पाने सावलीत वाळवावीत. मुख्य खोडाचे ३० सें.मी. आकाराचे तुकडे वेगळे करून साल लगेच काढण्यास घ्यावी. त्यासाठी खोडाच्या दोन्ही बाजूस उभे खोल काप द्यावेत. चाकूची बोथट बाजू या कापांमध्ये घुसवून साल हलवून घ्यावी. त्यानंतर काढावी. साल काढण्याअगोदर सालीवरून ब्रासचा रूळ किंवा चाकूची धार फिरवून साल रगडावी. त्यामुळे वरचा लाकडाचा भुसा सालीवरून निघून जातो. साल काढल्यानंतर ती सावलीत वाळवावी. साल थेट सूर्यप्रकाशात मात्र वाळवू नये. साल काढलेले खोड मात्र उन्हात वाळवावे. सायंकाळी वाळलेल्या खोडावर साल पूर्ववत चिकटवावी. त्यासाठी ती दोरीने खोडावर बांधून ठेवावी. हे साल बांधलेले खोड दुसऱ्या दिवशी सावलीत वाळवावे. तिसऱ्या दिवशी साल खोडावरून सोडून सावलीत वाळविण्यास ठेवावी. साधारण पाचव्या ते सहाव्या दिवशी साल वाळते. साल सावलीत वाळवल्यानंतर एकदाच दोन तास उन्हात वाळवावी. वाळवताना ती मलमलच्या पिशवीत भरून उन्हात ठेवावी. वाळलेली साल डब्यात हवाबंद करून ठेवावी. एका दालचिनीच्या झाडापासून पाचव्या ते सहाव्या वर्षी सरासरी ३०० ग्रॅम वाळलेली साल व २५० ग्रॅम पाने मिळतात. तोडल्यानंतर दालचिनी झाडाला असंख्य धुमारे फुटतात. हे धुमारे वाढू द्यावेत. त्या धुमाऱ्यापैकी सरळ आणि सशक्त ४ ते ५ धुमारे ठेवून बाकीच्यांची विरळणी करावी. संपर्क ः डॉ. वैभव शिंदे, ७०३०८१८९५७ प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी