संत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे महिन्यामध्ये बागेला पाणी थांबवून ताण दिला जातो. पानगळ करून घेतली जाते. पुढे पावसाळ्यामध्ये ताण सोडून , शिफारशीनुसार खत व्यवस्थापन केले जाते. साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये संत्रा फळांचा आकारमान वाढते. फळांना रंग हळूहळू पक्वतेनुसार पिवळसर होण्यास सुरवात होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात फळांची सर्वाधिक गळ होताना दिसते. रस शोषक पतंगाचा वाढता प्रादुर्भाव हेच या फळ गळतीचे महत्त्वाचे कारण असते. साधारणतः सरासरी फळगळीपैकी १०-१५ टक्के गळ या किडीच्या प्रादुर्भावामुळे होते. रसशोषक पतंग ः
संत्रा फळात रसशोषक पतंगाचे वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. त्यातील ओथेरिस फुलोनिया आणि ओथेरिस मॅटेर्ना आणि ओथेरिस होमिना या प्रजातींची नुकसान क्षमता सर्वाधिक आहे. संत्रा फळ रसशोषक पतंग शरिराने मोठ्या व मजबूत आकाराचा असतो. पतंगाचा पंखाचा विस्तार साधारणतः १ सें.मी. पर्यंत आढळतो. पतंगाच्या पुढच्या पंखाच्या जोडीचा रंग मुख्यत्वेः तपकिरी, क्रिम किंवा हिरवा आढळतो. मागील पंख जोडीचा रंग साधारणतः पिवळसर नारंगी असतो. पंखाच्या जोडीवर काळसर डाग व पट्टे आढळतात. या किडीची अळी वेलवेटी (चमकदार) काळ्या रंगाची असते. शरीराच्या पुढील भागावर दोन ठळक ठिपके असतात. (पांढरे ठिपके आणि ठिपक्याचा मध्यभाग काळा रंगाचा) रस शोषक पतंग कीड संत्रा पिकामध्ये रात्रीच्या वेळी (प्रामुख्याने १० ते ११ वाजता) प्रादुर्भाव करतो. पतंग सोंडीच्या साह्याने फळांमधील रस शोषून घेत असतो. पतंगाचा प्रादुर्भाव फळ पक्वतेच्या वेळी सर्वाधिक आढळतो. पतंगाने सोड खुपसल्याच्या ठिकाणी बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा शिरकाव होते. परिणामी फळ सड होऊन फळांची गळ वाढते. एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन
- बागेतील संत्रा फळझाडांव्यतिरीक्त किडीच्या यजमान तणांचा नाश करावा. उदा. भिरा, बाऊची इ.
- प्रकाश सापळ्यांचा वापर - फळ पक्वतेच्या काळात बागेच्या चारही कोपऱ्यामध्ये व मध्यभागी प्रकाश सापळे लावावेत. त्यासाठी एक मर्क्युरी दिवे लावून, त्याखाली पसरट भांड्यामध्ये केरोसिनयुक्त पाणी ठेवावे. हे दिवे रात्री १० ते ११ या काळात प्राधान्याने सुरू ठेवावेत.
- पक्वतेच्या वेळी शक्य असल्यास फळे कागदाने झाकून घ्यावेत.
- फळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रुपांतरीत होत असताना १०-१५ दिवसाच्या अंतराने फळतोडणी होईपर्यंत निंबोळी तेल (निमऑईल) १० मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- साधारणतः सायंकाळीच्या वेळी २ तासासाठी बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा.
- वरील प्रतिबंधात्मक फवारणी करूनही पतंगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, शिफारशीत रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.
डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात.)