हिरवळीच्या खतांसोबत रासायनिक खतांचा संतुलित वापर

हिरवळीच्या खतांसोबत रासायनिक खतांचा संतुलित वापर
हिरवळीच्या खतांसोबत रासायनिक खतांचा संतुलित वापर

कठोरा (ता. जि. जळगाव) हे तापी नदीच्या काठावरील गाव असून, केळी हे प्रमुख पीक आहे. येथील श्रीकांत व पुरुषोत्तम पांडुरंग पाटील या दोघा बंधूंची २८ हेक्‍टर शेती आहे. ते केळीचे खत व्यवस्थापन करताना हिरवळीची खते, पाचट व पीक अवशेषाचे आच्छादन, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांची सांगड घालतात. यामुळे केळीचा घट २२ किलोपर्यंत मिळत असून, गेली अनेक वर्षे ही उत्पादकता टिकून आहे.

शेतकरी ः श्रीकांत व पुरुषोत्तम पांडुरंग पाटील गाव ः कठोरा (ता. जि. जळगाव) पीक ः केळी एकूण क्षेत्र ः २८ हेक्टर श्रीकांत यांनी कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी घेतली असून, ते पिकाची लागवड व खतांचे नियोजन पाहतात. दरवर्षी ४० - ४० हजार केळी खोडे लागवडीचे नियोजन असते. आगाप (अर्ली) कांदे बहार केळी ते घेतात. त्यांची काळी कसदार जमीन आहे. केळी लागवडीपूर्वी जमिनीत जूनमध्ये धैंचांची धूळपेरणी करतात. जुलैअखेर धैंचा ट्रॅक्‍टरच्या साह्याने जमिनीत गाडून घेतात. एकरी किमान तीन ट्रॉली शेणखत वापरतात. त्यावर ऑगस्टमध्ये केळीची लागवड करतात. लागवडीनंतर एक हजार खोडांना चार गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट टाकले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे दोन डोस संयुक्त खतांचे दिले जातात. यात निंबोळी पेंडचे प्रतिहजार रोपाला एक गोणी या प्रमाणात मिसळली जाते. पहिले तीन डोस मोकळ्या स्वरूपात झाडानजीक टाकले जातात. रासायनिक खते दिल्यानंतर लागलीच मिनी ट्रॅक्‍टरने त्यात हलकी आंतरमशागत केली जाते. यामुळे खतावर माती पडून, खतांचा कार्यक्षम वापर होण्यास अनुकूल स्थिती तयार होते. मग केळीची बांधणी झाल्यानंतर प्रतिहजारी झाड एक ट्रॉली या प्रमाणात उसाचे पाचट नैसर्गिक आच्छादन जमिनीवर टाकले जाते. यानंतर सर्व खते द्रव स्वरुपात व्हेंच्युरीने सोडली जातात. त्यात केळी निसवणीच्या वेळेस एक हजार झाडांना एक लीटर पीएसबी व एक लिटर ॲझेटोबॅक्‍टर सोडले जातात.

  • प्लॅस्टिक मल्‍चिंग करण्याचे टाळले जाते. कारण, पीक काढणीवेळी ते फाटते, गोळा करता येत नाही. प्लॅस्टिकचा कचरा शेतीमध्ये पसरून राहतो. प्रदूषण होते. त्या तुलनेत ऊस पाचटामुळे केळीच्या पांढऱ्या मुळांना संरक्षण मिळते. ओलावा टिकून राहतो. जळगावात उष्णता अधिक असते, या काळात या पाचट आच्छादनाचा चांगला आधार केळी पिकाला होत असल्याचे श्रीकांत सांगतात.
  • शेणखतासाठी दोन गायी व दोन म्हशी आणि दोन बैलजोड्यांचे संगोपन करतात.
  • केळीची ऑगस्टमध्ये कापणी सुरू होते, ती नोव्हेंबरपूर्वी १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असते. कापणी सुरू झाल्यानंतर खते दिली जात नाहीत.
  • चांगल्या व्यवस्थापनामुळे उत्तम दर्जाची केळी येते. त्यांच्या शेतातील केळी कंदांना मागणी असते. कापणी पूर्ण झाली की कंदांची विक्री सुरू होते. प्रतिकंद दोन ते तीन रुपये दर मिळतो. कंदांची विक्री आटोपल्यानंतर जे अवशेष शिल्लक राहतात, ते डीस्कहॅरो, रोटाव्हेटरने बारीक करून शेतात पसरवतात. रिकाम्या झालेल्या केळीच्या शेतात हरभरा, दादर (रब्बी ज्वारी) ही कमी सिंचनाची आवश्यकता असलेली पिके घेतात. ही पिके मार्चच्या अखेरीस हाती येतात. त्यानंतर उन्हाळ्यात शेत पलटी नांगरने नांगरून जूनपर्यंत तापू देतात. नंतर धैंचा पेरणीसाठी ते रोटाव्हेटरने भुसभुशीत केले जाते.
  • संपर्क ः श्रीकांत पाटील, ९९२३४१५४०२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com